आयुष्यात धैर्य, समर्पित वृत्ती आणि लवचिक मन असलं की नवनवीन आव्हानं स्वीकारून ती यशस्वी करून दाखवण्याला अंत राहात नाही. अशा साहसी व्यक्ती सतत नाविन्याचा शोध घेत असतात आणि इतरांना प्रेरणा देतात. आज कमांडर अंजली राठी (सेवानिवृत्त) ही एक अशीच उल्लेखनीय व्यक्ती आहे. म्हणजे, उच्च दर्जाची शैक्षणिक पार्श्वभूमी, वायुदलात साहसी मोहिमा यशस्वी करणारी गुणी अधिकारी, सातत्याने उत्तम प्रकारचा फिटनेस राखून असल्यामुळे थेट सौंदर्य स्पर्धेत ‘मिसेस इंडिया’चा मुकुट जिंकणं आणि तिथेच न थांबता स्वतःमधली प्रतिभा वेगळ्या प्रकारे सिद्ध करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात पाऊल टाकणं.. हे एखाद्या चित्रपटात शोभावं असं कथानक आहे.
जन्मजात सैनिकी बाळकडू
नवी दिल्लीतील एका सैनिकी कुटुंबात जन्मलेली अंजली फार हुशार मुलगी होती. जन्माला आल्यापसून मिळालेलं देशसेवेचं पर्यायाने साहसाचं बाळकडू तिला भारतीय हवाई दलातील प्रतिष्ठित अधिकारी बनवून गेलं. अंजलीचा आजवरचा प्रवास सेवा आणि उत्कृष्टतेसाठी तिची अटळ बांधिलकी दाखवतो. भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समधील तांत्रिक अधिकारी असलेले तिचे वडील आणि एक उद्योजिका असलेल्या तिच्या आईचा अंजलीवर खूप प्रभाव होता. या दोघांनी तिच्यात शिस्त आणि दृढनिश्चय ही मूल्ये रुजवली.
भारतीय वायूदलात हेलिकॉप्टर पायलट ते प्रशिक्षक अधिकारी
अंजलीने आर्मी पब्लिक स्कूल धौला कुंआ येथे शिक्षण घेतलं. शाळेत असताना तिने शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर तिने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स केलं. आपल्या देशाची सेवा करण्याच्या इच्छेपोटी अंजलीने 2008 मध्ये भारतीय वायुसेना अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि एका खडतर प्रशिक्षणानंतर ती डिसेंबर 2009 मध्ये भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये नियुक्त झाली. भारतीय हवाई दलातील सेवेच्या 14 वर्षांच्या काळात अंजलीने हेलिकॉप्टर पायलट म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अतिशय आव्हानात्मक भूप्रदेशात उड्डाण करत तिने अनेक सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी मोहिमा केल्या. अशा मोहिमामध्ये अनेकदा प्रचंड दबावाखाली गंभीर स्वरूपाचे निर्णय पटकन घ्यावे लागतात. अशा वेळी तिचं प्रसंगावधान दिसून आलं. तिच्या वायुदलाच्या कार्यकाळात तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
ती क्रॉस-कंट्री रनिंगमध्ये सुवर्णपदक विजेती होती आणि एअर फोर्स अकादमीमध्ये तिला सर्वोत्कृष्ट ॲथलीट म्हणून गौरवण्यात आलं. तरुण अधिकाऱ्यांना लष्करी जीवनातील नैतिकता आणि शिस्त लावण्यासाठी त्यांना तयार करण्याचे कामही तिने लीलया पार पाडलं. ती एक उत्तम प्रशिक्षक-अधिकारी म्हणून ओळखली जाई.
वैयक्तिक आयुष्य आणि करिअरचा समतोल
वैयक्तिक आयुष्य आणि करिअरचा समतोल साधणं हे तिच्यापुढे एक आव्हान होतं. परंतु अंजलीने दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. तिचे पतीही एक लढाऊ पायलट आहेत. विंग कमांडर मनीष जोशी यांच्याशी तिचं लग्न झालं. आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करताना त्यांनी लष्करी जीवनातील गुंतागुंत सोपी करण्याचा आपल्या परीने मार्ग शोधला.
पुरस्कारांनी गौरव
लष्करी सेवेसोबतच अंजलीला 2013 मध्ये एक उत्तम मार्गदर्शक आणि तरुणांसाठी प्रेरणा म्हणून तिच्या भूमिकेसाठी महिला आयकॉन पुरस्कार मिळाला. महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणा म्हणून 2018 मध्ये महिला उद्योजक परिषदेमध्ये तिचा सत्कारही करण्यात आला. या सन्मानामुळे महिलांना त्यांच्या स्वप्नांचा निर्भयपणे पाठपुरावा करण्यासाठी सक्षम बनवण्याची तिची बांधिलकी दिसून येते.
मिसेस इंडिया 2024
2024 मध्ये अंजलीने ‘व्होगस्टार मिसेस इंडिया 2024’ चा मुकुट मिळवून एक नवीन मैलाचा दगड गाठला. स्पर्धेतील तिचा सहभाग केवळ वैयक्तिक कामगिरीसाठी नव्हता तर स्त्रियांना सामाजिक अडथळे तोडण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याचा तिचा उद्देश होता. सौंदर्य स्पर्धांच्या जगात अंजलीच्या उपस्थितीने हे अधोरेखित केलं की खरं सौंदर्य केवळ वरवरचं नसतं; त्यात सामर्थ्य, चारित्र्य आणि एखाद्याच्या आवडींचा पाठपुरावा करण्याचे धैर्य सामावलेलं आहे.
कॉर्पोरेट जगतात पाऊल
अंजली राठीची भविष्यासाठीचे ध्येय महिलांच्या सक्षमीकरणाभोवती फिरते. सामाजिक अपेक्षांची पर्वा न करता मार्गदर्शन करण्यासाठी आणि तरुण स्त्रियांनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी तिच्या अनुभवांचा लाभ देण्याचं तिचं ध्येय आहे. अर्थात सौंदर्यस्पर्धा हा फक्त एक टप्पा होता. ती तिथेच अडकून पडणाऱ्यातली नव्हती. लष्करी विमानचालक म्हणून काम केल्यानंतर आणि मिसेस इंडिया ही पदवी मिळवल्यानंतर तिने कॉर्पोरेट जगतात पाऊल ठेवलं आहे. भारतातील आयटी क्षेत्रातल्या कॅपजेमिनी या कंपनीमध्ये ती रूजू झाली आहे. ती सांगते, “माझी तिसरी व्यावसायिक खेळी सुरू झाल्याची बातमी देताना मला आनंद होत आहे. माझ्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा उत्कृष्टता आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याप्रती बांधील आहे. आणि मी या नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगलं व्यासपीठ निवडू शकले नसते. मी या रोमांचक प्रवासाचा शुभारंभ करताना, कॅपजेमिनीच्या प्रतिभावान टीमसह सहयोग आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक आहे. नवीन आव्हाने, नावीन्य आणि सामायिक यशाने भरलेलं भविष्य मला दिसतं आहे.”