प्रत्येक व्यक्तीला एक वेगळा आणि विशिष्ट आवाज असतो. परंतु आपल्या आवाजाने दुस-या व्यक्तीचे हुबेहूब व्यक्तीमत्त्व उभी करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. आणि असेच एक आवाजातील बहुआयामी व्यक्तीमत्त्व म्हणजे आवाज कलाकार उदय सबनीस होय…
एकांकिकेच्या माध्यमातून कलाक्षेत्रात पदार्पण
8 डिसेंबर 1959 रोजी उदय सबनीस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला. उदय सबनीस यांनी ‘रंजन युवा मंच’ या संस्थेतून स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील ‘कलासरगम’ या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. 1988 साली ‘सूर्याची पिल्ले हे त्यांचं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं. आणि त्यांच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली.
अनेक नाटकं, अनेक मालिका आणि विविध मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या भूमिका साकारल्या. इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करून त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. ‘कच्चा लिंबू’, ‘बायोस्कोप’, ‘टाईमपास २’, ‘रेगे’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दुनियादारी’, ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट ठरले. तर ‘हत्यार’, ‘बायोस्कोप’, ‘सरकार’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटांमधीलही त्यांचा अभिनय सरस ठरला.
आवाजाचे जादूगार
सबनीस यांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ‘डबिंग’मधील त्यांची कामगिरी. उत्तम अभिनयासोबतच प्रेक्षकानी मनात ठेवला तो उदय सबनीस यांचा आवाज. अतिशय भारदस्त आणि त्या त्या पात्रानुसार आवाजातील वेगळेपण जपून प्रेक्षकांना भारावून टाकण्याची किमया ठाणेकर असणाऱ्या उदय सबनीस यांनी जपली.
एक सुप्रसिध्द व्हाॅईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून उदय सबनीस यांची जगभरात ओळख आहे. मराठी, हिंदीच नव्हे तर जगभरातील विविध भाषांमध्ये उदय सबनीस यांनी व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. अगदी कार्टून नेटवर्क, डिस्ने, डिस्कव्हरी, हिस्ट्री या चॅनेल्सवर व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. आज लहान मुलांनी जी काही कार्टून पात्र आवडतात त्यापैकी निम्म्याहून अधिक पात्रांमागील आवाज हा उदय सबनीस यांचा आहे. त्यांनी कार्टून नेटवर्क, डिजनी, डिस्कव्हरी, हिस्टरी या चॅनेल्सवर व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी अनेक हॉलिवुडपट, मालिकांमधील इंग्रजी संवाद हिंदीमध्ये डब केले आहेत. तसेच दाक्षिणात्य चित्रपटांसाठीही त्यांनी आपला आवाज दिला आहे.
त्यांचा दमदार आवाज आणि संवादफेक यामुळे ते लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अनेक जाहिरातींना व चित्रपटांना त्यांनी आवाज दिला आहे. त्यामुळे त्यांचा आवाज प्रत्येक पिढीमध्ये प्रसिध्द आहे. समोरच्या पात्राला अधिक चांगल्या प्रकारे आवाजातून जिवंत करण्याची कसब ही उदय सबनीस यांना अवगत आहे. त्यांची बहुमुखी कला आणि आवाजाचा आवाका यामुळे ते मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व मानले जातात.
हे ही वाचा : …रंगायतनने जेव्हा रंग भरले!
वाचनाची सुरुवात
अभिनय असो किंवा डबींग… या दोघांसाठीही तुमचा वाचनाचा व्यासंग हा उत्तम असायला हवा असा सल्ला उदय सबनीस देतात. 1975 मध्ये जेव्हा उदय सबनीस हे डोंबिवलीमध्ये राहायला होते तेव्हा त्यांच्या शेजारी सुप्रसिध्द ललित लेखक, गीतकार, कवी प्रवीण दवणे राहायला होते. एकदा त्यांनी उदय सबनीस यांना ‘ययाति’ कादंबरी वाचायला दिली. ‘ययाती’ हे मी वाचलेले पहिले पुस्तक. त्या पुस्तकापासून माझ्या वाचनाचा प्रारंभ झाल्याचे उदय सबनीस सांगतात. कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचायला मला आवडत असले तरी आत्मचरित्र आणि चरित्र या साहित्य प्रकारात मी रमत असल्याचे उदय सबनीस सांगतात.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणी
धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी बोलताना उदय सबनीस विविध आठवणींना उजाळा देतात. यावेळी ते सांगतात की, “आनंद दिघे हे खरंच लोकांसाठी जगणारे नेते होते. 1999 साली थरार नावाची एक मालिका सुरु होती. ज्यात मी केवळ दोनच भागांमध्ये काम केलं होतं आणि नेमकी दिघे साहेबांनी तोच भाग पाहिला होता. त्यानंतर माझी आणि आनंद दिघे यांची ज्या-ज्यावेळी भेट झाली ते मला थरार अशीच हाक मारायचे. माझ्याबद्दल दिघे साहेबांना माहित होतं की, एक ठाण्यातला धडपडणारा कलाकार आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना कलाकरांबद्दल खुप आपुलकी होती. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिघे साहेबांवर ‘सुर्य निघाला पुढे’ ही एक ऑडिओ व्हिडिओ कलाकृती तयार केली होती आणि त्याचा व्हॉईस ओव्हर मी दिला होता. दिघे साहेब त्यांच्या कामात खूप व्यस्त असायचे पण त्या रेकॉर्डिंगसाठी रात्री दोन अडीच वाजता स्टुडिओत स्वत: दिघे साहेब आले होते आणि ते ऐकून त्यांनी आनंदाने माझ्या पाठीवर थाप मारली होती.”
जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानित
नुकतेच ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ उदय सबनीस यांना त्यांच्या अभिनय आणि व्हाॅईसओव्हर क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. उदय सबनीसांसारख्या ठाण्यातील अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श आज महाराष्ट्र किंवा भारत देशच नव्हे तर जगभरातील विविध कलाकृतींंना लाभला ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.