ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये सर्वात महत्वाचा कालखंड म्हणजे ठाण्यावरची ब्रिटिश राजवट. 1774 ते 1947 अशी 173 वर्षे ठाणे शहरावर ब्रिटिशांचे शासन होतं.या प्रदिर्घ राजवटीत ठाणे शहराच्या सामाजिक- राजकीय-सांस्कृतिक पर्यावरणात अनेक बदल घडले, आणि या शहराला एक ठाशीव आकार प्राप्त झाला. ब्रिटिशांनी ठाण्यात पहिलं सार्वजनिक वाचनालय, सरकारी इस्पितळ, सरकारी शाळा सुरू केली त्याच प्रमाणे या शहराच्या जडण घडणीवर सर्वात मोठा परिणाम घडवून आणणारी एक संस्था, एक यंत्रणा त्यांनी सुरू केली. ही यंत्रणा गेली 162 वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. आणि या यंत्रणेमुळेच ठाणे शहराचा चौफेर विकास झाला असं नक्की म्हणता येईल. ही यंत्रणा म्हणजेच ठाण्याची स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ठाणे महानगरपालिका.
ठाणे म्युन्सिपल बरो ते महानगरपालिका
ठाणे महानगरपालिकेचा प्रवास ‘ठाणे म्युन्सिपल बरो’ म्हणून सुरू झाला. पुढे या बरोला ‘ठाणे नगरपालिका’ असं नाव मिळालं आणि 43 वर्षांपूर्वी वाढणाऱ्या-विस्तारणाऱ्या ठाणे शहराचा कारभार चालवण्यासाठी ‘ठाणे महानगरपालिका’ स्थापन करण्यात आली. इतिहासकाळातील एक समृध्द बंदर ते आधुनिक काळातील स्मार्ट सिटी हा प्रवास करणाऱ्या ठाणे शहराचा कणा असलेल्या ठाणे नगरपालिकेचा जन्म आणि पुढचा प्रवास अतिशय रोचक,रंजक,बोधपर आहे.
नगरसेवक नाही ‘नगरपिते’
ब्रिटिशांनी भारतावर आपली प्रशासकीय पकड बसवताना वेगवेगळ्या राज्यांमधील शहरांचा कारभार सुविहितपणे चालवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करायला सुरवात केली.ज्या शहरातील नागरिकांना अशी संस्था हवी असेल त्यांनी तसा अर्ज करावा, असे आवाहन भारताच्या गव्हर्नर जनरलकडून करण्यात आले. त्यानुसार ठाण्यातील जागरूक नागरिकांनी अर्ज केला. हा अर्ज जुलै 1862च्या गॅझेटमध्ये प्रसिध्द झाला. त्यानंतर 29 ऑक्टोबर 1862 रोजी गव्हर्नर साहेबांनी ठराव मंजूर केला की,1डिसेंबर 1862 पासून ठाणे म्युन्सिपल बरो स्थापन करण्यात यावा. मात्र सरकारी दफ्तर दिरंगाई म्हणा किंवा अन्य काही अडचणींमुळे म्हणा पण ठाण्याची नगरपालिका अस्तित्वात आली ती 10 मार्च 1863 रोजी. या ठाणे म्युन्सिपल बरोमध्ये वीस जणांचे प्रतिनिधी मंडळ होते. ज्यांना तेव्हा ‘कमिशनर्स’ असे म्हणत असत.आज आपण ज्यांना ‘नगरसेवक’ म्हणतो त्यांना सुरवातीच्या काळात ‘नगरपिते’ म्हणण्यात येत असे.
ठाणे म्युन्सिपल बरो स्थापन झाला तेव्हा, त्याचा कारभार चालवण्यासाठी कलेक्टर,जिल्हा न्यायाधिश,जिल्हा सिव्हिल सर्जन,मॅजिस्ट्रेट,पोलिस सुपरिंटेंडंट असे सरकारी नोकर नियुक्त करण्यात आले आणि नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, वकिल, सरकारी निवृत्त अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. ठाण्यात म्युन्सिपल बरोचा कारभार सुरू झाला तेव्हा, ठाणे रेल्वेमार्गावरचं महत्वाचं स्थानक बनलेलं होतं. मात्र शहरातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा, सार्वजनिक वैद्यकीय सेवा अशा काही मुलभूत सुविधांची उणिव होती. त्यामुळे पहिल्या काही वर्षांमध्ये या गोष्टींवर नगरपालिकेनं लक्ष केंद्रित केलं.
पहिल्याच निवडणूकीत मतदारयाद्या भिजून पुसल्या
ठाणे नगरपालिकेची निवडणूक स्थापनेनंतर तब्बल 22 वर्षांनी झाली. 26 ऑगस्ट 1885 रोजी ठाण्यातील नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. त्या वेळी सरसकट सगळ्या प्रौढांना मतदानाचा हक्क नव्हता. तर जे नागरिक दर साल पालिकेला 4 रुपये कर देत असतील, त्यांनाच मतदान करता येणार होते. ऐन पावसाळ्यात ही निवडणूक झाल्यामुळे की काय पण नगरपालिकेने प्रसिध्द केलेल्या मतदारांच्या याद्या पावसात भिजल्या आणि चक्क पुसल्या गेल्या. त्यावेळी करदात्याच्या निकषाप्रमाणे एकूण 624 मतदार होते. मात्र त्यातल्या फक्त 323 मतदारांनीच मतदान केलं. म्हणजे मतदारांचा निरुत्साह हा तेव्हा पासूनचा आहे म्हणायचा. या निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले, त्यात मोतिलाल हरगोविंददास होते. ज्यांचे नाव पुढे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या शाळेला मिळालं आणि आजही मो.ह.विद्यालय म्हणूनच ती शाळा ओळखली जाते.दाजी रामचंद्र म्हणून निवडून आलेल्या गृहस्थांच्य नावाने पुढे चरईत रस्ता झाला. या शिवाय ख्रिश्चन,पारसी आणि मुसलमान समाजाचे प्रतिनिधीही निवडून आले होते.
ठाण्यात अरुणोदय हे पहिले वर्तमान पत्र सुरू करणारे काशिनाथ विष्णू फडके मताच्या क्रमवारीत बाराव्या स्थानावर गेल्याने निवडून आले नाहीत. पण त्यांना स्विकृत सदस्य म्हणून सहभागी करुन घेण्यात आले.
हेही वाचा:ठाण्याला जगाशी जोडणारा दुवा — कळवा पूल
भारतीय व्यक्ती नगराध्यक्षपदी नेमण्याचा पहिला मान ठाण्याल
एकूण 20 सभासदांपैकी 10 सरकार नियुक्त आणि 10 मतदारांनी निवडून दिलेले असे मिळून ठाणे म्युन्सिपल बरोची रचना तर झाली पण या कौन्सिलचा मुख्य म्हणजे नगराध्यक्ष कोण ? तर या बाबतीत ठाणे म्युन्सिपल बरोने नवा पायंडा पाडला कारण महाराष्ट्रात प्रथमच एका भारतीय व्यक्तीची निवड ब्रिटिश शासनाने म्युन्सिपल बरोचा अध्यक्ष म्हणून केली. ठाण्याला माननीय नारायण वासुदेव तथा बाळासाहेब खारकर हे नगराध्यक्ष म्हणून लाभले. कोण होते हे बाळासाहेब खारकर ? तर जामनगर संस्थानचे दिवाण म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली होती.त्यांना जामनगरच्या संस्थानिकांकडून त्याबद्दल खास पदक देऊन गौरवण्यात आलं होतं. ठाण्यातील खारकर आळी ह्या विभागाला बाळासाहेब खारकरांच्या गौरवार्थ ते नाव देण्यात आले आहे.
रिकाम्या गोठ्यातून ठाणे पालिकेचा कारभार!
म्युन्सिपल बरो निवडून आला खरा पण 1894-95 पर्यंत ठाण्याच्या म्युन्सिपाल्टीला स्वतःची जागा नव्हती, तिचा कारभार म्हणे एका रिकाम्या गोठ्यातून चालत होता.पुढच्या काळात डॉ.एफ.ए.मूस हे ठाणे बरोचे तब्बल 28 वर्षे सभासद होते आणि त्यातील 18 वर्षे ते बरोचे अध्यक्ष (म्हणजेच नगराध्यक्ष ) होते.आज त्यांचे नाव गडकरी रंगायतनसमोरच्या रस्त्याला दिलेलं आहे. अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असलेल्या डॉ.मूस यांनी आपल्या अहवालात आता ठाण्यातील नागरिकांनी आपला नगराध्यक्ष मतदानाने निवडण्याची वेळ आली आहे असा शेरा लिहिला आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमधून ठाण्याच्या नगराध्यक्षांची निवडणूक सुरू झाली. या पध्दतीने निवडून आलेले पहिले नगराधक्ष्य होते सर गोविंद बळवंत प्रधान.
1927 लाचलुचपतीची 5 प्रकरणे
ठाणे नगरपालिकेचा कारभार चोखपणे सांभाळणाऱ्या,आपल्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, शिस्तबध्द कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक नगराध्यक्षांचा उल्लेख करायचा तर त्यात वकिल भगवंत आप्पा पाध्ये यांचा करावा लागेल.वकिल,पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या पाध्यांनी 1908 मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. नगरपालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्षपद सांभाळण्याचा अनुभव घेऊन पाध्ये 1927 मध्ये ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरपिते वामनराव रेगे यांच्या जागरुकतेमुळे अफरातफर आणि लाचलुचपतीची पाच प्रकरणे उघडकीला आली. तेंव्हा या कर्मचाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करून,त्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश पाध्ये यांनी दिलेच. शिवाय त्यावर्षीच्या अहवालात या प्रकाराची नोंद करुन असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यावी असेही नमूद केले.
हेही वाचा: पेशवाईतील श्री विठ्ठल मंदिर
पाध्येंनंतर ठाण्याच्या नगरपालिकेची सूत्रे नगराध्यक्ष म्हणून ॲड.वामनराव रेगे यांनी सांभाळली. त्यांनी 1926 साली नगरपरिषदेची निवडणूक लढवली.त्यानंतर पुढे सलग दहा वर्षे ते नगरपरिषदेची निवडणूक जिंकून आपली सामाजिक जबाबदारी निभावत राहिले. 1928 साली ते ठाण्याच्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष झाले तर 1929 ते 32 या काळात त्यांनी ठाण्याच्या नगरपरिषदेचं अध्यक्षपद भूषविले. याच काळात त्यांनी नगरपरिषदेमधील चीफ ऑफिसरच्या अनिर्बंध सत्तेला आळा बसावा म्हणून म्युन्सिपल ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.
2 Comments
अतिशय छान माहितीपूर्ण लेख. नेहमी घेत असलेल्या नावांची उकल सुद्धा झाली. बाकी काही नाही तरी ५०% च्या आसपास मतदान हा शिरस्ता आपण आजही टिकवून आहोत.
छानच माहिती