साहस आणि प्रेमाची जिवंत कथा: लता करे

Womenhood : बारामतीमधल्या लता भगवान करे या अशाच एक साहसी महिला आहेत. त्यांच्या साहसाची कसोटी लागली ती वयाच्या 62 व्या वर्षी. पतीच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी वयाच्या 62 वर्षी लता करे यांनी मॅरेथॉन सारख्या स्पर्धेत भाग घेतला आणि विजयी झाल्या. हा विजय त्यांचा इच्छाशक्ती आणि प्रेमाचा होता.
[gspeech type=button]

प्रेमात माणूस काय काय करू शकतं ? मिर्झा गालिब म्हणून गेलेत, इक आग का दर्या है और डूब के जाना है!!! अर्थात या शायराला अपेक्षित असलेलं साहस प्रेम मिळवण्यासाठी आहे.. आपल्या आसपास अशा अनेक जिवंत कथा वावरत असतात. बारामतीमधल्या लता भगवान करे या अशाच एक साहसी महिला आहेत. त्यांच्या साहसाची कसोटी लागली ती वयाच्या 62 व्या वर्षी.

वयाच्या 62व्या वर्षी मॅरथॉन

लता भगवान करे या बारामती जिल्ह्यातल्या एका खेडेगावात राहतात. आता त्यांचं वय 73 वर्षं असेल. साल 2024 पर्यंत त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. त्यानंतर आजवर त्या ‘मॅरेथॉन रनर’ म्हणून  ओळखल्या जातात. अर्थात ही प्रसिद्धी किंवा ओळख मिळावी म्हणून त्यांनी काही केलं नाही. वयाच्या 62व्या वर्षी त्या मॅरेथॉन धावल्या आणि जिंकल्या. जिंकण्यासाठीच त्या धावल्या हे मात्र शंभर टक्के खरं. त्यांच्या नशिबाने साथ  दिली आणि त्यांचा धावण्यामागचा हेतू सफल झाला. यश आणि नावाला ओळख त्यांना एकाच वेळी वाट्याला आलं.

शेतमजूर लताताई

झालं असं होतं की, मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असलेले लता आणि भगवान करे चरितार्थाच्या शोधात बारामतीत येऊन दाखल झाले होते. भगवान एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला लागले आणि लताबाई लोकांच्या शेतावर मजूरी करायला जाऊ लागल्या. या जोडप्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. जमवलेल्या थोड्याफार पैशातून त्यांनी तिन्ही मुलींची लग्नं लावून दिली होती. मुलाला कायमस्वरूपी नोकरी अशी नव्हती, त्यामुळे या तिघांच्या कमाईवर सगळा चरितार्थ चालत होता.

पतीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी पैशांची गरज

आणि मग 2014 मध्ये अचानकच भगवान करे यांची तब्येत बिघडली. चक्कर येऊन छातीत वेदना होऊ लागल्या. आणि डॉक्टरांनी एमआरआय टेस्ट करावी लागेल असं सांगितलं. या टेस्टला 5000 रुपये खर्च येणार होता.  अर्थातच तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. कंपनीतले लोक, नातेवाईक, शेजारीपाजरी अशा सगळ्या ओळखीच्या लोकांकडे त्यांनी पैसे उसने मागितले पण काही उपयोग झाला नाही. याच दरम्यान लोकांच्या शेतात मजूरी करण्यासह लताबाई एका शाळेतही कामाला जात होत्या.

पैशाची निकडीतून मॅरेथॉनच्या स्पर्धेत

योगायोगाने त्यांना त्यांच्या या शाळेत बारामतीमध्ये होऊ घातलेल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आयोजित  मॅरेथॉनविषयी समजलं.आणि त्याहून नवल म्हणजे विजेत्याला 5000 रुपये रोख बक्षीस मिळणार होतं. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी आग्रह केला. काही तरुण मंडळी म्हणाली, ‘आज्जे, तू सतत इकडून तिकडं धावत असतीस.  तू पळशील मॅरेथॉन..’ आणि  म्हणून लताबाईंनी धावायचा निर्णय घेतला. शेजारच्या एका मुलीने सांगितलं म्हणून रोज सकाळी दोन्ही हातात पाण्याने भरलेल्या बादल्या घेऊन सराव करायला सुरुवात केली.

स्पर्धेत धावताना वहाणा तुटल्या

रोजची नऊवारी साडी आणि वहाणा घालून लताबाई मॅरेथॉनच्या नियोजित जागी पोहोचल्या. धावायला सुरुवात झाली. आणि थोड्याच वेळात लताबाईंच्या वहाणा तुटून पडल्या. पण थांबून उपयोग नव्हता. लताबाई धावत राहिल्या आणि शेवटी जिंकूनच थांबल्या. त्या सांगतात, “मॅरेथॉन जिंकणाऱ्याला पाच हजार बक्षीस मिळणार आहेत हे समजल्यावर मला वाटलं की देव आपल्याला मार्ग दाखवतो आहे. शर्यत जिंकून पैसे मिळाले तर नवऱ्याच्या तब्येतीचा इलाज करणं शक्य होईल असं वाटलं आणि म्हणून मी भाग घेतला. अशी काही धावण्याची शर्यत असते, याला मॅरेथॉन म्हणतात, याची मला काहीही माहिती नव्हती.पण मला सगळ्यात आधी रेस पूर्ण करायची होती आणि तेवढं मी केलं. फिनिश लाइन जवळ आले तेव्हा आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि तेव्हा मला वाटलं की मी जिंकू शकते, मला पाच हजार रुपये ताबडतोब मिळू शकतात.”

अनेक स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसं

2014 साली झालेल्या त्या मॅरेथॉननंतर लताबाईंचं आयुष्यच बदलून गेलं. नवऱ्यावर उपचार तर झालेच, पण पुढे कितीतरी स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी ढाली, रोख बक्षीस, कप मिळवले आहेत. एवढंच नव्हे त्यांच्या या साहसाला जगापुढे आणण्यासाठी त्यांच्यावर एक फिल्मदेखील झाली आहे. 2020च्या जानेवारी महिन्यात ही फिल्म प्रदर्शित झाली. नवीन देशाबोईना यांनी दिग्दर्शित केलेल्या  ‘लता भगवान करे’ या सिनेमात लताबाईंनीच आपली भूमिका केली आहे.  त्या म्हणाल्या की ‘मला पैसे कमवायचे होते. सिनेमात काम केलं की पैसे मिळतात हे मला माहिती नव्हतं.’ 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित

नवीन देशाबोईना यांनी दिग्दर्शित केलेल्या  ‘लता भगवान करे’ या लघुपटासाठी लता करे यांना 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला होता.

भगवान करे यांना आपल्या या गुणी, साहसी बायकोचा फार अभिमान वाटतो. जन्मभर तिच्या ऋणांत असल्याची त्यांची भावना आहे. मात्र, या वयात बायकोला अशी अनवाणी वणवण करून पैसे मिळवावे लागले या गोष्टीची त्यांना खंतही वाटते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Womenhood : दुर्दैवाने व्हीलचेअरशी खिळलेले आयुष्य वाट्याला आलेली;पण उमेद न हारता अपंगांसाठी सुलभता वाढवण्याची मोहीम हाती घेतलेली, फॅशनच्या जगातली चाकांच्या
Indian naval officers : अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी
Anjali Rathee : आयुष्यात धैर्य, समर्पित वृत्ती आणि लवचिक मन असलं की नवनवीन आव्हानं स्वीकारून ती यशस्वी करून दाखवण्याला अंत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ