ठाणे शहरातील ऐतिहासिक राजवटींमध्ये बहुतेक सर्वात कमी काळासाठी राहिलेली राजवट म्हणजे ‘मराठा-पेशवा’ राजवट म्हणावी लागेल. 1737 मध्ये पेशव्यांनी पोर्तुगिजांच्या तावडीतून ठाणे शहर आणि परिसर मुक्त केला. त्यानंतर पेशव्यांचे सुभेदार बिवलकर कल्याणसह ठाण्याचाही कारभार पाहू लागले. याच सुभेदार बिवलकरांनी ठाण्यातील प्राचीन श्री कौपिनेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार केला. मात्र मराठ्यांची राजवट ठाण्यावर फक्त 37 वर्षे टिकली. साहजिकच या काळातल्या खाणाखुणा वास्तूंच्या रुपाने फारशा शिल्लक नाहीत. या काळात ठाण्यात उभे राहिलेले एक मंदिर आजही आहे.
स्थलांतर केलेली कुटुंब पेशवा राजवटीत पुन्हा ठाण्यात
पोर्तुगिजांच्या राजवटीत त्यांच्या धार्मिक छळाला कंटाळून अनेक कुटुंबांनी ठाणे शहरातून स्थलांतर केलं. अशा लोकांमध्ये होते एक पंडित कुटुंब. हे पंडित ठाण्यातल्या एका मंदिराचे उपाध्ये होते. मात्र पोर्तुगिजांच्या जाचाला कंटाळून त्यांनी ठाणे सोडले. पुढे 1737 मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर पंडित परत ठाण्यात आले. त्यांनी मग पेशवे दरबारातून आपल्या वृत्तीचे म्हणजे उपाध्येपदाचे हक्क पुनः मिळवले. 1748 साली पंडितांना पेशव्यांकडून ठाण्यातील मंदिराच्या उपाध्येपणाची सनद मिळाली. या पंडितांच्या मालकीची थोडी जमीन होती, तिथे श्री विठ्ठलाचे मंदिर उभारावे असे त्यांच्या मनात होते. सन 1817-18 मध्ये पंडितांच्या यजमानांनी म्हणजे ज्यांच्याकडची धर्मकृत्ये पंडीत कुटुंब करायचे त्या लोकांनी मदत केली आणि हे विठ्ठल मंदिर उभे राहिले. त्या वेळी पंडीत घराण्यातले विश्वनाथ विनायक पंडीत हे उपाध्याय म्हणून काम पाहात होते.
आळंदीत दानपत्र करुन मंदिर पंडितांच्या ताब्यात
विश्वनाथरावांनी नाशिक, त्र्यंबक, वाई या क्षेत्रांमधील शुक्लयजुर्वेदिय ब्राह्मणांना निमंत्रित करुन या मंदिरातील मुख्य मूर्तींची स्थापना केली. तेंव्हाच श्री विठ्ठल-रखुमाई बरोबर या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री रामेश्वर लिंग आणि श्री गणपतीचीही स्थापना करण्यात आली. चांगल्या कामात विघ्न आणू पाहणारे लोक असतातच. तशाच प्रवृत्तीच्या काही जणांनी पंडितांच्या या मंदिर उभारणीच्या कामात अडथळा आणला. मात्र पंडितांनी पेशवे दरबारातून निर्णय आणला आणि हे मंदिर ठाण्यात उभं राहिलं. पुढे 1824 साली ज्या यजमानांनी हे मंदिर उभारले होते, त्यांनी आळंदी येथे रितसर दानपत्र करुन हे मंदिर पंडित कुटुंबियांच्या हवाली केले. तेंव्हा पासून आजतागायत पंडीत कुटुंब वंशपरंपरागत या मंदिराची जबाबदारी सांभाळत आहेत.
हेही वाचा – ठाण्यातील पहिले सार्वजनिक सरकारी वाचनालय – म्युलक लायब्ररी
महिला विशेष किर्तन सप्ताह
1901 साली ‘विश्वनाथ विनायक पंडीत ट्रस्ट’ या नावाने एक संस्था मंदिराच्या देखभालीसाठी स्थापन करण्यात आली आहे. याच संस्थेमार्फत आता मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. सत्तरच्या दशकामध्ये याच पंडीत घराण्यातील कै.अच्युत अनंत पंडीत यांनी ठाणे नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपद भूषविले होते. आता यतीन अच्युत पंडीत या मंदिराचे व्यवस्थापन बघतात. आजपर्यंत या मंदिरात मामासाहेब दांडेकर, जेजूरकर महाराज अशा अनेक नामवंत किर्तनकारांनी आपली किर्तन सेवा रुजू केली आहे. दरवर्षी या मंदिरात महिला विशेष किर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते. तसेच भागवत सप्ताह, गीता सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह असे सप्ताह आवर्जून आयोजित केले जातात. ठाण्यातली भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्यात या विठ्ठल मंदिराचा मोठा वाटा आहे.
बाजाराच्या गजबजाटापासून अलिप्त
2016 मध्ये या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. तेंव्हा मंदिरातील मूर्तिंमध्ये श्री सप्तश्रुंगी देवीच्या मूर्तीची भर पडली. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशाला अनुसरुन कोव्हिड साथीच्या काळात मंदिराच्या ट्रस्टतर्फे गरजूंना अन्नदान केले जात होते. बाजारातल्या गजबजाटात असूनही त्यापासून अलिप्त असलेल्या आणि हरिनामाच्या गजराने जागृत असलेल्या या मंदिराचा हा सगळा इतिहास कळल्यावर आता हे मंदिर पाहाण्याची इच्छा नक्की झाली असेल मग, जेंव्हा ठाण्याच्या बाजारात भाजी खरेदीला याल किंवा कौपिनेश्वर मंदिरात दर्शनाला याल तेव्हा ठाण्याचा वारसा जपणाऱ्या या पेशवेकालीन मंदिराला अवश्य भेट द्या.
हेही वाचा – ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर
2 Comments
तुझ्या ठाणे हेरिटेज वॉक मध्ये या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष ऐकलेली माहिती आठवली . छानच आहे मंदिर आणि त्याचा इतिहास
मला या देवळाबद्दल कायम औत्सुक्य होते.छान माहिती मिळाली धन्यवाद.