दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ असेल, एखाद्या टीव्ही सिरीयलमधल्या एका एपिसोडमधल्या एका प्रसंगातल्या एका मिनिटासाठी झळकलेल्या तथाकथित अभिनेत्रीला महाराष्ट्रातलं आघाडीचं वर्तमानपत्र तिचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन विचारायचं…आणि ती फुटकळ अभिनेत्रीही तिचा जीवनविषयक दृष्टिकोन सांगून मोकळी व्हायची. तिला आपण एका मिनिटासाठी टीव्हीवर झळकल्यामुळे आपण सर्वव्यापी सेलिब्रिटी झालो आहोत, असं वाटायचं. आपण कोणत्या तरी परग्रहावरून पृथ्वीवर अवतरलो आहोत असं वाटायचं. हे केवळ अभिनेत्रीबाबत नाही तर अभिनेत्यांच्याबाबतीतही घडायचं. आजही हे चित्र बदललेलं नाही. अशा वेळी एका जमान्यातल्या ठाण्यातल्या चंदू पारखी नावाच्या अभिनेत्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.
चंदू पारखी जाऊन आज सत्तावीस वर्षं झाली. सत्तावीस वर्ष हा काही थोडाथोडका काळ नव्हे. इतक्या प्रदीर्घ काळात एखाद्या माणसाची आठवण निश्चितच अंधुक होऊ शकते तशी ती अंधुक झाली असेलही. पण अभिनेता म्हणून जनमानसात प्रसिध्दीचं वलय मिळवल्यावरही ते कायम सर्वसामान्य माणसासारखेच, सर्वसामान्यातल्या सर्वसामान्यासारखेच राहिले. ह्याची आठवण काही जुन्याजाणत्यांच्या मनात आजही असेल!
हे ही वाचा : पी. सावळाराम : सजग, जागरूकता, भावनाप्रधान कवी !
प्रसिद्धीच्या वलयातही रोजच्या जीवनातला साधेपणा
चंदू पारखी हे नाव जेव्हा अभिनयाच्या क्षेत्रात उदयाला आलं, तेव्हा टीव्हीवर आजच्यासारखं चॅनेल्सचं जंजाळ निर्माण झालं नव्हतं. दूरदर्शनखेरीज एक-दोन सॅटेलाइट चॅनेल्स उपलब्ध होते. मनोरंजनासाठी छोट्या पडद्यावर आजच्यासारखे भरपूर पर्याय नव्हते. अशा काळात जे कलाकार मर्यादित सिरियल्समधून चमकत होते, त्यांना भरपूर प्रसिध्दी मिळत होती. ह्या कलाकारांना रस्त्यात जाताना लोक मान वळवून वळवून बघायचे. त्यांच्या नावाला एक अनोखं वलय प्राप्त व्हायचं. ह्या अशाच वलयदार काळात चंदू पारखींना त्यांच्या लाइफलाइन वगैरे सिरियलमधून जोरदार लोकप्रियता मिळाली. चंदू पारखी हे नाव घराघरात पोहोचलं. घरादारात नावाजलं गेलं. वर्तमानपत्रात, सिनेमॅगझिन्समध्ये चमकलं. खरंतर इतकी लोकप्रियता मिळाल्यानंतर एखाद्या कलाकाराचे पाय जमिनीवर राहिले नसते तर त्याचं कुणाला नवल वाटलं नसतं. पण चंदू पारखींच्या बाबतीत हे नवल घडलं नाही. इतकी लोकप्रियता मिळाल्यानंतरही चंदू पारखी साध्या माणसासारखे साध्या पोषाखात, साध्या कपड्यांत वावरत राहिले. प्रसिध्दीचं वलय, रूपेरी ग्लॅमर कुरवाळत बसले नाहीत. ठाण्यातल्या लुईस वाडीतल्या घरून निघताना रस्त्यातल्या एखाद्या वाटसरूसारखे ते कधी पायी निघायचे. कधी कधी तर चक्क लोकलने प्रवास करायचे.
रंगायतनमधल्या प्रयोगाकरता घरातून पायी
त्याच काळात चंदू पारखींचं निष्पाप नावाचं एक नाटक जोरात चाललं होतं. महाराष्ट्रभर ह्या नाटकाचे तुफान प्रयोग होत होते. पण ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये जेव्हा ह्या नाटकाचा प्रयोग व्हायचा तेव्हा चंदू पारखी घरातून चालत रंगायतनपर्यंत पोहोचायचे. आपण कुणी प्रसिध्द अभिनेते आहोत ह्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा नाही. आपण कुणीतरी सेलिब्रिटी झालो आहोत ह्याचं कणभरही भान त्यांना नसायचं. साध्या सदऱ्यातले चंदू पारखी त्यांच्या रंगकर्मींच्याच परिघात राहायचे नाहीत. त्यांना अगदी साध्या, फाटक्या अंगाच्या, किरकोळ माणसांमध्ये जाऊन बसणं आवडायचं. त्यांचे सहकारी त्यांना त्यांच्यातल्या लोकप्रिय अभिनेत्याचा, सेलिब्रिटीचा आब राखून वागायची सूचना करायचे. पण चंदू पारखी त्यांच्या ह्या सुचनेला अजिबात भीक घालायचे नाहीत. ज्या साध्या माणसांसाठी आपण आपली कला सादर करतो त्यांच्यात जाऊन आपण बसलो, त्यांच्यात जाऊन आपण मिसळलो तर त्यात बिघडलं काय, असा त्यांचा रोकडा सवाल असायचा. रंगमंचावर, कॅमेऱ्यासमोर कोणतीही भूमिका वठवून झाल्यावर आणि चेहऱ्यावरचा मेकअप उतरवल्यानंतर त्यांना आपण लोकप्रिय अभिनेते कशाला, अभिनेतेच आहोत ह्याचा विसर पडायचा. आपण ग्लॅमरच्या दुनियेतले कुणी चमचमणारे तारे आहोत हे त्यांच्या गावीही नसायचं. कष्टाची कमाई करून आपल्या ताटातली भाजीभाकरी खाणाऱ्या आपल्या अवतीभोवतीच्या जनतेसारखेच आपण आहोत, आपण त्यांच्यासारखंच साधंसरळ वागायला हवं असं त्यांचं मत असायचं.
भुकेवरचं अघोरी औषध
चंदू पारखींचं असं मत असण्यामागचं तसंच कारण होतं. चंदू पारखी मूळचे इंदूरचे. अभिनयाची त्यांना लहानपणापासून आवड होती. तिथल्या नाट्यचळवळीत म्हणूनच त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. अभिनयापासून आपलं लक्ष जराही ढळता कामा नये म्हणून नोकरी करण्याच्या डांबरी रस्त्यावर फिरकायचं नाही असा निर्णय घेतला. पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे होताच. पण आयुष्यात अभिनयाच्या वाटेवरचा मुशाफिर व्हायचं ठरवल्यामुळे हा प्रश्न त्यांनी दुय्यम ठरवला. कधी स्वत:चं मन मारलं, कधी स्वत:चं पोट मारलं. तशाच एखाद्या वेळी ते उपाशीपोटी राहिले. कधी लोटाभर पाणी पिऊन झोपी गेले. ह्या माणसाने भूक मारण्याचं औषध शोधलं होतं. खूपच भूक लागली आणि खिशात ती भूक भागवण्यासाठी पैसे नसले तर ते खिशात ठेवलेल्या लसणाच्या चार-पाच पाकळ्या खात आणि ग्लासभर पाणी पित. त्यांच्या निष्पाप नाटकाच्या तालमी सुरू असताना भुकेवरच्या त्यांच्या ह्या अघोरी औषधामुळे त्यांना प्रचंड थकवा आला. मोठा आजार झाला. पण तो त्यांनी नाटकातल्या आपल्या सहकाऱ्यांना कळू दिला नाही. त्यांना जर त्याची भुणभुण लागली तर आपल्या हातचं नाटक जाईल आणि आपल्या हातचा पैशापाण्याचा एक स्रोतही जाईल म्हणून आपण तंदुरुस्त असल्याचा अभिनय केला.
हे ही वाचा : सिनेमा पहाणारं ठाणं!
मुंबईत येऊन स्थिरस्थावर
चंदू पारखींना इंदूरमधल्या नाट्यवर्तुळात जेव्हा ओळख मिळाली तेव्हा त्यांचा कसदार अभिनय फक्त इंदूरपुरता मर्यादित न राहता तो सर्वदूर पोहोचावा असं इंदूरमधल्या त्यांच्या मित्रांना, चाहत्यांना वाटू लागलं. त्यांनी चंदू पारखींना मुंबईचा रस्ता धरण्याची सूचना केली. स्वत: चंदू पारखींनाही मुंबईत जाऊन आपलं नशीब अजमावावं असं मनोमन वाटू लागलं. एके दिवशी खिशात केवळ इनमिन रूपये घेऊन त्यांनी मुंबईची बस पकडली. मुंबईत मित्रमंडळींकडे राहू लागले. कालांतराने दूरदर्शनवर त्यांना काही काम मिळू लागलं. हळुहळू त्यांच्या अभिनयाची दखल मुंबईतले रंगकर्मी घेऊ लागले. त्यांना नाटकं-सिनेमात काम करण्यासाठी बोलावणं येऊ लागलं. सिरियल्समध्ये, विशेषत: हिंदी सिनेमात झळकण्याची संधी मिळू लागली. चंदू पारखी हे नाव नावारूपाला येऊ लागलं. त्यांच्या आयुष्याचा पतंग स्थिरावू लागला. ठाण्यात त्यांना घर मिळालं. ठाण्यात पायी त्यांची भटकंती सुरू झाली. आपल्याला नाव मिळालं, कीर्ती मिळाली, पैसा मिळाला तरी ह्या माणसाचे पाय जमिनीवर घट्ट राहिले. ते आभाळाला टेकले नाहीत. त्यांनी आभाळाला टेकवलेही नाहीत. ते तिथेच राहिले, जिथे होते तिथेच. त्यांना गोरगरीबांच्या जगण्याचं असलेलं कुतुहल कायम राहिलं. समोर भिकारी आला तर त्या काळात त्याच्या कटोऱ्यात चक्क शंभर रूपयाची नोट सरकवू लागले. पैशांचा, किर्तीचा अहंकार त्यांना शेवटपर्यंत शिवला नाही. ते सर्वसामान्य माणसात मिसळत राहिले. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही, ग्लॅमर मिळूनही त्यांना आपल्यातलं सर्वसामान्य माणूसपण आवडलं, आवडत राहिलं. तेच त्यांनी आपल्यात टिकवून ठेवलं. ग्लॅमरच्या गर्दीत हरवू दिलं नाही.
चंदू पारखींनंतर आज मात्र ग्लॅमरच्या दुनियेतला तसा सिधासाधा माणूस अभावानेही आढळत नाही!