ठाणेकरांच्या मनातील राजे ‘धर्मवीर आनंद दिघे’!

Thane: ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय उन्नतीमध्ये ज्यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद दिघे, होय. ठाण्याच्या मातीतील एक जननायक म्हणून आनंद दिघे यांना संबोधले जाते. ठाण्यासाठी भूषणावह असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या एकंदरच जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊयात…
[gspeech type=button]

जे नेते मरणानंतरही लोकांच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत राहतात, त्यांचं अस्तित्व शब्दांत मावणं अशक्य असतं. ठाणे शहरात एक काळ होता, जेव्हा लोक कोणत्याही संकटात असो, पहिलं नाव आठवायचं ते म्हणजे आनंद दिघे. त्यांचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर उभं राहतं एक साधी वेशभूषा असलेलं पण अतिशय करारी व्यक्तिमत्त्व. भरगच्च वाढलेली दाढी, कपाळावर गंध आणि डोळ्यांत एक धगधगतं तेज. लोकांच्या मनातला ‘राजा’! अर्थात धर्मवीर आनंद दिघे.

जन्म आणि बालपण

आनंद चिंतामण दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1951 रोजी ठाणे शहरात एका मध्यमवर्गीय, पारंपरिक मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील चिंतामण दिघे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ होते. घरात शिस्त, साधेपणा आणि मूल्यांचा आग्रह असलेलं वातावरण होतं. त्यामुळेच आनंद दिघेंच्या व्यक्तिमत्त्वावर घरातील संस्कारांचा खोल प्रभाव पडला. लहानपणापासून आनंद दिघेंमध्ये नेतृत्वगुण, संवेदनशीलता आणि जाणीवशीलता होती. ते शिक्षणात फारसे गढून गेले नव्हते, पण समाजाकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या मनात लवकरच विकसित झाली होती. त्यांनी ठाण्यातील स्थानिक शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि काही काळ खासगी व्यवसायही केला. पण त्यांच्या मनाला समाजासाठी काहीतरी करण्याची आस लागली होती.

राजकारणातून ठाण्याच्या विकासाचे ध्येय

1980 च्या दशकात शिवसेना ठाणे परिसरात हळूहळू विस्तार करत होती. हाच काळ होता जेव्हा आनंद दिघेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पक्षाच्या विचारधारेशी पूर्णतः एकरूप होत पक्षसंघटनेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा प्रभाव इतका लवकर आणि खोलवर पसरला की काही वर्षांतच ते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पोहोचले. ते केवळ पद भूषवणारे नव्हते. तर ते जनतेत रमणारे सच्चे कार्यकर्ते होते. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा  बालेकिल्ला बनवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी पक्षसंघटना, शिस्त आणि सामाजिक कार्य या त्रिसूत्रीवर ठाण्यातील राजकारणात वेगळी छाप सोडली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधीही स्वतः निवडणूक लढवली नाही. त्यांना सत्तेची हाव नव्हती. त्यांना हवी होती लोकांची सेवा. जनतेच्या मनात घर करणं, हेच त्यांचं खऱ्या अर्थाने राजकारण होतं. राजकारणातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेऊन त्यांना कार्यरत राहण्याला प्राधान्य दिलं.

हेही वाचा – डॉ. दाऊद दळवी- ठाण्याचे इतिहासपर्व जागवणारे व्यक्तिमत्त्व

प्रत्येक गरजवंताचा आधार…

आनंद दिघे यांचं कार्य केवळ राजकारणापुरतंच मर्यादित नव्हतं. ठाण्याच्या टेंभी नाका येथील ‘आनंदाश्रम’ हे त्यांचं कार्यालय म्हणजे ठाणेकरांचं ‘संकटमोचक केंद्र’ होतं. एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आनंद दिघे तत्काळ हालचाल करत. शेकडो रुग्णांची औषधं, ऑपरेशन खर्च, हॉस्पिटल बिलं त्यांनी स्वतःच्या खिशातून भरली. त्यांनी शिवसेना सेवा मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, भूकंपग्रस्त व पूरग्रस्त भागात मदतकार्य, महिला आणि वृद्धांसाठी साहाय्यता केंद्र यासारखे विविध उपक्रम हाती घेतले. त्यांची मदत कुठल्याही जाती-धर्माच्या आधारावर नव्हती, तर ‘मानवता’ हाच एकमेव निकष होता.

आनंद दिघे लोकांसोबत


शिस्त, निष्ठा आणि करारीपणा

आनंद दिघे अत्यंत शिस्तप्रिय होते. पक्षातील शिस्तभंग सहन केला जात नसे. त्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही गोंधळ नसायचा. त्यांचं म्हणणं होतं – “पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा, अन्यथा घरी जा.” त्यांनी पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचं ठाण्यातील त्या काळातील बदलत्या राजकीय समीकरणाला उदाहरण घालून दिलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुढे अनेक कार्यकर्ते आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक झाले. आनंद दिघे हे निर्भीड होते. त्यांनी अनेकवेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमता, राजकीय विरोधकांची झोप उडवणाऱ्या कृती आणि सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांचं नाव घेतलं की विरोधकांमध्येही दरारा आणि आदराची भावना निर्माण होत असे.

हेही वाचा – मनकवडे जादूगार डॉ. आनंद नाडकर्णी

आठवणीतील किस्से

धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी ठाणेकरांच्या मनात अनेक स्मृती आहेत. एकदा एका मुलीवर अन्याय झाला तेव्हा आनंद दिघेंनी पोलिस ठाण्यात जाऊन स्वतः हस्तक्षेप केला आणि तिला न्याय मिळवून दिला. एका गरीब कुटुंबाचं घर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून वगळण्यात आलं होतं. आनंद दिघेंनी अधिकाऱ्यांवर तगडा दबाव टाकून त्या कुटुंबाला योग्य पुनर्वसन मिळवून दिलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फी, पुस्तकं, वह्या ह्या गोष्टी नियमितपणे त्यांनी पुरवल्या. आजही असे शेकडो विद्यार्थी आहेत, जे “मी आज डॉक्टर,वकील आहे, ते आनंद दिघेंमुळे” असं अभिमानाने म्हणतात. टेंभी नाका नवरात्रौत्सव आणि दहीहंडी उत्सव सुरु करून ठाण्याच्या सांस्कृतिक विकासात मोलाची भर घालण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं.

धर्मवीर उपाधी

एका अपघातानंतर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना 26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांचं निधन झालं. ही बातमी जशी ठाण्यात पोहोचली, तसं शहर थरथरून गेलं. हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी झाली होती. रस्त्यांवर भगवे झेंडे, हातात फुलं, डोळ्यांतून वाहणारे अश्रू – प्रत्येकजण दुःखात बुडाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांना “धर्मवीर” ही उपाधी देण्यात आली. धर्म आणि समाजासाठी झटणारा वीर, अर्थात धर्मवीर…आज ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे सभागृह, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले पुतळे, तसेच त्यांच्या नावाने चालणारे उपक्रम त्यांच्या कार्याची आठवण करून देतात.

नेता गेला, पण विचार शिल्लक 

धर्मवीर आनंद दिघे हे नाव केवळ एका व्यक्तीचं नसून त्यांच्या विचारांचं, कार्यशक्तीचं आणि जनसेवेच्या वृत्तीचं प्रतीक आहे. आजही ठाणेकर कुठल्याही अडचणीत असताना ‘धर्मवीर आनंद दिघेंचं’ नाव घेतात, कारण ते एका युगाचं प्रतीक बनलं आहे. ते आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत पण लोकांच्या हृदयाचे अधिपती मात्र नक्कीच झाले. धर्मवीर आनंद दिघेंची स्मृती, प्रेरणा आणि शिकवण ठाणेकरांच्या नसानसांत आजही वाहते, आणि भविष्यातही वाहत राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : 1937 नंतर ठाणे नगरपालिकेची स्वतःची वास्तू उभी राहिली.बाजारपेठेतील स्टेशन रोडवरच्या या वास्तूमधून पुढे सतरा-अठरा वर्षे – महापालिका झाल्यावरही
Thane : ब्रिटिशांनी ठाणे शहराच्या जडण घडणीवर सर्वात मोठा परिणाम घडवून आणणारी एक संस्था, एक यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा
Thane : वाढलेल्या ठाणे शहराच्या बदलेल्या चेहऱ्या मोहऱ्यात ही ऐतिहासिक खूण काहीशी लपलेली आहे. ठाण्यातील जुना स्टेशन रोड - सुभाष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ