ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका — भाग २

Thane : 1937 नंतर ठाणे नगरपालिकेची स्वतःची वास्तू उभी राहिली.बाजारपेठेतील स्टेशन रोडवरच्या या वास्तूमधून पुढे सतरा-अठरा वर्षे – महापालिका झाल्यावरही ठाणे शहराचा कारभार चालवला जात होता.आज मात्र ती वास्तू अस्तित्वात नाही
[gspeech type=button]

ठाणे शहर जसं जसं विस्तारत गेलं त्याच प्रमाणे ठाण्याच्या नगरपालिकेच्या कामकाजाचा विस्तार होत गेला.1923 च्या निवडणुकीपासून नगरपालिकेच्या सभासदांची – नगरपित्यांची संख्या 25 झाली. याचवेळी मतदानाचा हक्क विस्तारण्यात आला आणि मतदारांची संख्याही वाढली. त्यानुसार त्या निवडणुकीपासून दरमहा रुपये 3 किंवा अधिक भाडं देणारे नागरिक मतदानाचा हक्क बजावू लागले.

पुढे पाच वर्षांनी सभासद मंडळाची पुनर्रचना झाली आणि मुसलमानांसाठी 2 तर दलितांसाठी 1 जागा राखीव करण्यात आली. स्त्रियांना मतदानाचा हक्क आधीच मिळालेला होता,1924 पासून महिलांना नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहाण्याची परवानगी मिळाली. मात्र हा अधिकार बजावायला जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ जावा लागला. 1938-39 मध्ये एक जागा महिलांसाठी राखीव करण्यात आली,तेंव्हा या जागेवर कॉन्ग्रेसच्या कार्यकर्त्या,स्वातंत्र्यसैनिक यशोदाबाई कोतवाल निवडून आल्या आणि त्या ठाणे नगरपालिकेतील पहिल्या महिला सदस्य झाल्या.खानबहादूर डॉ.मूस यांनी त्यांच्याच कारकिर्दीत नगरपालिकेला मुख्य कार्यकारी अधिकारी असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.1925 च्या म्युन्सिपल ॲक्टमुळे ठाणे नगरपालिकेत असा ‘चीफ ऑफिसर’ नेमण्यात आला.रामचंद्रराव लक्ष्मणराव रेडे यांनी चीफ ऑफिसर म्हणून 1925 ते 37 जबाबदारी सांभाळली.रेडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे निवृत्तीनंतर ते नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि नगरसेवक म्हणून निवडून आले.42 च्या छोडो भारत आंदोलनात ते तुरुंगात असतानाच ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडूनही आले.पुढे तुरुंगातूनच त्यांनी या पदाचा राजिनामा दिला.

रेडे यांच्यानंतरचे चीफ ऑफिसर सीताराम सावंत हे आधी ठाणे नगरपालिकेच्या स्कूल बोर्डचे शिक्षणाधिकारी होते.त्यांच्या नंतरचे चीफ ऑफिसर काशिनाथराव नातू यांनी आपल्या कारकिर्दीत ठाण्याचे सुप्रसिध्द गावदेवी मैदान तिथली टेकडी सपाट करुन तयार केले.ठाणे नगरपालिका स्थापन झाली तेंव्हा ठाण्याची वस्ती घंटाळी देवी मंदिराच्या पुढे नव्हती.त्यामुळे आजचे विष्णुनगर,ब्राह्मण सोसायटी,नौपाड्यातील अनेक लोकवस्तीचे भाग अस्तित्वात नव्हते.1930 च्या दशाकात ब्राह्मण सोसायटीची वसाहत स्थापन झाली,या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्था हवी म्हणून पस्तीसच्या सुमारास नौपाडा ग्राम पंचायत स्थापन झाली.या नौपाडा ग्रामपंचायतीमध्ये नौपाडा,कोपरी, पाचपखाडी, घंटाळी या भागांचा समावेश होत असे.1958 मध्ये नौपाडा ग्रामपंचायत ठाणे नगरपालिकेत विलीन करण्यात आलं. स्वातंत्र्य चळवळीत ठाणे नगरपालिका – सभासद सहभागी झाले होते.1931 मध्ये तेव्हांचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष द.म. तथा नानासाहेब दामले यांनी पालिकेवर तिरंगी राष्ट्रिय ध्वज फडकावला होता.तर 42 च्या चळवळीत ‘चले जाव ’ ठराव संमत करणारी ठाणे नगरपालिका ही जिल्ह्यातली पहिली नगरपालिका होती,याच चळवळीत 10-12 नगरसेवकांनी राजीनामे ही दिले.पुढे स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्यावेळी तर ठाणे नगरपालिकेच्या सगळ्याच सभासदांनी राजीनामे दिले होते,त्यामुळे तेंव्हा पालिकेवर प्रशासक म्हणून बी.ए.देसाई यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा:ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका — भाग 1

1937 नंतर ठाणे नगरपालिकेची स्वतःची वास्तू उभी राहिली.बाजारपेठेतील स्टेशन रोडवरच्या या वास्तूमधून पुढे सतरा-अठरा वर्षे – महापालिका झाल्यावरही ठाणे शहराचा कारभार चालवला जात होता.आज मात्र ती वास्तू अस्तित्वात नाही. ठाणे नगरपालिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला सुमनताई हेगडे यांना.ठाण्यातील मासुंदा तलावावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या कार्याध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आजोबा सर गोविंद बळवंत प्रधान आणि सासरे माधवराव हेगडे यांच्याकडून मिळालेला राजकारणाचा वारस सुमनताईंनी अतिशय कर्तबगारीने पुढे नेला.ठाणे नगरपालिकेवर -खरतर ठाणे शहराच्या विकासावर आपला ठसा उमटवणारे नगराध्यक्ष म्हणजे सतीश प्रधान.

1967 मध्ये ठाणे नगरपालिकेत नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेनं सत्ता मिळवली. शिवसेनेचे ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून वसंतराव मराठे यांची निवड शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी केली.त्यानंतर 1974 मध्ये ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड नागरिकांच्या थेट मतदानामधून झाली,या निवडणूकीत सतीश प्रधान यांच्या नावावर ठाणेकर नागरिकांनी पसंतीची मोहर उमटवली.नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सतीश प्रधान यांनी राम गणेश गडकरी रंगायतन,तरण तलाव ,दादोजी कोंडदेव स्टेडियम अशा प्रकल्पांची निर्मिती करुन ठाणे शहराचा चेहरा मोहरा पालटून टाकला.

काळाबरोबर विस्तारणाऱ्या ठाणे शहराचा कारभार सांभाळण्यासाठी नगरपालिका पुरेशी ठरणार नाही म्हणून 1ऑक्टोबर 1982 रोजी ठाणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली.तेंव्हा महापालिकेच्या हद्दीत 65 प्रभाग होते आणि 130 नगरसेवक होते. नगराध्यक्ष म्हणून लोकप्रिय ठरलेल्या सतीश प्रधान यांनाच ठाण्याचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. पुढे सतीश प्रधान राज्यसभेवर निवडून गेले.ठाणे महानगरपालिकेत दुसरे महापौर म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या वसंतराव डावखरेंची कारकिर्दही संस्मरणीय ठरली.नंतर डावखरे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सभापती झाले.ठाणे शहराची लोकसंख्या वाढत गेली तसे महापालिकेचे प्रभाग विस्तारले गेले.सध्या ठाणे महापालिकेच्या प्रभागांची संख्या 47 आहे तर नगरसेवकांची संख्या 142 आहे.

1997 मध्ये शिवसेनेच्या विजया देशमुख या ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर झाल्या.2005 मध्ये महापौर झालेले राजन विचारे 2014 मध्ये ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार झाले. 2019 मध्ये नरेश म्हस्के महापौर झाले,कोव्हीडच्या साथीत त्यांनी अतिशय कौशल्याने ठाण्याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळली.त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ठाणेकरांनी खासदार म्हणून निवडून दिले.

गेल्या 43 वर्षांच्या वाटचालीत ठाणे महानगरपालिकेनं नगरसेवकांच्या सामूहिक राजीनाम्यांपासून ते प्रशासकिय राजवटीपर्यंत अनेक टप्पे पाहिले.उर्जा संवर्धनापासून ते तलाव संवर्धानपर्यंत अनेक पुरस्कार मिळवणारी ठाणे महापालिका ‘स्मार्ट सिटी ठाणे’घडवण्यासाठी प्रयत्नशिल आहे.कोलशेत भागातील अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘ नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ कळव्यात उभारण्यात येणारे ‘ग्रोथ सेंटर’ अशा प्रकल्पांमुळे ठाणे महानगरपालिका आपल्या गौरवशाली परंपरेचा वारसा अधिक सशक्तपणे पुढे नेताना पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : ब्रिटिशांनी ठाणे शहराच्या जडण घडणीवर सर्वात मोठा परिणाम घडवून आणणारी एक संस्था, एक यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा
Thane : वाढलेल्या ठाणे शहराच्या बदलेल्या चेहऱ्या मोहऱ्यात ही ऐतिहासिक खूण काहीशी लपलेली आहे. ठाण्यातील जुना स्टेशन रोड - सुभाष
Thane : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, गीतकार, कवी, वक्ता, मार्गदर्शक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक रूपं घेणारे अशोक समेळ हे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ