पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या कडबनवाडी या वनक्षेत्रामध्ये राखाडी रंगाचे लांडगे आढळतात. मात्र, अलिकडे ही जात दूर्मिळ होत चालली आहे. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आहे ते म्हणजे भटक्या कुत्र्यांचा वावर.
या वनक्षेत्राच्या जवळपास 2 हजार हेक्टर परिसरात अनेक वन्य प्राणी आणि पक्षी एकत्र राहतात. यामध्ये बंगाली कोल्हा, पट्टेदार तरस आणि ब्राह्मणी पतंग यांची संख्या तुलनेने कमी आहे. यामध्ये भारतीय राखाडी लांडगा हा या क्षेत्राचा राखणदार म्हणून गणला जातो. या भागातला प्रमुख शिकारी प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. या लांडग्याच्या स्थितीवरुन या वनक्षेत्र परिसंस्थेचा दर्जा ठरवला जातो. त्यांच्यामुळे या क्षेत्रातल्या लहान भक्षक आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित राहते.
तपकिरी रंगांचे आणि पाठिवर काळे-राखाडी पट्टे असलेल्या या लांडग्यांची नोंद इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने आता रेड लिस्ट मध्ये केली आहे. याचा अर्थ या लांडग्यांच्या प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे या प्रजातीचा समावेश भारताच्या यादी क्रमांक 1 मध्ये केला आहे. ज्याअंतर्गत या लांडग्यांचं विशेष संरक्षण केलं जातं. आतापर्यत विविध पक्षी, बिबट्या, वाघ, दुर्मीळ वनस्पती यांच्याच धोक्यात असलेल्या विषयाची चर्चा व्हायची. मात्र, पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये संतुलन राखण्यासाठी लांडगा हा एक आवश्यक घटक आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आखणं महत्त्वाचं आहे.
लांडग्यांच्या प्रजाती कमी होण्याच्या मागे अनेक कारणं आहेत. शेती क्षेत्राचं आणि शहराचं कडबनवाडी वन्यक्षेत्रावरच्या अतिक्रमणामुळे इथला अधिवास आधीच धोक्यात होता. यातच आता भर पडली आहे ती भटक्या कुत्र्यांची. लांडग्यांच्या जीवाला भटक्या कुत्र्यांचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
कुत्र्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. पण कुत्र्यामध्येही काही प्रजाती या हिंसक असतात. मात्र, कडबनवाडी इथल्या भटक्या कुत्र्यांमध्ये शिकारी कुत्र्यासारखी आक्रमतता आढळली आहे. हे कुत्रे या वन्यक्षेत्राच्या आसपास उभ्या राहिलेल्या शहराच्या परिसरात भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतात.
इथल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी हे कुत्रे 12 – 17 च्या संख्येत दिसायची. मात्र आता या कुत्र्यांचा कळप खूप मोठा झाला आहे. आता साधारण 50 कुत्रे सहज आजुबाजुला फिरताना दिसतात. हे कुत्रे बऱ्याचदा या वनक्षेत्रात जिथे कोल्ह्यांचा अधिवास आहे त्या परिसरात फिरताना दिसतात. हे वनक्षेत्र किंवा माणसांची वस्ती असलेल्या भागात फिरणाऱ्या लांडग्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना या कुत्र्यांपासून खूप धोका असतो. या आक्रमक कुत्र्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांना रोगाची आणि लांडग्यांच्या प्रजातीचं संकरीकरण होण्याची भिती असते. आणि रोगराईपेक्षा लांडग्यांच्या प्रजातीचं संकरीकरण होणं हे लांडग्यांची मूळ जमात नष्ट होण्यासाठी जास्त घातक ठरत आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार या भागात 2016 साली 70 प्रौढ लांडगे होते. डिसेंबर 2024 मध्ये फक्त 11 लांडगे पाहायला मिळाले. आणि आता नुकत्याच केलेल्या मोजणीमध्ये ही संख्या आणखी घटून फक्त 6 लांडगे आढळले.
रोगराई आणि प्रजाती नष्ट होणं
जानेवारी 2025 मध्ये, कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) या आजारामुळे दोन लांडग्यांचा मृत्यू झाला. सीडीव्ही हा संसर्गजन्य आजार मुळात कुत्र्यामध्ये आढळतो. हा संसर्गजन्य आजार बाधित कुत्र्यांच्या थेट संपर्कात आल्यावर किंवा विषाणूंद्वारे पसरतो. त्यामुळे या आजाराचे विषाणू लांडग्यांमध्ये आढळणे धोकादायक आहे, असं मत इंदापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अजित सूर्यवंशी यांनी मांडलं आहे.
जेव्हा लांडगे कमी संख्येने, एकटे प्रतिकार करु शकत नाही अशा स्थितीत आढळतात तेव्हा हे कुत्रे सांघिकपद्धतीने त्यांच्यावर आक्रमण करतात. या पद्धतीमुळे अनेकदा लांडग्यांचा मृत्यू होतो. तसंच कुत्रा आणि लांडग्यांमधील शारीरिक संबंधामुळे लांडगा आणि कुत्रा असा संकरित प्राणीही जन्माला येत आहेत. या संकरित प्रजननामुळे लांडग्यांच्या मूळ प्रजातीत घट होऊ शकते. याशिवाय त्यांच्या वागण्यात विचित्र बदल आढळू शकतो आणि आरोग्याच्या सुद्धा नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. या संकरित प्रजननामुळे लांडग्यासारखे दिसणारे कुत्रे या भागात पाहायला मिळत आहेत.
या भागात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लांडग्यामध्ये रेबिज या आजाराचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. स्थानिकांच्या माहितीनुसार, कुत्र्यांची नेमकी आकडेवारी सांगता येणार नाही पण त्यांनी या भागात आतापर्यंत सहा ते आठ कुत्र्यांचे कळप पाहिले आहेत. जेव्हा लांडग्यांची आणि कुत्र्यांची झटापट होते तेव्हा चावा काढल्यामुळे लाळेतून आणि ओरखडे काढल्यामुळे कुत्र्यामध्ये असलेल्या आजाराचा संसर्ग या प्राण्यांना होतो. कॅनाइन पार्व्होव्हायरस या आजारामुळे लांडग्यांचा मृत्यू होतो. शिवाय या आजारामुळे त्याच्यातील मूळ जनूकांमध्ये बदल होऊ शकतो.
‘आता लांडगा नाही, कुत्रा आला रे आला’
कडबनवाडीचं हे माळरान पूर्वी फक्त लांडग्यांनी व्यापलेलं दिसायचं. तेव्हा हरणं, बकरी, मेढरं यावर लांडग्यांने केलेल्या हल्ल्याच्या घटना ऐकायला मिळायच्या. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता या माळरानावर लांडग्यांची संख्या फारच कमी झाली आहे. त्यामुळे बकरी, मेंढरं सुरक्षित आहेत असं नाही तर आता या त्यांचं कुत्र्यांपासून संरक्षण करावं लागतं. लता गावडे या कळप चारणायला घेऊन जातात. त्यांनी सांगितलं की, अनेकदा त्यांच्या या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढवला आहे. त्यांच्या कळपातील अनेक मेंढऱ्या आणि बकऱ्यांच्या अंगांवर कुत्र्यांच्या ओरबडल्याचे निशाण आढळलेले आहेत.
राखीव जंगलाचा भाग म्हणून, कडबनवाडी गवताळ प्रदेशाला वन अधिनियम कायदा लागू होतो. या वन अधिनियम कायदा 2014 नुसार कलम 66 नुसार, वनामध्ये अनेक प्राण्यांवर अतिक्रमण करणाऱ्या कुत्रा किंवा अन्य पाळीव प्राण्यांना थेट मारण्याचे किंवा त्यांना जंगलाबाहेर काढण्याचे अधिकार दिलेले आहे. या कलमामध्ये असं म्हटलं आहे की, जर कोणत्याही पाळीव प्रशिक्षीत प्राण्यांने अन्य वन्य प्राण्याला घाबरवले असेल, हाकलून लावले असेल, जखमी केले असेल किंवा मारले असेल तर त्या पाळीव किंवा प्रशिक्षित प्राण्याला विलंब न करता अशा जंगलाच्या हद्दीबाहेर हाकलून लावू शकत नसेल किंवा पकडू शकत नसेल, तर त्याला अशा अतिक्रमण करणाऱ्या प्राण्याला मारणे किंवा जंगलातून काढून टाकणे कायदेशीर असेल.”
कायद्याअंतर्गत या कुत्र्यावर कारवाई करण्याची पुर्ण सूट दिली असली तरी श्वान आणि प्राणीप्रेमींच्या प्रतिक्रियांमुळे वनअधिकारी हे पाऊल उचलत नाहीत. यावर पर्याय म्हणून कुत्र्याचं लसीकरण करण्याचा एक पर्याय आहे. पण त्यासाठी कुत्र्यांना पकडणं हे खूप कठिण होत असल्याचं पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला सांगितलं.
दरम्यान भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणे हे माणसांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी सुद्धा धोकादायक आहे. कारण भारतात 2024 साली जवळपास 18 हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे झाला. तर कुत्र्यांने चावा घेतल्याच्या 22 लाख घटनांची नोंद झाली. त्यापैकी 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे सगळेच कुत्रे हे प्रेमळ आणि सुरक्षित नसतात. घरात पाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांचं वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचं आहे. तर रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांची संख्या जेव्हा वाढू लागते तेव्हा सरकारी यंत्रणांकडून त्यांना त्या – त्या नागरी वस्तीतून हलवलं जातं अशावेळी श्वानप्रेमींनी सरकारच्या विरोधात न जाता सूज्ञपणे सहकार्य करण्याची गरज आहे.