सकाळची वेळ आहे, किनाऱ्यावरील धक्क्यावर लहान मचवे, होड्या लागलेल्या आहेत. थोड्या अंतरावर खोल समुद्रात दोन-तीन मोठी जहाजे उभी आहेत. त्यातलं एक आफ्रिका खंडाकडे जाण्यासाठी सज्ज आहे. या जहाजात कोकणात पिकलेला तांदूळ भरलेला आहे, तर दुसऱ्या जहाजात इराणहून आणलेले घोडे आहेत, तिसरं जहाज मलबारच्या किनाऱ्यावरुन जायपत्री, लवंगा, काळी मिरी असे मसाल्याचे पदार्थ घेऊन आलेलं आहे. बंदरावर आफ्रिकेतल्या, अरबस्थानातल्या, चीनमधून आलेल्या प्रवाशांची, व्यापाऱ्यांची, खलाशांची गर्दी आहे. त्यातच स्थानिक व्यापारी ज्यात हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांचा भरणा आहे ते लाट म्हणजे गुजराथीमध्ये बोलून सौदे पटवत आहेत. जरा दूरच्या शहरातील मोठ्या मंदिरातील घंटानाद अधून मधून ऐकू येत आहे. युरोपमधून आलेला गोरा धर्मोपदेशक हे सगळे दृश्य आपल्या नजरेन पाहाता पाहाता सोबतच्या डायरीत काही नोंदी करत आहे…..
मध्ययुगीन श्रीस्थानक – ठाणे
हे वर्णन एखाद्या काल्पनिक, ऐतिहासिक कादंबरीतलं नाही तर सुमारे एक हजार वर्षापूर्वीच्या, मध्ययुगातील ठाणे शहराचं आहे. आशियातील पहिल्या प्रवासी रेल्वेमार्गावरील स्थानक म्हणून इतिहासात नाव कोरणारं ठाणे शहर हे प्राचीन काळात एक उत्तम आणि समृध्द बंदर होतं. ठाण्याच्या इतिहासातील नोंदींनुसार सन 636 मध्ये बहारीन आणि ओमानचा सुभेदार उस्मान बिन असि सकिफी याने ठाण्याची लूट करण्यासाठी अरबस्थानातून जहाजांचा काफिला पाठवला होता. त्यानंतर चोवीस वर्षांनी-सन 660 मध्ये पुन्हा एकदा अरबी आक्रमकांनी ठाणे लुटून उध्वस्त केल्याची नोंद आहे. 10 व्या शतकातील अरब भुगोलतज्ञ इतिहासकार अल मसुदी याने आपल्या प्रवास वर्णनात भारतातील ‘तान्हा’ किंवा ‘तबह’ नावाने वर्णन केलेलं शहर म्हणजेच आजचं ठाणे. याच काळात म्हणजे सन 917 मध्ये ‘अल बरुनी’ या पर्शियन विद्वान इतिहासकार प्रवाशाने आपल्या पुस्तकात ठाण्याच्या उल्लेख सोपाऱ्याच्या (आजचे नाला सोपारा) दक्षिणेला 40 मैलांवर असलेली कोकणची राजधानी असा केला आहे. शिलाहार राजवटीतील जे ताम्रपट मिळाले आहेत त्यात ठाण्याचा उल्लेख ‘श्री स्थानक’ असा आढळतो.
बंदर आणि बेट हीच ठाण्याची ओळख
या सगळ्या काळखंडात ठाणे शहराची ओळख बंदर हीच होती. मुळात ठाणं हे एका बेटासारखं होतं. आजच्या सारखं ते रस्त्याने बाहेरच्या जगाशी जोडलेलं नव्हतं. रेल्वे किंवा रस्ता वाहतुकीसाठी ठाण्याच्या खाडीवर पूल बांधण्यात आले ते 19 व्या शतकात. त्यामुळे अगदी मुंबई बेटांवरुन ठाण्यात यायलाही जलमार्गाचाच वापर केला जात असे. जगप्रसिध्द जगप्रवासी मार्को पोलो याने ठाण्याला 13 व्या शतकात भेट दिली होती. त्याने ठाण्याबाबत लिहिले आहे की, ‘ठाणे येथे स्वतंत्र राजा असून, इथले लोक मूर्तीपूजक आहेत. या लोकांची भाषाही स्वतंत्र आहे. ठाण्याच्या बंदराला चाचे लोकांचा फार उपद्रव होतो. म्हणून येथिल राजाने त्यांच्याशी काही करार केला आहे.’
ठाण्याचा समृद्ध व्यापार आणि समुद्री लुटारुंशी करार
जनार्दन बाळाजी मोडक यांनी सन 1890 मध्ये लिहिलेल्या ‘ठाणे जिल्ह्याचे वर्णन’ या पुस्तकात असाही उल्लेख आढळतो की, जे लुटारू (समुद्री चाचे) लुटलेल्या जहाजावरील घोडे आपल्याला देतील त्यांना अभय देण्याचा करारच ठाण्याच्या राजाने त्यांच्याशी केला होता! 13 व्या शतकाच्या अखेरीस ठाण्याच्या बंदरात येणाऱ्या जहाजांमधून सोनं, चांदी, तांबे, कापूस, कापड आणि उत्तम प्रतिच्या चामड्याची आयात होत असे. 14 व्या शतकातला अरब प्रवासी आणि अभ्यासक ‘इब्न बतुता’ भारतात आलेला असताना खंबायतच्या आखातामधून कालिकतकडे जाताना वाटेत ठाण्यालाही थांबला होता. त्याने ठाण्याचा उल्लेख आपल्या लेखनात ‘कुकिन ताना’ असा केला आहे. याच काळात ठाण्यात आलेला आणखी एक अरबी प्रवासी म्हणजे रशिउद्दीन. त्यानेही ठाण्याचा उल्लेख ‘कोकण ताना’ असाच केला आहे. सन 1375 मधल्या कॅटालॅन मॅपवर ठाणे ‘क्युकिनताना’ म्हणून दाखवलेले पाहायला मिळते. सन 1324 मध्ये ओडोरिक हा इटलीमधून आलेला धर्मगुरु ठाण्यात राहिला होता. त्याने ठाण्याचं वर्णन करताना लिहिलं आहे की ठाणे हे वैभवशाली गाव असून, येथे खाण्यापिण्याची चंगळ आहे. येथे उत्तम मध मिळतो. इथले लोक अग्नी, सूर्य आणि वृक्ष यांची पूजा करतात.’ याच काळात ठाण्याचा तत्कालीन शासक असलेला निका मलीक याने आपल्या काझीच्या सांगण्यावरून ठाण्यात आलेल्या चार इटालियन धर्म प्रसारकांना ठार मारले. त्यातील एकाचे अवशेष ठाण्याच्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चमध्ये आजही जतन केले आहेत.
बांबूपासून साखर आणि तानाह सिल्क
ठाणे जिल्ह्यातील व्यापार शिलाहारांच्या काळात ज्या ‘तारवां’च्य (गलबतांच्या) मदतीने चालत असे ती गलबते कोकण, गुजराथ, मलबार आणि इराणी आखात येथे बांधलेली असत. साधारण 7 व्या शतकापासून ते 13 व्या शतकापर्यंत ठाणे हे भरभराटीला आलेलं बंदर होतं. या काळात ठाण्यात तयार होणाऱ्या ‘तबाशिर’ म्हणजे बांम्बू पासून बनवलेल्या साखरेची निर्यात होत असे. ठाण्यात तेव्हा ‘ठाणा सिल्क’ म्हणजे खास प्रकारचे रेशमी कापड विणले जात असे. आजच्या ठाण्यातील राबोडी-के. व्हिला. परिसरात त्या काळात ‘खत्री वाडा’ म्हणजे विणकरांची वसाहत होती. या वसाहतीत रेशमी कापड विणणारे आणि सुती कापड विणणारे असे हजारो विणकर राहात होते. ठाणा सिल्क युरोपपर्यंत प्रसिध्द होते. हिंदुस्थानाकडे जाणाऱ्या मिशनऱ्यांना रोममधल्या पोपची आज्ञाच होती की, त्यांनी ‘तानाह सिल्क’ विकत घेऊन पाठवावे. मात्र पुढे 16 व्या शतकात पोर्तुगिजांनी ठाणे ताब्यात घेतल्यानंतर हे विणकर धर्मांतराच्या भितीने भिवंडीला पळून गेले.
ठाणे बंदराला उतरती कळा
पोर्तुगिजांनी सन 1535 मध्ये ठाणे ताब्यात घेतलं, तेव्हा बंदर म्हणून ठाण्याला तशी उतरती कळा लागली होती. मात्र ठाण्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन पोर्तुगिजांनी ठाण्याच्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी चोख व्यवस्था उभारली. त्यांनी ठाण्यात घोडबंदर पासून ते आजच्या महागिरी कोळीवाड्यापर्यंत किनाऱ्यावर चौकी-पहाऱ्यासाठी छोटे छोटे किल्ले बांधले. त्यातील गायमुख, नागला बंदर येथील किल्ल्यांचे अवशेषच जेमतेम शिल्लक आहेत. तर घोडबंदरच्या किल्ल्याचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. पोर्तुगिजांनी बांधायला घेतलेला ठाण्यातला मोठा किल्ला आजही ठाणे-कळव्याच्या सिमारेषेवर पाहायला मिळतो. हा किल्ला अपूर्ण असतानाच पेशव्यांनी ठाणे पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केलं. पुढे ब्रिटिशांनी ठाणे जिंकल्यावर या किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले.
कोळी समुदायामुळे ठाण्याचा समुद्राशी संबंध टिकून
14 व्या शतकात बहमानी राज्याची राजधानी कलबुर्गी झाली आणि ठाण्याचे बंदर म्हणून महत्व कमी झाले. या राजवटीत चौल आणि दाभोळ या बंदरांची भरभराट झाली. पुढे ब्रिटिशांनी मुंबईचा विकास केला आणि ठाण्यापेक्षा मुंबई बंदर अधिक सोईचे झाले. त्यामुळे हळूहळू बंदर ही ठाण्याची ओळख पुसली गेली. मात्र ठाण्यातले चेंदणी व महागिरीचे मोठे कोळीवाडे आणि ठाण्याच्या किनाऱ्यावरील अन्य गावांमधील मच्छिमार समाजामुळे ठाण्याचा समुद्राशी संबंध टिकून राहिला. आजच्या स्मार्ट सिटी ठाणेचं भविष्यातील आकर्षण मेट्रो सेवा ठरणार असलं तरी, ठाणे हे मूळच समृध्द बंदर होतं हे विसरता कामा नये.
संदर्भ ठाणे गॅझेटियर 1882
ठाणे जिल्ह्याचे वर्णन जनार्दन बाळाजी मोडक 1891
ऐतिहासिक ठाणे संकलन दा. बा. देवल 1988
9 Comments
खूपच छान माहिती मिळाली. ठाण्याच्या इतिहासाची ओळख झाली. धन्यवाद!
माहिती आणि अभ्यासपूर्ण लेख….एक वेगळंच ठाणं डोळ्यासमोर उभं राहिलं… धन्यवाद मकरंद 🙏
ठाणे शहराबद्दल खूप माहितीपूर्ण लेख ,
अशीच नवनवीन माहिती पाठवा.
धन्यावाद.
ठाण्या बद्दल जितकं वाचावं तितकं कमीच, ठाण्याच्या अजून प्रेमात पडता येत .. नशीबवान आहोत की आपण इथे राहतो…
छान !
भारी माहितीपूर्ण लिखाण.लिहीत रहा.
आवडले.
अभ्यासपूर्ण तसेच माहितीवर्धक लेख. खूप छान
फारच छान लिहिले आहे आणि खूप माहिती देणारा लेख