शब्दांमधून भावनांचे सूर आळवणाऱ्या प्रा. प्रवीण दवणे या नावाचा आज मराठी साहित्यविश्वात मोठा मान आहे. ठाण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत आपली लेखणी फुलवत, कधी व्याख्याता, कधी गीतकार, कधी कवि, कधी नाटककार, तर कधी सूत्रसंचालक अशा विविध भूमिका प्रामाणिकपणे निभावणाऱ्या दवणे सरांचा प्रवास हा अनेकांकरिता प्रेरणादायी ठरलेला आहे.
शब्दांचे बीज बालपणीच रोवले गेले…
6 एप्रिल 1959 रोजी जन्मलेले प्रवीण दवणे हे मुळचे कोकणातील. पण त्यांचे संपूर्ण शिक्षण आणि साहित्यिक घडामोडी ठाण्यातच रुजल्या. लहानपणापासूनच वाचनाची गोडी, लेखनाची ओढ आणि व्यासपीठावरील आत्मविश्वास यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच झळाळी होती. केवळ अकराव्या वर्षी त्यांचा पहिला लेख ‘आपण’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला. त्या वयातच त्यांना ठाण्यातील नामवंत साहित्यिकांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली.
विद्यार्थी ते व्यासपीठावरील ‘गुरु’
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 30 हून अधिक वर्षं अध्यापन सेवा केली. व्याख्यान आणि काव्यवाचनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची प्रेमभावना जागवणारा हा शिक्षक म्हणजे विद्यार्थीप्रिय गुरु. त्यांच्या वर्गात मराठी केवळ विषय नव्हता, तर ती भावनांची भाषाच होती. त्यांनी महाविद्यालयीन साहित्य परिषदांना नवे आयाम दिले, आणि असंख्य विद्यार्थ्यांना लेखन आणि वक्तृत्वात प्रेरणा दिली.
हेही वाचा – ठाणेकरांचा जगभरात पोहोचलेला आवाज – उदय सबनीस
काव्यशक्तीची अविरत धारा
प्रवीण दवणे यांचा कवितेतील स्वभाव हा मनाला भिडणारा आहे. त्यांनी ‘सावर रे’, ‘स्पर्शगंध’, ‘रंगमेध’, ‘गेधखुणा’, ‘हे शहरा’, ‘एक कोरी सांज’, ‘नव्या निरभ्रासाठी’ यांसारखे अनेक काव्यसंग्रह लिहिले. त्यांची कविता ही केवळ रचना नसते, ती अनुभव असतो कधी शहरातील एकाकीपणा, कधी प्रेमातील कोवळेपणा, कधी आईच्या मायेची ऊब, तर कधी काळजात कालवाकालव करणारी सामाजिक वेदना. त्यांचे कवित्व हे ‘कवी’ या शब्दाला अर्थ देणारे आहे.
गीतलेखनातून जनतेशी संवाद
साहित्याचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे जनमानसात पोहोचणारी गीते. दवणे सरांनी तब्बल 125 हून अधिक चित्रपट, भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांची रचना केली आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, शंकर महादेवन आणि साधना सरगम यांसारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं आहे. त्यांचे ‘आई म्हणजे देवा घरची माया, आई कल्पतरूची छाया…’सायकलवाल्या पोलीसवाल्या…’ यासारखी गीते आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात.
नाट्यलेखन आणि रंगभूमीशी नाळ
त्यांनी लिहिलेली “आई परत येते”, “प्रिय पप्पा”, “श्रीयुत सामान्य माणूस”, ही नाटके विविध रंगभूमींवर सादर झाली आहेत. त्यांच्या नाटकात कधी भावनिक धागा असतो, कधी सामाजिक भाष्य असतं, तर कधी खुसखुशीत विनोदाचा शिंतोडा असतो. त्यांचे लेखन हे प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ टिकणारं आणि विचारांना चालना देणारं असतं.
भाषण आणि सूत्रसंचालनातील धार
अत्यंत उत्तम वक्ता आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. दूरदर्शनवरील त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले. ते श्रोत्यांच्या भावविश्वाशी नातं निर्माण करतात, विषयाला सहज आणि प्रभावीपणे हाताळतात. त्यांची शैली ही नाट्यपूर्ण असली तरी ती लवचिक आणि आर्जव असते.
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, शांता शेळके सरस्वती पुरस्कार, ठाणे ग्रंथालय रेगे पुरस्कार यासारखे असंख्य सन्मान त्यांच्या झोळीत आहेत. पण त्यांच्या मते, “खरा पुरस्कार म्हणजे वाचकाच्या डोळ्यांत दिसणारे भाव…”
ठाण्याचा शब्दप्रेमी ‘गौरव’
प्रवीण दवणे यांचा ठाण्याशी घट्ट संबंध आहे. “ठाणे हे केवळ घर नव्हे, ते माझं साहित्यसंकुल आहे,” असं ते अभिमानाने सांगतात. ठाण्यातल्या साहित्य संमेलने, कॉलेज फेस्टिवल्स, सार्वजनिक व्याख्यानं या साऱ्यांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणं ही त्यांची आवड आहे. “सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असे असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचे ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल” असे ते अभिमानाने सांगतात.
हेही वाचा – ठाणे स्मार्ट करण्यास झटणारा अधिकारी!
सामाजिक जाणिवेचा कवी
दवणे सर केवळ साहित्यिक नाहीत, तर संवेदनशील नागरिकही आहेत. त्यांनी स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण, ग्रामीण शिक्षण, भाषाविकास अशा अनेक विषयांवर लिखाण केलं आहे.
सतत प्रवाही असलेलं मनस्वी व्यक्तिमत्त्व
प्रा. प्रवीण दवणे यांचं जीवन म्हणजे एक अखंड प्रवाह आहे. त्यांनी कधीही स्वतःला एका चौकटीत बंदिस्त केलं नाही. ते शब्दांशी खेळताना रसिकांना भावविश्वात घेऊन जातात. त्यांच्या लेखनातून प्रेम, माया, वेदना, आशा, श्रद्धा, व्यथा या साऱ्या भावना साकार होतात. त्यांचं लेखन, त्यांचं विचारविश्व आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व हे ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारं आहे.
1 Comment
वा! एका उत्कट व्यक्तिमत्वाचा उत्तम परिचय