ठाणे या ऐतिहासिक जिल्ह्याची ओळख सामाजिक चळवळीत अमूल्य योगदान देणा-या स्वातंत्र्यसैनिकांशिवाय अपूर्ण आहे… एक ठाणेकर व्यक्तीमत्त्व म्हणजे स्व. दत्ताजी ताम्हाणे होय. ज्यांच्याशिवाय ठाणे जिल्ह्याचा निर्माणाधीन काळ हा अपूर्ण आहे. आयुष्यभर देशप्रेम जपलेले ठाणेकर स्वातंत्र्यसैनिक स्व. दत्ताजी ताम्हाणे यांच्याविषयी जाणून घेऊयात….
दत्ताजी ताम्हाणे यांचा जन्म दिनांक 13 एप्रिल 1913 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला.
दत्ताजी ताम्हाणे यांचे वडील पोस्ट मास्तर होते. त्यांना कवितांची खूप आवड होती. ते मुलांकडून जुन्या आणि नव्या कवितांचं पाठांतर करून घ्यायचे. या संस्कारांमुळे दत्ताजी आणि त्यांच्या सगळ्या भावंडांमध्येही कविते विषयी रुची निर्माण झाली.
1922 साली ताम्हाणे कुटुंब ठाण्यात स्थायिक झालं. ठाण्यातल्या बी. जे. हायस्कूल आणि मो. ह. विद्यालयात दत्ताजी ताम्हणे यांचं शिक्षण पूर्ण झालं. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपल्यामुळे दत्ता ताह्मणे यांना विद्यार्थीदशेत असताना आर्थिक अडचणीचे चटके बसले. पण कुटुंबातील प्रेमळ आणि एकोप्याच्या वातावरणामुळे त्यांच्या मनाला कधी कटुतेचा स्पर्श झाला नाही.
सामाजिक चळवळीत सहभाग
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी, 1930 सालच्या ऐतिहासिक दांडीयात्रेत दत्ता ताम्हाणे यांनी सहभाग घेतला होता. 1932 च्या चळवळीत ही त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर 1934 मध्ये त्यांना ठाणे तालुका काँग्रेस कमिटीवर घेतलं. तेव्हा त्यांनी शिक्षण सोडून स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीसाठी वाहून घेतलं.
महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय स्वामी आनंद यांचा ठाण्याजवळ आश्रम होता. दत्ताजी तिथे दाखल झाले. तिथून सेवाग्रामच्या आश्रमात दत्ताजींची रवानगी झाली. 1937 सालापासून ते पूर्ण वेळ राजकीय काम करू लागले. दत्ता ताम्हाणे हे विचाराने समाजवादी होते. ‘पण मार्क्सवादी तत्त्वप्रणालीच्या पलीकडे जाऊन समाजवादाला गांधीवादी विचारांची जोड असली पाहिजे,’ ही त्यांची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात सतत मांडली.
संघर्षाची ठिणगी
1932 साली सामाजिक जाणिवांचा दत्ताजी ताम्हाणे यांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ लगाला. सतरा-अठरा वर्षांच्या तरुण दत्ताजी ताम्हाणे हे चळवळीत भाग घेतानाच पुस्तके वाचत, पुढाऱ्यांची भाषणे ऐकत होते, समवयस्क मित्रांशी चर्चा करीत होते, वादविवाद करीत होते, स्वतः सतत विचार करीत होते. यातूनच त्यांच्या ध्येयवादाला आकार मिळाला. स्वातंत्र्याइतकीच समीक्षा आपल्या समाजात रुजली पाहिजे, यासाठी त्यांनी वैयक्तिक आनंदाकडे पाठ फिरवून समर्पण भावनेने राजकीय कार्याला सुरुवात केली.
हे ही वाचा : मनकवडे जादूगार डॉ. आनंद नाडकर्णी
आदिवासी समाजाचा भाग्यविधाता
स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस असताना ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ते पायी चालत फिरत असत. या पायी वारीत पालघर, डहाणू, उंबरगाव तालुक्यापर्यंत फिरत असत. या सगळ्या भागातील वारली, शहापूर-मुरबाड भागातील ठाकूर आणि डोंगरपट्टीतील गरीब शेतकरी यांच्या दुःखाने ते व्यथित झाले. या सगळ्या बांधवांसाठी ते विविध आंदोलनांच्या माध्यमातून झगडत राहिले.
कुळकायदा झाल्यावर गावोगाव फिरून कुळांना जमिनी मिळाव्या, म्हणून दत्ताजी ताम्हाणे यांनी मोठे कष्ट घेतले. आदिवासींना कुळकायद्यान्वये मिळालेल्या जमिनी सावकारांनी बळकावल्या, त्या त्यांना परत मिळाव्यात यासाठी 1966 सालापासून दत्ताजी ताम्हाणे यांनी लढा उभा केला. 1968 साली विधान परिषदेत निवडून आल्यावर महसूल मंत्र्यांपुढे त्यांनी हे सर्व प्रश्न मांडले. त्याचवेळी आदिवासींबरोबर सत्याग्रहही केला. या सत्याग्रहानंतर सरकारने एक खास अधिकारी नेमला; आणि जव्हार, पालघर आणि डहाणू तालुक्यांतील अनेक आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्या.
हे ही वाचा : ठाण्याचे शिक्षणमहर्षी डॉ. वा. ना. बेडेकेर
तुरूंगवासाची वारी…
दत्ताजी ताम्हाणे यांनी 1942 साली दोन वर्षे कारावास भोगलाच, पण स्वातंत्र्योत्तर काळातही चळवळींच्या आघाडीवर राहून त्यांनी अनेकदा तुरुंगाच्या वाऱ्या केल्या.
धान्य भाववाढ विरोधी सत्याग्रह त्यांनी ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे चालवला. या सत्याग्रहा दरम्यान त्यांना शिक्षा झाली. मिठागर कामगारांच्या लढ्यात तीन महिने, आणि पर्नाळी येथील इनाम जमिनीबाबतच्या लढ्यात तीन महिने अशा शिक्षा त्यांनी भोगल्या आहेत.
गोवा लढ्यात ईश्वरभाई देसाईंच्याबरोबर ते दमणला गेले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्यावेळी बेळगावला सत्याग्रहासाठी पाठवलेल्या खास तुकडीत ते होते. यासाठी त्यांना सहा महिने तुरुंगवास घडला होता. भूमि-मुक्ती आंदोलनात त्यांना पंधरा दिवस शिक्षा झाली होती.
1942 च्या आंदोलनाच्या वेळी दत्ताजी गवालीया टँकवरच्या सभेतून परत आल्यावर रात्री बारा वाजताच त्यांना राहत्या घरातून अटक करून ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं होतं. या 18-19 महिन्यांच्या कारावासात दत्ताजींनी ॲग्रो इकॉनॉमिक्सपासून ते कम्युनिझमपर्यंत अनेक विषयांवर वाचन करून आपले ज्ञान वाढवले. याच काळात ते उर्दू आणि बंगाली भाषाही शिकले.
ठाण्याच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर दत्ताजींनी ठाणे जिल्ह्यातल्या 1767 खेडेगावांपैकी 1162 गावांना स्वतः भेट देऊन तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेतले.
उत्कृष्ट संसदपटू
1957 साली दत्ता ताम्हाणे हे विधानसभेत प्रथम निवडून आले. ते जे काम स्वीकारावयाचे त्यात प्राण ओतायचे. या त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी विधिमंडळातील कामाला सुरुवात केली. संसदीय कामातील नियम आणि कायद्यातील बारकावा यावर दत्ता ताह्मणे यांची पकड असे. केवळ नियमांवर प्रभुत्व हे त्यांच्या कामाचे एकमेव वैशिष्ट्य नव्हते. प्रत्येक विधेयकाचा ते सूक्ष्म अभ्यास करीत आणि वेगवेगळ्या कलमांचा आशय त्यांच्या चटकन लक्षात येई. महसूल, वन, सहकार या विभागातील जी अनेक विधेयके विधानपरिषदेत पंधरा-वीस मिनिटांत संमत होत असे. पण त्याच विधायकांवर विधानसभेमध्ये दत्ता ताह्मणे हे तासन् तास चर्चा करत असत. त्यांच्या प्रश्नांपुढे मंत्री हवालदिल होत. विधेयकांना दुरुस्त्या देण्यात दत्तांचा हातखंडा असे अशावेळी रामभाऊ म्हाळगींसारखे वकिलीत मुरलेले संसदपटूही दत्तांना भेटून म्हणे, “दत्ता, माझ्या नजरेतून सुटलेला मुद्दा तू बरोबर पकडलास!”
हे ही वाचा : ठाणेकरांचा जगभरात पोहोचलेला आवाज – उदय सबनीस
कुटुंबवत्सल दत्ताजी ताम्हाणे
स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यावर या लढ्यात आपले काहीही होईल, तेव्हा पाश निर्माण करायचे नाहीत म्हणून दत्ताजींनी काही मित्रांबरोबर अविवाहित राहण्याची शपथ घेतली होती. मात्र स्वतः लग्न करून कुटुंब थाटलेलं नसलं तरीही दत्ताजी आपल्या भावांच्या – वडील बंधू ग. बा. तथा अण्णा ताम्हाणे, लहान भाऊ वि. बा. तथा नाथा ताम्हाणे यांच्या संसारात-कुटुंबात मिसळून गेलेले होते. दत्ताजी स्वभावाने अतिशय कुटुंबवत्सल होते. घरातल्या सगळ्या समारंभात ते आवर्जून सहभाग घेत. तसंच दरवर्षी कौटुंबिक सहलचंही स्वतः नियोजन करत असत.
हे ही वाचा : डॉ. दाऊद दळवी– ठाण्याचे इतिहासपर्व जागवणारे व्यक्तिमत्त्व
महत्त्वपूर्ण योगदान…
1961 मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘कळीचा घोडा’ या बालकथांच्या पुस्तकाला राज्य शासनाचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे त्यांनी कुळकायद्यावरती आणि कर्ज निवारण कायद्यावरती माहितीपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. ठाणे जिल्ह्याचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिण्याच्या कामातही ते सहभागी झाले होते. या प्रकल्पातून अतिशय महत्त्वाचे दस्त ऐवजीकरण झालं होतं.
वयाची शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान ज्या थोड्या स्वातंत्र्यसैनिकांना लाभला, त्यात ठाणेकर दत्ताजी एक होते. 6 एप्रिल 2014 रोजी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे ठाणेकर स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचे देहावसन झाले. साधी राहणी आणि उच्च विचार जपत आयुष्यभर समाजाला वाहून घेणा-या स्व. दत्ताजी ताम्हाणे यांना प्रत्येक ठाणेकर कायम स्मरणात ठेवेल.
1 Comment
छान माहिती