गोष्ट तशी खूप जुनी आहे. ठाण्यातली. ठाण्यातल्या जांभळी नाक्याजवळच्या शिवाजी मैदानातली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा होती. संध्याकाळची वेळ होती. ठाण्याच्या निरनिराळ्या भागांतून, मुलूंडमधून, डोंबिवलीमधून शिवसैनिक गटागटाने येत होते. हळूहळू अख्खं शिवाजी मैदान बघता बघता तुडुंब भरलं. बाळासाहेब ठाकरे अजून आलेले नव्हते. तोपर्यंत प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सतिश प्रधान ह्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांची भाषणं सुरू होती. आता कोणत्याही क्षणी बाळासाहेब येतील अशी ह्या सभेच्या ठिकाणी नेपथ्यरचना तयार झाली.. आणि इतक्यात सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूलकडून बाळासाहेब ठाकरेंसोबत गाड्यांचा ताफा एका जोरदार लयीत आला. जोरदार फटाक्यांच्या माळा लागल्या. काही रंगीबेरंगी फटाके आकाशात उडाले. एकीकडे असा हा जोरदार माहोल असताना बाळासाहेब ठाकरे गाडीतून उतरले आणि व्यासपीठाच्या दिशेने निघाले. शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. सूत्रसंचालकाने त्यांच्या नावाची घोषणा करताच त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली.
पी. सावळाराम एक सामान्य प्रेक्षक म्हणून
त्यांच्या भाषणाची सुरुवात होताच शिवाजी मैदानाच्या बाहेर बऱ्याच वेळापासून उभी असलेली एक ज्येष्ठ व्यक्ती पुढे सरसावली आणि शिवाजी मैदानाच्या कुंपणालगत आली. कान देऊन बाळासाहेबांच्या भाषणातला शब्द न् शब्द ऐकू लागली. ही व्यक्ती कुणी साधीसुधी नव्हती. त्यांनी लिहिलेली गाणी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी गायलेली होती त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वातल्या माहित असलेलं हे नामांकित नाव होतं. त्यातच ते कोणे एके काळी ठाण्याचे नगराध्यक्ष होते. म्हणजे राजकारणाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांचं नाव होतं जनकवी पी. सावळाराम.
हो, तेच ते, ज्यांनी एका काळात गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा हे लता मंगेशकरांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं गाणं लिहून महाराष्ट्रातल्या माहेरवाशिणींना रडवलं होतं. तर इतके ठाण्यातले हे प्रसिध्द कवी, आजच्या भाषेत सांगायचं तर त्या एका काळातले सेलिब्रिटी खास बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायला आले होते. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून शिवाजी मैदानाबाहेरच्या जाणुनबुजून एका आडोशाला उभे होते.
वास्तविक त्यांची कवी आणि गीतकार म्हणून असलेली त्यांची महती आणि माजी नगराध्यक्ष म्हणून असलेली त्यांची ओळख पाहता त्यांना त्या सभेत कुणीही पहिल्या रांगेतली खुर्ची मिळवून दिली असती, पण त्यांनी आपला तो सन्मान हेतूपुरस्सर टाळला होता. त्यांना एक साधा ठाणेकर नागरिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायचं होतं.
बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या खास शैलीत ते भाषण पूर्ण केलं. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना जबरदस्त प्रतिसाद दिला. सभेचा शेवट राष्ट्रगीताने झाला. पी.सावळाराम राष्ट्रगीताला उभे राहिले. ते संपताच रिक्षा पकडून निघून गेले. त्यातून काय दिसलं असेल तर ठाण्यातले हे कवी फक्त चांदणओल्या शब्दांमध्ये रमणारे नव्हते तर समकालिन राजकारणाबद्दल सजग होते. जागरूक होते.
हे ही वाचा : …हे ठाणं त्यांचं नाही!
ज्याला काळीज असते त्याचे भाव उमटणारच…
आज तो प्रसंग तसाच्या तसा आठवला. कारण अगदी तसा प्रसंग नसला तरी पी. सावळारामांच्या बाबतीत एक वेगळा प्रसंग पुन्हा पुन्हा घडत राहिला. त्यावेळी ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक जबरदस्त चाललं होतं. ह्या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाउसफुल असायचा. ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्येही जेव्हा जेव्हा ह्या नाटकाचा प्रयोग व्हायचा तेव्हा त्याची तिकिटं सहजासहजी मिळणं अवघड होऊन जायचं. त्या नाटकात तेव्हा रिटायर होणाऱ्या त्या आईची भूमिका भक्ती बर्वे अतिशय प्रभावीपणे करायच्या. आई म्हणून आपल्या कर्तव्यातून रिटायर होत असल्याची आपल्या कुटुंबात घोषणा करण्याचा तो प्रसंग नाटकात सुरू व्हायचा तेव्हा प्रेक्षक गलबलून जायचे. त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या व्हायच्या. संपूर्ण प्रेक्षागृहात अफाट हळवी शांतता पसरायची. अशा वेळी कवी पी. सावळाराम पहिल्या रांगेत बसलेले असायचे. ह्या नाटकाच्या प्रयोगाला बऱ्याचदा ते हजर असायचे. भक्ती बर्वेंचा हा विशिष्ट प्रसंग सुरू झाला की त्यांचा कंठ दाटायचा. नाटक संपल्यावर ते ओलावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडायचे. थेट रंगमंचावर जायचे. भक्ती बर्वेंना भेटायचे. आईची भूमिका तू अशी करतेस की आम्हाला रडवतेस असं म्हणायचे. रंगायतनमधल्या आपल्या ह्या नाटकाच्या प्रयोगाला पी. सावळाराम येणार हे भक्ती बर्वेंना अपेक्षित असायचं. डबडबलेल्या डोळ्यांनी येणार हेही अपेक्षित असायचं.
तुमचे डोळे नेहमीच माझ्या ह्या नाटकाच्या प्रयोगाला असे भरून येतात ह्याचं मला आश्चर्य वाटतं असं भक्ती बर्वे पी. सावळारामांना म्हणायच्या.
पी. सावळारामांकडे त्या प्रश्नाचं ठरलेलं उत्तर असायचं. ते म्हणायचे, तू आईची ही अशी काही भूमिका करतेस की, आमच्या काळजाला हात घालतेस.. आणि ज्याला काळीज असतं त्याच्या काळजातले भाव डोळ्यांत उमटतातच.
दोन पिढ्यांतील अंतर
आज पी. सावळाराम ह्या जगात नाहीत आणि भक्ती बर्वेही नाहीत. पण इतक्या मोठ्या माणसांच्या बाबतीत असं दृष्य पुन्हा कधीच दिसलं नाही. कोणत्या एखाद्या राजकीय सभेला अशी कुणी एखादी मोठी व्यक्ती सभेच्या बाहेर उभं राहून कुणाचं भाषण ऐकते आहे असा क्षण ठाण्यात पुन्हा कधीच दिसला नाही. एखाद्या नाटकातल्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडून असंख्य वेळा त्या नाटकाला येणारी मोठी व्यक्ती पुन्हा कधी ठाण्यात दिसली नाही. बदलत्या पिढीतला फरक असेल किंवा बदलत्या पिढीच्या दृष्टीकोनातला, भावभावनेतला फरक असेल, पण अशी माणसं दृष्टीस पडेनाशी झाली आहेत.
हे ही वाचा : सिनेमा पहाणारं ठाणं!
तत्वनिष्ठ राजकारणी
पी. सावळारामांच्या बाबतीत सांगायचं तर ते राजकारणातही सक्रिय होते. ठाण्याच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचले होते. त्यावेळचं राजकारण वेगळं होतं. मुल्याधारित होतं. राजकारणाबद्दल भाष्य करताना ते म्हणायचे, बाहेरून आलेला पैसा माणसाला बाहेरख्याली बनवतो. त्यांच्या ह्या एका वाक्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं मुल्यमापन होऊ शकतं. आज अशा मुल्यांचाच ऱ्हास झालेला आहे. हा बदल, हे स्थित्यंतर आज ठळकपणे दिसतं.