कल्पना करा की, एका बोटीतून तुम्ही महासागरात प्रवास करत आहात. मोजके सहकारी सोबत आहेत. मात्र क्षणाक्षणाला आव्हान देणारं निसर्ग चक्रीवादळ, हिमवादळ आणि अर्थातच कडाक्याची थंडी यांत बोटीचं सारखं नुकसान होतंय. त्याकडे लक्ष देऊन पुढे तुम्हाला संशोधन सुरूच ठेवायचं आहे. नुसता साहसापोटी केलेला, पराक्रमाच्या उर्मी भागवणारा प्रवास नाही हा… या सगळ्या विपरीत परिस्थितीत आपलं लक्ष्य गाठायचं आहे, तर हातपाय गाळून, कच खाऊन चालणार नाही. मोहिमेवर होणारा अवाढव्य खर्च, देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही मोहीम आहे..
सागर परिक्रमा-II मधील महिला अधिकाऱ्यांचा सहभाग
अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी आयएनएसव्ही- तारिणी या नौका मोहिमेद्वारे, पृथ्वीवरील सर्वात दुर्गम स्थान असलेल्या पॉइंट निमोमधून यशस्वीपणे नेव्हिगेट केलं. हा ऐतिहासिक ठरलेला प्रवास सागर परिक्रमा-II या उपक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमाद्वारे सागरी मोहिमांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिलं जातं. आयएनएसव्ही-तारिणीने भारतातून दुहेरी प्रदक्षिणा घालणाऱ्यांची पहिली टीम बनण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून जगभर प्रवास केला. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोव्यातून क्रूला हिरवा झेंडा दाखवला होता. 39 दिवसांनी या भारतीय नौदल महिला क्रू अधिकारी ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल इथं पोहचल्या. तिथून त्यांचा पॉईंट निमोच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.
पॉइंट निमो काय आहे?
पॉइंट निमो हे एक पॅसिफिक महासागरातील सर्वात दुर्गम ठिकाण आहे. त्या ठिकाणापासून जवळ असलेली जमीन सुमारे 2,688 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण ‘दुर्गम महासागर ध्रुव’ म्हणून ओळखलं जातं. ज्युल्स व्हर्नच्या कॅप्टन नेमोच्या नावावरून या जागेचं ठेवलं आहे. जैविकदृष्ट्या निष्क्रिय पाण्याने वेढलेलं, त्याच्या दुर्गमतेमुळे ही जागा अवकाशातील कचरा-भंगार इ. सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलं जात आहे. सगळ्यात आधी स्पॅनिश संशोधकांचे ‘हेस्पेराइड्स’ हे 1999 मध्ये या ठिकाणी पोहोचणारं पहिलं जहाज होतं. तेव्हापासून काही जहाजांनी या भागातून प्रवास केला आहे.
भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी सेलबोटीतून पॉईंट निमोकडे
‘ocean pole of inaccessibility’ हा शब्द कोणत्याही देशापासून सर्वात दूर असलेल्या प्रशांत महासागरातील बिंदूशी संबंधित आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दुर्गमतेचे अनेक ध्रुव आहेत. पॉइंट निमो महासागरातील त्याच्या स्थानामुळे अद्वितीय आहे. या ठिकाणी पोहोचणं कठीण आहे. याला ‘ॲक्सेसिबिलिटी पोल’ म्हणण्याचं कारण म्हणजे निमो हा पृथ्वीवरील कोणत्याही मानवी संस्कृतीपासून समुद्रातील सर्वात दूरचा बिंदू आहे. भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी नुकतंच पॅसिफिक पॉईंट निमो एका सेलबोटीतून पार केलं आहे.
पॉइंट निमो मोहिमेचं महत्त्व काय आहे?
पॉइंट निमोला पर्यावरणीय आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. त्याच्या सभोवतालचे पाणी दक्षिण पॅसिफिक गायरचा भाग आहे. हा भाग तिथल्या पाण्याची स्पष्टता आणि कमी प्रमाणात झालेल्या जैविक मोहिमांसाठी ओळखला जातो. दुर्गमतेमुळे ह्या प्रदेशात सागरी जीवन फार विरळ आहे. तरीही भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांवरून, पुराव्यांनुसार हा प्रदेश सागरी संशोधनासाठी महत्त्वाचा आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांचं विश्लेषण राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून केलं जाईल. या संशोधनाचं उद्दिष्ट आहे की रासायनिक रचना आणि सागरी जैवविविधता यासह सागरी परिस्थितींबद्दल महत्त्वाची माहिती मिळवणं! अशा अभ्यासांमुळे जागतिक महासागराच्या आरोग्याविषयीचं आकलन होण्यास हातभार लागतो.
स्पेसक्राफ्ट स्मशानभूमी
पॉइंट निमो याला डिकमिशन्ड स्पेसक्राफ्ट स्मशानभूमी म्हणूनही ओळखलं जातं. अवकाश संस्था हेतुपुरस्सर निकामी झालेले उपग्रह आणि अंतराळ स्थानकांना वातावरणात पुन्हा प्रवेश करण्यासाठी आणि या दुर्गम महासागर क्षेत्रात येऊन पडण्यासाठी सूचना करतात. या पद्धतीमुळे जमिनीवरील मानवी लोकसंख्येला उद्भवू शकणारा धोका कमी होतो.
कसा झाला या दोघींचा प्रवास?
न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या लिट्टेल्टन पोर्टपर्यंत त्यांचा पुढचा टप्पा, क्रूने ग्रेट ऑस्ट्रेलियन बाईट आणि टास्मान समुद्रावर सेल बोट पुढे हाकारताना कमालीचा प्रचंड वारा आणि लाटांचा सामना करत त्या पुढे पुढे जात राहिल्या. एका छोट्याशा विश्रांतीसाठी घेतलेल्या दुसरा थांबा घेतला, जिथे किनाऱ्यावरच्या टीमने बोटीची पूर्ण तपासणी केल्यानंतर या क्रूने केप हॉर्न या अंटार्क्टिकापूर्वीची दक्षिणेकडील भूमी असलेल्या जागी कूच केलं. केप हॉर्न हा पृथ्वीवरील एक बिंदू इतका विश्वासघातकी आहे की, फार कमी जणांनी या ठिकाणी नौकेवर गोलाकार प्रवास केला आहे. पॅसिफिक क्रॉसिंगच्या वेळी त्यांना आधीच दोन मोठी चक्रीवादळं आणि दक्षिण महासागरातील सततच्या थंड वाऱ्याशी झुंजत राहावं लागलं होतं. यामुळे त्या पुढे जात असताना बोटीचं बरंच नुकसान झालं.
या दोघी महिला अधिकारी चालक दल जोरदार वादळं आणि उदासवाण्या शांततेला तितक्याच धैर्यानिशी सामोऱ्या जात आहेत. या मोहिमेत हजारो मैलांच्या नौकानयनानंतर त्यांनी पृथ्वीचा सर्वात दुर्गम भाग पार केला. पोर्ट स्टॅनली इथून या दोन जिगरबाज अधिकारी त्यांच्या पुढील पोर्ट ऑफ कॉलच्या दिशेने प्रगती करत आहेत. त्यांचा प्रवास फेब्रुवारी 2025 मध्येही सुरूच आहे. सलाम त्यांच्या कार्यनिष्ठा आणि साहसी वृत्तीला !
1 Comment
ब्रावो झुलू