पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय पातळीवर स्थूलता म्हणजे ओबेसिटी विरोधात मोहिम सुरू करत असल्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा गायिका श्रेया घोषाल यासह देशातील इतर प्रसिद्ध दहा व्यक्तिंना ब्राण्ड अम्बेसॅडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
देशात ‘स्थूलता’ आजार असलेल्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे योग्यवेळी याविरोधात जनजागृती व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून पाऊल उचललं आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जेवणामध्ये खाद्यतेलाचा कमी वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, स्थूलता विरोधातली ही मोहिम नेमकी कशी असणार आहे, ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
देशात स्थूलता रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. याला अनेक कारणं आहेत. तरुणांमध्ये वाढत असलेल्या या आजारामुळे क्रियाशीलतेवर ही नकारात्मक परिणाम होतो. 2022 साली जगभरातले सुमारे 250 कोटी लोकं ही स्थूलतेच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे.
त्यामुळे आपल्या आहाराच्या सवयींवर लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य, स्वास्थ कसं ठेवावं हा स्वत:चा निर्णय असला तरी, आपल्या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आहे, याची जाण ठेवणं गरजेचं आहे. कारण, आज आठ पैकी 1 जणाला स्थूलतेचा आजार आहे. अनेक लहान मुलंसुद्धा या आजाराने ग्रस्त आहेत. गेल्या काही वर्षात या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत आहे. तर लहान मुलांमध्ये हे प्रमाण चार पटीने वाढत आहे. त्यामुळे विकसित देश म्हणून उदयाला येताना तंदूरूस्त आणि आरोग्यदायी देश म्हणून घडणं अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये केलं होतं.
प्रत्येक नागरिकाने उत्तम आरोग्यासाठी स्थूलतेचा आजार होऊ नये वा झाला असल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहिम सुरू केली आहे.
या मोहिमेसाठी जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती, इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नंदन निलकेणी, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, ऑलिम्पिंक विजेत्या मनू भाकर, मिराबाई चनू, गायिका श्रेया घोषाल, कलाकार आर. माधवन, मोहनलाल आणि निराहू हिंदुस्थानी ( दिनेश लाल यादव) यांची केंद्राकडून जनजागृतीसाठी नियुक्ती केली आहे.
भारतात स्थूलता आजाराची स्थिती कशी आहे?
शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात आणि अयोग्य पद्धतीने चरबीचं प्रमाण वाढल्यावर स्थूलतेचा आजार होतो. हे जर का आपला बॉडी मास इंडेक्स हा 25 च्या वर गेला असेल तर आपलं वजन हे अतिरिक्त आहे किंवा ते जलद गतीने वाढत आहे हे लक्षात येतं. जर का आपला बॉडी मास इंडेक्स 30 च्या वर असेल ते स्थूलतेचं लक्षण आहे.
जगामध्ये स्थूलतेच्या आजारामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो. पोटावर चरबीचं प्रमाण वाढून होणारा स्थूलतेच्या आजाराचं प्रमाण भारतात अधिक आहे. या आजाराला जोडूनच पुढे मधुमेह, हृदयाचे विविध आजार होण्याची शक्यता असते.
कुटुंब सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 2019-2021 मध्ये, जवळपास 22.9 पुरुषांना आणि 24 टक्के महिलांना स्थूलतेचा आजार झाला होता.
सन 2024 च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार, भारतात स्थूलतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामध्ये तरुण रुग्णाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येत्या काही काळात स्थूलतेचा हा आजार देशासमोरचं मोठं संकट असेल असा इशारा दिला आहे.
सन 2022 मध्ये वयोवर्ष 5 ते 19 वयोगटातील 12.5 दशलक्ष बालकं यामध्ये 7.3 दशलक्ष मुलं आणि 5.2 दशलक्ष मुलींचं वजन अतिरिक्त होतं. सन 1990 साली केवळ 0.4 दशलक्ष बालकांचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त होतं.
सन 1990 साली 2.4 दशलक्ष महिलांना स्थूलतेचा आजार होता. 2022 साली तब्बल 44 दशलक्ष महिलांना हा आजार झाला होता. यामध्ये तब्बल 20 पटीने वाढ झाली होती.
2022 मध्ये, महिला आणि पुरुषांमध्ये होणाऱ्या स्थूलतेच्या आजाराविरोधात प्रचार प्रसार करण्यामध्ये जगभरातल्या 197 देशांमध्ये भारत 182 स्थानावर होता. तर तरुणांमध्ये या आजारा विरोधात प्रचार प्रसार करण्यामध्ये भारताचं स्थान 174 होतं.
युनिसेफच्या वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2022 च्या अहवालानुसार, सन 2030 पर्यंत भारतात 27 दशलक्ष बालकं स्थूलतेचं शिकार बनू शकतात. तर, जागतिक पातळीवर एक दशांश मुलांना हा आजार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
डब्ल्युओएच्या 2024 अहवालानुसार, सन 2035 पर्यंत जवळपास 3.3 अब्ज प्रौढ लोकांना स्थूलतेचा आजार होऊ शकतो.
खाद्यतेलामुळे स्थूलतेचा आजार होतो का?
स्थूलतेचा आजार होण्याला खाद्यतेल हा ही एक घटक कारणीभूत आहे. अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ, जंक फूड यासह बदलती बैठी जीवनशैलीमुळे अतिलठ्ठपणा आणि स्थूलतेसारखे आजार होतात असं म्हटलं जातं. मात्र, या कारणांसह घरातल्या स्वयंपाकाघरात वापरलं जाणाऱ्या खाद्यतेलामुळेही स्थूलतेचा आजार होतो. आपल्या जेवणात खाद्यतेलाचं जास्त प्रमाण नेहमीच खूप जास्त असेल तर त्याच्यामुळे स्थूलतेच्या आजारासह, मधुमेह, तणाव व हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाद्यतेलाचा वापर कमी करणं तसेच अधिकाधिक व्यायाम करणं आणि संतुलित आहाराच्या सवयी लावणं गरजेचं आहे.
खाद्यतेलामुळे शरिरात नेमकं काय घडतं?
द्वारका इथल्या मणिपाल हॉस्पीटलचे मधुमेह आणि एनडोक्रॉनोलॉजी डॉ. विनीत कुमार सुराना यांनी खाद्यतेलाच्या अतिरिक्त सेवनामुळे शरिरात काय बदल घडतात याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे. ते म्हणतात की, रोजच्या जेवणातून अतिरिक्त तेल सेवन केल्याने हे तेल शरीरात अतिरिक्त कॅलरिज बनून शरीरात साठून राहतं. याचं रुपांतर पुढे अतिलठ्ठपणा आणि स्थूलतेच्या आजारामध्ये होतं. त्यामुळे दर महिन्याला 600 ते 700 मिलीलीटरपेक्षा जास्त सेवन करु नये. तर दिवसाला 20 मिलीलीटर म्हणजे चार टी स्पून तेलाचं सेवन करावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तेलाचा पुनर्वापर करणंही शरिराला धोकादायक आहे. तेलाच्या पुनर्वापरामुळे ट्रान्स फॅट निर्माण होतात. या ट्रान्स फॅटमुळे जीवनशैलीशी संबंधित आजार होतात.
तेलाच्या वापराप्रमाणे तेलाचा दर्जा ही महत्त्वाचा ठरतो. जेवणासाठी शेंगदाण्याचं किंवा मोहरीचं तेल वापरण्याचा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिड्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने दिला आहे. यासह राइस ब्रान तेल, सोयाबिन, सुर्यफूल अशा प्रकारची चांगल्या प्रकारची तेलं आलटून पालटून वापरण्याचा सल्ला दिला आहे.