सन्मानाचं जगणं देणारी सिग्नल ‘शाळा’

Signal School In Thane : ठाण्यातल्या तीन हात नाका पूलाखाली गेली दहा वर्ष 'सिग्नल शाळा' भरते. साधारण तीन पिढ्या ठाण्यातील रस्त्यांवर राहून विविध व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलं या शाळेत येतात. समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या या शाळेकरता ठाणे महानगर पालिकेनं जागा दिली आणि शैक्षणिक पाठबळही दिलं. साधारण शाळा आणि सिग्नल शाळेत खूप फरक आहे. इथून उत्तीर्ण झालेली मुलं उद्योजक झाली आहेत. ठामपाच्या प्रयत्नाने आता मुंबई आणि नवी मुंबई इथंही सिग्नल शाळा सुरू होत आहेत.
[gspeech type=button]

काही संस्था किंवा व्यक्ती आपल्या वाढदिवसाला किंवा काही विशेष प्रसंगी बेघर मुलांना खाऊ वाटप, पुस्तके वाटप किंवा काही तरी वाटप करत असतात. पण या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता काहीतरी ठोस करणं गरजेचं असतं. समर्थ भारत व्यासपीठने या मुलांपर्यंत सिग्नल शाळेच्या माध्यमातून शाळा आणली. नुसतं शिक्षण नाही तर चांगल्या सवयीही लावल्या. या शाळेतून उत्तीर्ण झालेली मुलं आता रोजगारनिर्मिती करत आहेत. या मुलांनी स्वतःचं फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू केलं आहे. समर्थ भारत व्यासपीठचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांच्याकडून सिग्नल शाळेच्या उपक्रमाबद्दल ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने जाणून घेतलं.

नेहमीच्या शाळेऐवजी सिग्नल शाळा का?

महानगरांकडे आकर्षित होऊन सर्वच वर्गातील बरीच लोकं स्थलांतरीत होतात. यातली भटक्याविमुक्त वर्गातली लोकं शहरातल्या पुलाखालीच वस्ती करतात. पिढ्यानपिढ्या मोकळ्या आकाशाखाली बेघर राहण्याची या वर्गाला सवय आहे. उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये आल्यावर शहरातील पूलांखालीच ते वस्ती करतात. महाराष्ट्रात यांची लोकसंख्या साधारण 14 लाखांच्या आसपास आहे. सध्या सिग्नल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ठाण्यात येऊन राहिल्यावरची ही तिसरी पिढी आहे. दोन पिढ्या इथं मोठ्या होऊनही पूलाखालीच राहिल्यानं या शहरांशी त्यांची सांस्कृतिक संबंध येत नाहीत. स्थानिक भाषा या मुलांना येत नाही. परिणामी मुख्य शाळेत जायला अडचण येते. शिवाय आंघोळ, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ कपडे यांचा अभाव असलेल्या मुलांना कोणतीच शाळा आणि तिथले विद्यार्थी स्वीकारणं शक्य नसतं. शाळेत ने-आण करायला कोणी नसतं, कारण पालकांकरता ही मुलं रोजच्या दोनशे-तिनशे कमाई करणार साधनं आहे. त्यामुळे शाळाच या मुलांजवळ आणावी लागली. ही शाळा त्यांच्या आंघोळीपासून सुरू होणार, नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण देणार, त्यांना वेगवेगळ्या सिग्नलवरून घेऊन येईल आणि मुख्य म्हणजे त्यांच्या भाषेकडून शिक्षणाच्या भाषेकडे त्यांना घेऊन जाणार. मुख्य प्रवाहातल्या शाळा या गोष्टी करू शकणार नाही त्यामुळंच या समुदायाकरता ही विशेष शाळा सुरू करण्यात आली. आणि हा समुदाय असतो सिग्नलजवळ आणि तिथंच ही शाळा सुरू करण्यात आली. त्यामुळेच या शाळेला सिग्नल शाळा असं नाव दिलं.

शिक्षक शिकले पारधी भाषा

हा समुदाय स्थलांतरीत होताना जी भाषा आधीच्या पिढिनं आणली तिच भाषा आताच्या पिढीला येते. त्यामुळं स्थानिक भाषा येत नसल्यानं शिकवण्यासाठी अडचण येणार होती. शिक्षकांना याकरता मुलांची भाषा येणं अत्यावश्यक होतं. पारधी भाषा शिकण्यासाठी मुलंच बनले शिक्षक. पारधी बोलीभाषा असल्यानं तिची पुस्तकं, लिपी वगैरे काहीच नाही. मग वस्तू दाखवून, खाणा-खुणांच्या साहाय्याने मुलांनी शिक्षकांना पारधी भाषा शिकवली. पारधी शाळेच्या मुख्याध्यापिका आरती परब आणि इतर शिक्षिकांनी पारधी शब्दकोष तयार केला. या शिक्षिकांनी मुलांना पारधीपासून मराठी भाषेपर्यंत आणलं. यात साधारण वर्षभराचा काळ गेला. 

समर्थ भारत व्यासपीठचे सीईओ भटू सावंत यांची मुलाखत पाहण्यासाठी – Podcast : सन्मानाचं जगणं शिकवणारी ‘सिग्नल शाळा’

सुरूवातीला वयोगट वेगवेगळा पण इयत्ता एकच

शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा 5 ते 12 अशा सर्वच वयोगटातील मुलं ही कधीच शाळेत गेली नव्हती. त्यामुळं वयोगट वेगळा असला तरी ती शिक्षणाच्यादृष्टीने एकाच पातळीवरची होती. भाषेची अडचण तर दूर झाली. पण शासकीय नियमांनुसार वयानुसार इयत्तेत बसवावं लागतं. त्यामुळं ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 मध्ये या मुलांची वयानुसार नोंदणी करण्यात आली. दरम्यानच्या काळात या मुलांचा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्याकरता साधनांची निर्मिती करण्यात आली. यात अक्षरओळख, अंकओळख, वाक्य या प्राथमिक गोष्टींवर काम करण्यात आलं. या गोष्टी मुलांनी जसजशा आत्मसात केल्या त्यानुसार त्यांच्या खऱ्या इयत्तेचा अभ्यास शिकवायला सुरुवात झाली. मुलांनीही जोरदार अभ्यास केला. आणि सिग्नल शाळेच्या दहावीच्या पहिल्याच बॅचची मुले 75 ते 80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

मुलं शाळेला कशी सरावली?

शाळेत येण्याआधी मुलांना रस्त्यावर मुक्त स्वातंत्र्य होतं. कधीही झोपा-उठा, मिळेल ते कधीही खा, आंघोळ नाही, वाटेल तेव्हा खेळा आणि कपड्यांचा पुढचा जोड मिळेपर्यंत अंगावरच्याच कपड्यांवर राहा अशा पद्धतीचं आयुष्य होतं. सिग्नल शाळेत गेल्यावर या स्वातंत्र्याला ते मुकणार होते. पण सिग्नल शाळेतल्या साधनसुविधा त्यांना खुणावत होत्या. सिग्नल शाळेत नाश्ता, दोन वेळचं पौष्टिक पोटभर जेवण होतं, रोज आंघोळ, स्वतःचे कपडे स्वतः धुवून रोज बदलणे, मैदानी खेळ, स्केटिंग, म्युझिक लायब्ररी असं सर्व छान होतं. मुलांना या सर्वाचं आकर्षण वाटू लागलं. आणि मुलं शाळेकडे वळली.

पालकांचं आव्हान आणि प्रतिसाद

मुळात या पालकांकरता ही मुलं हे कमाईचं साधनं होती. एखादी वस्तू विकून किंवा भिक मागून प्रत्येक मूल दिवसाला दोनशे-तिनशे रुपये कमावत होतं. शिक्षण घेतल्यानंतर वीस वर्षाने ते कमावणार, पण हे मूल आत्ताच कमावत आहे. त्याकरता शिक्षणाची काय गरज असं त्या पालकांचं म्हणणं होतं. कधीतरी एखादी संस्था आली किंवा व्यक्ती आली की काही चांगलं खाणं, चित्रांची पुस्तकं-कपडे देऊन फोटो काढून जायची. सुरवातीला सिग्नल शाळाही अशीच असावी असं वाटलं. पण मुलांच्या सवयी बदलल्या, ती नीटनेटकी राहू लागल्यावर पालकांचं मत बदललं. पहिल्याच दिवाळीला सिग्नल शाळेनं मातृपूजन केलं. मुलांनी आपल्या आईचे पाय धुतले आणि तिला नमस्कार केला. ही घटना आईंकरता टर्निंग पॉईंट ठरली. या सर्व आईंच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तोवर त्यांच्या मुलांनी असा मान त्यांना दिला नव्हता. जो काही पैसा ही मुलं कमवायची तोही मुलांचे वडील दारू किंवा जुगारात उडवत असत. आईच्या हातात यातला एकही पैसा येत नसे. त्यामुळे या सर्व मुलांच्या आईंच्या लक्षात आलं की, सिग्नल शाळा म्हणजे मुलांकरता आणि त्यांच्याकरता सन्मानाचं जगण्याचा मार्ग आहे. आणि मग या सर्व आईंनीच आपलं मूल सिग्नल शाळेत जाणारच याचा चंग बांधला.  

हे ही वाचा : क्षमतांची जाणीव करून देणारी ‘क्षमता’

नवीन शैक्षणिक धोरण आणि सिग्नल शाळा

नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच एनइपी 2023 पासून लागू झालं असलं तरी, यातल्या अनेक गोष्टी सिग्नल शाळेनं सुरवातीपासूनच अंमलात आणल्या. समर्थ भारत व्यासपीठाचा उद्देश केवळ पुस्तकी शिक्षण देणं नसून जगण्यासाठी आवश्यक कौशल्य मुलांना यायला हवी यावरही आहे. त्यामुळं इयत्ता आठवीपासूनच या मुलांना प्लबिंग, वेल्डिंग आणि सुतारकाम शिकवण्यात येतं. शाळेच्या गरजेची ही प्राथमिक काम हे विद्यार्थीच करतात. शाळा सुरू झाल्यापासूनच इथं रोबोटिक लॅब आणि कम्प्युटर लॅब आहे. तिथं मुलं स्वतः प्रयोग करतात. कोडिंग, हार्डवेअर पॅनेलिंग अशा सर्व गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. अशी लॅब असणारी ठाण्यातली ही एकमेव शाळा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या रोबोटिक स्पर्धांमध्ये इथली मुलं सहभागी होतात. यात मुलांना बेस्ट ज्युरी अवार्ड मिळाले आहेत. शाळेची सुसज्ज सायन्स लॅब आहे. क्रमिक पाठासोबतच पाठाबाहेरचे प्रयोग मुलं करतात. त्यामुळं त्यांच्यातल्या अंधश्रद्धा कमी झाल्या. गणितासाठी गणित कोपरा आहे. क्रमिक विषय शिकवण्याकरता अनेक साधनांचा वापर केला जातो. त्यामुळं इथले विद्यार्थी शालेय अभ्यासासोबतच इतर कौशल्यांमध्येही पारंगत होत आहेत.

ठाणे महानगरपालिकेचा पाठिंबा

सिग्नलवरील पूलाखाली शाळा अशी कल्पना देशभरात कुठेच नव्हती. ठाणे महापालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ही कल्पना उचलून धरली. ठाणे महापालिकेनं सिग्नल शाळेकरता तीन हात नाक्याच्या पुलाखाली जागा दिली. त्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा दिल्या. शिवाय शिक्षण विभाग आणि नोंदणी केलेल्या शाळेच्या स्टाफचीही चांगली मदत होत आहे. सिग्नल शाळेला मिळालेल्या यशात मोठा वाटा हा ठाणे महानगर पालिकेचाही आहे. आता ठाणे महानगरपालिका इतर महानगरपालिकांना स्थानिक बेघर मुलांकरता सिग्नल शाळा उपक्रम राबवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

देशभरात सिग्नल शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शन

देशभरात करोडो मूलं ही बेघर आणि शालेय शिक्षण कक्षेच्या बाहेर आहेत. ठाण्यातील सिग्नल शाळेसारखा सेटअप या मुलांकरताही आवश्यक आहे. गेली दहा वर्ष ठाण्यातल्या सिग्नल शाळा उपक्रमाचं व्यवस्थित दस्ताऐवजीकरण झालं आहे. मुंबईतील अमर महल पूलाखाली आणि नवी मुंबईत नेरुळ तिथल्या महापालिकांच्या सहकार्याने जून 2025 च्या शैक्षणिक वर्षापासून सिग्नल शाळा सुरू करण्यात येत आहेत. समर्थ भारत व्यासपीठच या शाळा चालवणार आहे. पण जर देशभरात ज्या कोणालाही अशाप्रकारच्या शाळा सुरू करायच्या आहेत, त्यांच्याकरता समर्थ भारत व्यासपीठनं फ्रंचाईझी मॉडेल तयार केलं आहे. याकरता कडक निकष तयार करण्यात आले आहेत. अर्ज करणे, सर्वे कसा करायचा, साधन-सुविधा काय आहेत, मागील पाच वर्षांचं इन्फ्रास्ट्रक्चर, समर्थ भारत व्यासपीठनेच विकसित केलेला अभ्यासक्रम असं साधारण याचे निकष असतील. जून 2026 मध्ये हे फ्रंचाईझी मॉडेल सुरू होईल.

हे ही वाचा : उभारणीचा ‘प्रारंभ’!

शाळेतल्या माजी विद्यार्थ्याचं फॅब्रिकेशन वर्कशॉप

ही मुलं ज्या समुदायातून आली तिथं त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची उद्योजकता होती. शिवाय सिग्नल शाळेत त्यांना कौशल्य विकासाची कामं ही शिकवली जातातच. शाळेतून दहावी झालेली पहिल्या बॅचच्या मुलांनी बारावी झाल्यावर फॅब्रिकेशन डिप्लोमा केला. या मुलांनी इतर कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा असा विचार समर्थ भारत व्यासपीठाच्या विश्वस्तांनी मांडला. यामुळं रोजगारनिर्मितीही झाली. सध्या या वर्कशॉपला अनेक चांगले प्रोजेक्ट मिळाले आहेत. 

समर्थ भारत व्यासपीठचे इतर उपक्रम

सिग्नल शाळेतल्या काही पालकांना संस्थेतर्फे ऑटो रिक्षा देण्यात आल्या आहेत. वंचितांच्या शिक्षणासोबतच समर्थ भारत व्यासपीठ झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्यावर आणि अभ्यासिकांवर काम करते, कचरावेचकांसाठी विविध उपक्रम चालतात. पर्यावरणसंवर्धनाकरता रोज ठाण्यातल्या चाळीस टन कचऱ्यावर काम केलं जातं. यात पालापाचोळ्यापासून कोळसा, निर्माल्यापासून खत, प्लास्टिकपासून फर्नेस ऑईल बनवण्यात येतं. मुंबईतील माहिम समुद्रकिनाऱ्यावर गेली 2 वर्ष रोज सव्वा ते दिड टन प्लास्टिक गोळा करून ते सायंटिफिक रिसायकलिंग पाठवण्यात येतं. खालापूरमधील 10 शाळांमध्ये टेक्निकल एज्युकेशन सेंटर चालवण्यात येते. नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणारे हात असावेत, अशी समर्थ भारत व्यासपीठाची भूमिका आहे.

ऑटो रिक्षा व अन्य रोजगारांमुळे सिग्नल शाळेतील काही पालकांचे आणि वर्कशॉप सुरू केलेल्या मुलांच्या कुटुंबियांचं उत्पन्न वाढलं आहे. परिणामी ही कुटुंब आता रस्त्यावर नाही तर भाड्याच्या पक्क्या घरांमध्ये राहत आहेत. हा केवळ मोकळ्या आभाळाखालून छतापर्यंतचा प्रवास नाही तर सन्मानाचा प्रवास आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : ठाणे शहराचं एक मोठ्ठ वैशिष्ट्य म्हणजे या शहरात फक्त दीड किलोमीटरच्या टप्प्यात सहा वेगवेगळ्या धर्मांची प्राचीन प्रार्थना स्थळे
Thane : 1937 नंतर ठाणे नगरपालिकेची स्वतःची वास्तू उभी राहिली.बाजारपेठेतील स्टेशन रोडवरच्या या वास्तूमधून पुढे सतरा-अठरा वर्षे – महापालिका झाल्यावरही
Thane : ब्रिटिशांनी ठाणे शहराच्या जडण घडणीवर सर्वात मोठा परिणाम घडवून आणणारी एक संस्था, एक यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ