ठाणे जिल्ह्याला विविधांगी वारसा लाभलेला आहे. मग त्यातून क्रीडा क्षेत्रही कसे दूर राहील. क्रिकेट क्षेत्रात भारताला अगदी सुरुवातीच्या काळात जागतिक ओळख प्राप्त करून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावणा-या ठाण्याच्या खंडेराव मोरेश्वर रांगणेकर यांच्याविषयी जाणून घेऊयात.
क्रिकेटचा तेजस्वी तारा
खंडू रांगणेकर हे नाव भारतीय क्रिकेटच्या सुवर्णपानांवर अजरामर झालं. डावखुऱ्या हाताने खेळणारे, भेदक फटकेबाजी करणारे आणि कव्हर पॉईंटवर विजेसारखे चमकणारे क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्याकाळी त्यांना भारतातील सर्वोत्कृष्ट डावखुरे फलंदाज मानलं जायचं. मैदानावर त्यांचं क्षेत्ररक्षण इतकं अफाट होतं की, डोनाल्ड ब्रॅडमनसारखा दिग्गज खेळाडू म्हणायचा, “मी मैदानात उतरलो की प्रथम हेच पाहायचो की, खंडू कुठे फील्डिंग करत आहे.” आपल्या अपार क्रीडा कौशल्याने खंडू यांनी अनेक क्रिकेट प्रेमींना त्या काळात भुरळ घातली होती. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 85 सामने खेळून 4, हजार 602 धावा केल्या. 15 शतकं आणि 16 अर्धशतकांची नोंद त्यांच्या नावावर आहे. 1947 – 48 साली भारताच्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी तीन कसोटी सामने खेळले आणि भारतीय क्रिकेटच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
बॅडमिंटनमधील अजिंक्य योद्धा…
केवळ क्रिकेटच नव्हे, तर बॅडमिंटनमध्येही खंडू रांगणेकरांनी दैदीप्यमान कामगिरी केली.
1939 ते 1945 या काळात ते भारतातील आघाडीचे बॅडमिंटनपटू होते. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी विजेतेपद आणि एकेरीत उपविजेतेपद मिळवलं होतं. खेळातील त्यांचं कौशल्य इतकं बहारदार होतं की, दोन्ही हातांनी सारख्याच ताकदीने बॉल थ्रो करण्याचं अद्भुत कसब त्यांच्याकडे होतं. त्यांच्या या विशेष खेळामुळे भारतीय क्रिकेट संघाला एक वेगळी ओळख त्यावेळी जागतिक स्तरावर प्राप्त झाली होती.
हे ही वाचा : क्रिकेट ऑफ ठाणे
‘भारतीय क्रिकेटचा बाजीराव’…
त्यांच्या झंझावाती शैलीमुळे आणि अष्टपैलू खेळामुळे त्यांना “भारतीय क्रिकेटचा बाजीराव” असं गौरवपद मिळालं. मुंबई आकाशवाणीचे नामवंत कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांनी त्यांच्या धडाडीला सलाम करून ही उपाधी त्यावेळी बहाल केली होती. त्यांच्या खेळातली नैसर्गिकता, क्षेत्ररक्षणातील वज्रगती आणि फलंदाजीतलं आक्रमक स्वातंत्र्य आजही दंतकथांसारखं सांगितलं जातं.
ठाण्याचा अभिमान…
खंडू रांगणेकरांचं आयुष्य फक्त खेळापुरतंच मर्यादित राहिलं नाही. त्यांनी ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. राजकारण आणि समाजकारणातही त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा ठसा उमटवला. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात ठाण्याच्या विकासाला विशेष गती मिळाली. त्यामुळे आजही ठाण्यातील खंडू रांगणेकर चौक त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी त्यांचा ठाण्यातील एका शानदार कार्यक्रमात सत्कार केला होता. त्यावेळी भारावून जाऊन अत्रे म्हणाले होते की, “या महाराष्ट्रात माझ्यावर कडी करणारा एकमेव माणूस म्हणजे आमचा खंडू!” ही त्यांची प्रशंसा खंडूंच्या व्यक्तिमत्त्वाचं महत्त्व अधोरेखित करते.
क्रीडाजगतातील अजरामर कार्य…
1939 मध्ये मुंबईच्या पंचरंगी सामन्यांत त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या बहुआयामी खेळाचं प्रदर्शन केलं, तेव्हाच क्रिकेटविश्वाला एका चमत्कारिक खेळाडूची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी 1947-48 मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळताना जिद्द आणि राष्ट्राभिमानाची प्रचिती जनतेला आपल्या खेळातून दाखवून दिली. बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदापासून ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघटना अधिक मजबूत झाली.
10 ऑक्टोबर 1984 रोजी खंडू रांगणेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. खंडू रांगणेकर हे केवळ एक खेळाडू नव्हते. ते जिद्दीचा, चिकाटीचा आणि निष्ठेचा जीवंत पुरावा होते. त्यांच्या हातातील बॅट, रॅकेट आणि सार्वजनिक जीवनातील प्रत्येक निर्णय हा एक प्रकारचा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी धडा आहे.