ठाण्याची ओळख – मासुंदाची तलावपाळी

Thane : प्राचीन काळात ठाण्याची भरभराटीला आलेलं समृद्ध बंदर अशी ओळख होती. या ओळखीसह या शहराची आणखीन एक ओळख होती ती म्हणजे ‘तलावांच शहर’. आजच्या वाढलेल्या, विस्तारलेल्या ठाण्यात सुमारे 40 ते 42 तलाव आहेत. त्यामुळे त्याकाळात किमान साठ-पासष्ट तलाव असण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या तलावात तेव्हाही ‘मासुंदा’ हाच तलाव सर्वात मोठा होता आणि ठाण्यात मध्यवर्ती होता. काळाच्या ओघात मासुंदाचा आकार जरी कमी झाला असला तरी शान मात्र अजिबात कमी झालेली नाही.
[gspeech type=button]

प्राचीन काळात ठाण्याची भरभराटीला आलेलं समृद्ध बंदर अशी ओळख होती. या ओळखीसह या शहराची आणखीन एक ओळख होती ती म्हणजे ‘तलावांच शहर’. प्राचीन काळात ठाण्यात शेकडो तलाव होते असं सांगितलं जातं. ब्रिटिशांना पद्धतशीर नोंदी आणि दस्तऐवज तयार करण्याची शिस्त होती. त्यामुळे त्यांनी जेव्हा ठाणे म्हणजेच साल्सेटी (साष्टी)चा ताबा घेतला, तेव्हा ठाणे शहरात आणि जिल्ह्यात किती तलाव आहेत याची नोंद करुन ठेवली आहे. 1882 मध्ये प्रसिध्द झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ( जे तेव्हाच्या मुंबई प्रोव्हन्सच्या गॅझेटचा भाग आहे ) ठाणे शहरात ‘अटाळा’, ‘घोसाळा’, ‘मासुंदा’, ‘हरयाळा’, ‘मखमली’ आणि ‘सिध्देश्वर’ असे सहा मुख्य तलाव असल्याची नोंद आहे.

आजच्या वाढलेल्या, विस्तारलेल्या ठाण्यात सुमारे 40 ते 42 तलाव आहेत. त्यामुळे त्याकाळात किमान साठ-पासष्ट तलाव असण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी ‘देवाळे’ असाही एका तलावाचा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रांमध्ये सापडतो. मात्र या सगळ्या तलावात तेव्हाही ‘मासुंदा’ हाच तलाव सर्वात मोठा होता आणि ठाण्यात मध्यवर्ती होता.

आक्रमणाची झळ पोहोचलेला मासुंदा तलाव                

ब्रिटिशांच्या आधीचे संदर्भ शोधले तर बिंब राजवटीत ठाण्यातील ‘मासवदा’ तलावाचा उल्लेख आढळतो. तोच आजचा मासुंदा तलाव. बिंब राजवटीतील एका राजाने भोजराजाचा पराभव केल्यानंतर याच मासवदा तलावाकाठी आपला विजयोत्सव साजरा केला होता अशी नोंदही मिळते. त्यामुळे अकराव्या-बाराव्या शतकापासून मासुंदा तलाव अस्तित्वात आहे हे नक्की. 16 व्या शतकात पोर्तुगिजांनी ठाणे ताब्यात घेतले तेव्हा याच मासुंदा तलावाच्या काठावर त्यांनी ‘सेंट अँथनीज  फ्रायरी’ ( म्हणजेच आजचे सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च) हे चर्च बांधले आणि त्याबरोबर मासुंदाचे नाव बदलून ‘सेंट अँथनीज लेक’ असे केले. अर्थात हे नामकरण टिकले नाही. पेशव्यांनी ठाणे शहर पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केलं तेव्हा याच मासुंदा तलावात सापडलेल्या श्री कौपिनेश्वराच्या भव्य पिंडीचा जिर्णोध्दार करण्यात आला आणि श्री कौपिनेश्वराचे शिवालय मासुंदाच्या काठावर निर्माण झाले. ब्रिटिशांनी आपली राजवट सुरू केली तेव्हा म्हणजे 1818 मध्ये मासुंदा तलावाचा विस्तार 34 एकर असल्याचे नोंदवून ठेवलं आहे. आजच्या मासुंदा तलावाचा आकार बघता काळाच्या ओघात आपण एक विशाल जलाशय अगदीच लहान आकारात बांधून टाकल्याचं जाणवतं. 

हे ही वाचा : ठाणे – एक समृध्द बंदर !

शहराच्या विस्तारात तलावाचा विस्तार कमी झाला

ठाणे शहर विस्तारू लागलं, लोकसंख्या वाढू लागली. त्यामुळे मासुंदाच्या जलसाठ्याची व्याप्ती कमी होऊ लागली. 1881मध्ये ब्रिटिश राजवटीत मासुंदा तलावातील पाणी उपसून, गाळ काढला गेला तेव्हा पोर्तुगिजांनी फोडलेल्या मंदिरांमधील अनेक मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष बाहेर आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1954 साली तलावाचा पृष्ठभाग ‘हाससिंथ’ या पाणवनस्पतीने व्यापला आणि तलावातील जलचर गुदमरू लागले. तेव्हा ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन मासुंदा सफाई अभियान राबविले. ठाणे शहरातील रहदारी वाढू लागली म्हणून 1959  साली या तलावाचा काही भाग बुजवून स्टेशनकडे जाणारा नवीन रस्ता तयार केला. या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं नाव दिलं. ठाणेकरांमध्ये हा रस्ता लोकप्रिय झाला, कारण या रस्त्याच्या कडेला मुलांना खेळण्यासाठी बागा-उद्याने तयार केली. मात्र यामुळे तलावाचा आकार जवळ जवळ निम्म्यावर आला. 

तलाव बुजवून सुविधां निर्माण

आजचा रंगो बापुजी गुप्ते चौक, त्याला लागून असलेलं छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे सगळं तलाव बुजवून उभ्या केलेल्या सुविधा आहेत.  22 जून 1964  रोजी तलावाचा आणखी थोडा भाग बुजवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ भव्य पुतळा उभारण्यात आला. मग 1973 साली तलावाच्याच एका कोपऱ्यात ठाण्यातील पहिला सार्वजनिक तरण तलाव निर्माण केला. ठाण्यातील नाट्यरसिकांसाठी पहिले वातानुकुलीत नाट्यगृह उभारले गेले ते देखिल याच मासुंदाचा काही भाग वापरून.  राम गणेश गडकरी रंगायतनची भव्य वास्तू आता मासुंदा तलावपाळीचा हिस्सा बनली आहे. 

तलावाचं सुशोभिकरण

याच मासुंदा तलावात पिढ्यान् पिढ्या ठाणेकर बोटिंगचा आनंद लुटत आले आहेत. आज मासुंदा बघताना, तलावाच्या मध्यभागी असलेल्या लहानशा बेटावरील हनुमानाची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. मात्र या ठिकाणी मासुंदामधले पहिले कारंजे सुरू करण्यात आले होते. डिसेंबर 1974 मध्ये  रेमंड्स कंपनीचे मालक सिंघानिया यांच्या देणगीतून या तलावात साडे सतरा फूट त्रिज्जा असलेलं सिमेंटच मोठं कमळ बसवण्यात आलं आणि मध्यभागी शिवलिंगाची स्थापना केली. या कमळात कारंजे बसवून मासुंदाची शोभा वाढवली होती. नंतर तलावात ठिकठिकाणी कारंजी बसवून तलाव अधिक आकर्षक केला गेला. 1992 मध्ये ठाणेकर नागरिकांच्या सहभागाने मासुंदा पुन्हा एकदा कोरडा करुन साफ केला.   

हे ही वाचा : ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर

 वेगवेगळ्या प्रहरातला मासुंदा तलावकाठ

मासुंदा तलाव खरतर तलावपाळी हे फक्त ठाणेकरांसाठीच नाही बाहेरुन येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठीही ठाण्याचं खास आकर्षण आहे. तलावाच्या काठावर थंडगार वाऱ्याच्या झुळकांचा आनंद घेतानाच तलावाभोवतीच्या खाऊ गल्लीत पोटपूजा करण्याची मजाही लुटता येते. भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी, अननसाचं सरबत आणि पळसाच्या पानावरची कुल्फी अशा चटकदार पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी खवय्ये तलावपाळीवर संध्याकाळी गर्दी करतात. 

मासुंदा तलावाची पहाट उजाडते ती जांभळी नाक्यावर पहाटे पहाटे भरणाऱ्या भाजी मार्केटमधल्या वर्दळीमुळे आणि तलावाभोवती जॉगिंग करायला,चालायला येणाऱ्या फिटनेस फ्रीक मंडळींमुळे, तर रात्र जागते ती कुल्फीवाले आणि मालिशवाले यांच्या आरोळ्यांनी. 

दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रेच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीत मासुंदाच्या तलावपाळीवर ठाणेकर नागरिक मोठ्या उत्साहाने दीपोत्सव साजरा करतात. आता मासुंदाच्या काठालगत ग्लास वॉक आणि आतल्या बाजूला ॲम्फी थिएटर केले आहेत,ज्यामुळे तलावाची शोभा आणखी वाढली आहे. त्यामुळे काळाच्या ओघात मासुंदाचा आकार जरी कमी झाला असला तरी शान मात्र अजिबात कमी झालेली नाही.

हे ही वाचा : उपवन प्रोफेशनल झालं!

1 Comment

  • Madhuri Pejaver

    हे सर्व वर्णन जरि यथार्तः आणि छान असले तरी पूर्वी याच मासुन्दा तलवावर खुप पाण पक्षी यायचे जे पाहायला पक्षिप्रेमि गर्दी करायचे. परन्तु सुशोभिकरणाच्या नादात, सर्व पाण वनस्पति कापल्या गेल्या आणि पक्षान्नि हक्काचे स्थान गमावले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. हे सर्व वर्णन जरि यथार्तः आणि छान असले तरी पूर्वी याच मासुन्दा तलवावर खुप पाण पक्षी यायचे जे पाहायला पक्षिप्रेमि गर्दी करायचे. परन्तु सुशोभिकरणाच्या नादात, सर्व पाण वनस्पति कापल्या गेल्या आणि पक्षान्नि हक्काचे स्थान गमावले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी हे प्रा. संतोष राणे
Thane : आंबेडकरी समाजासाठी 14 एप्रिल ही नुसती दररोजच्या धबडग्यातली एक तारीख नसून हा एक लाखमोलाचा दिवस असतो. रोजघडीच्या कामातून
सन 1832 मध्ये मद्रासमध्ये आणि 1851 मध्ये रुरकी येथे छोटा लोहमार्ग सुरू करुन, त्यावरुन बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांची वाहतूक सुरू झाली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ