ठाण्यातले पहिले वर्तमानपत्र – अरुणोदय

Thane : ब्रिटिशांच्या जुलमी शासनाविरुध्द स्वातंत्र्य चळवळीत ठाण्यातील आबालवृध्दांनी आवाज उठवला. सत्याग्रहापासून ते सशस्त्र लढ्यापर्यंत सगळे मार्ग चोखाळले. याला कारण होतं ठाण्यातील पहिलं वर्तमानपत्र. 22 जुलै 1866 रोजी ठाण्यातील पहिल्या वर्तमानपत्राचा ‘अरुणोदय’ या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
[gspeech type=button]

ब्रिटिशांच्या जुलमी शासनाविरुध्द स्वातंत्र्य चळवळीत ठाण्यातील आबालवृध्दांनी आवाज उठवला. सत्याग्रहापासून ते सशस्त्र लढ्यापर्यंत सगळे मार्ग चोखाळले. याला कारण होतं ठाण्यातील पहिलं वर्तमानपत्र. 22 जुलै 1866 रोजी ठाण्यातील पहिल्या वर्तमानपत्राचा ‘अरुणोदय’ या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाही झाली नव्हती तेव्हा काशिनाथपंत विष्णूपंत फडके यांनी ठाण्यातील आपल्या ‘अरुणोदय’ छापखान्यातून वर्तमानपत्र सुरू करुन जनजागृतीचं काम सुरू केलं.

काशिनाथपंत फडके यांनी पुण्यातील ज्ञानप्रकाश मध्ये जुळारी ( आजच्या भाषेत टाइप सेटर) म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर मुंबईतील ‘इंदुप्रकाश’, ‘ऑर्फनेज’ या छापखान्यांमध्ये काम केलं. 1865 साली त्यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर आपला ‘अरुणोदय’ हा छापखाना सुरू केला, हा ठाण्यातला पहिला छापखाना. याच छापखान्यातून ठाण्यातलं पहिलं  साप्ताहिक वर्तमानपत्र ‘अरुणोदय’ सुरू झालं. सुरुवातीला या वर्तमानपत्रावर संपादक म्हणून ‘रघुनाथ शंकर शास्त्री’ यांचं नाव दिलं जात असे. 1877 सालापासून काशिनाथपंत स्वतः संपादकपदाची धुरा सांभाळू लागले.

पत्रकारितेत अभिनव प्रयोग

अरुणोदयचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी पत्रकारिता बाल्यावस्थेत असताना फडके यांनी बातमी मिळवण्यासाठी बातमीदार नेमले होते. इतकच नाही तर ‘ज्ञानप्रकाश’मध्ये आलेली – ‘वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या बाहेरच्या लोकांना काही मोबदला देण्यात यावा’ ही सूचनाही अरुणोदयने उचलून धरली. 27 मे 1883 रोजी अरुणोदयमध्ये संपादकांनी प्रसिध्द  केलं होतं की, ‘ जे गृहस्थ आमच्याकडे चालू विषयांवर निबंध लिहून पाठवतील त्यांस दररोज कॉलमच्या निबंधास आम्ही अडीच रुपये प्रमाणे पाठवून देऊ.’ तेव्हा बंगालमध्ये देशी पत्रकारांची संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेमार्फत सरकारकडून माहिती मिळवण्याची सोय करण्यात आली होती. तशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण व्हावी अशी अरुणोदयकारांची इच्छा होती. मात्र आपल्याकडच्या पत्रकार आणि वर्तमानपत्रांमध्ये जी भांडणे सुरू होती, त्यामुळे अशी व्यवस्था कशी निर्माण होणार म्हणून अरुणोदयकारांनी खरमरीत स्फुट लिहून विशेषतः पुण्यातील विद्वानांना झाडले होते. ‘हिंदुस्थानी वर्तमानपत्रांचे वजन का नाही ?’ या मथळ्याच्या लेखात अरुणोदयकारांनी लिहीलं आहे की, ‘हिंदुस्थानचा राज्यकारभार हिंदुस्थानच्या लोकांच्या सल्ल्याने होत नाही, हेच त्याचे मुख्य कारण आहे. ते कारण जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आमच्या पत्रांस कधी खरे वजन येणार नाही.’

संमतीवयाच्या कायद्यावरुन पुण्यात सुधारक आणि सनातनी यांच्यात जो वादंग माजला होता त्यात केसरी आणि सुधारक ही वर्तमानपत्रे ज्या पध्दतीने एकमेकांवर चिखलफेक करत होती ते पाहून अरुणोदयकारांनी ‘विचारशून्य, ज्ञानशून्य आणि हलकट’ अशा शीर्षकाचा लेख लिहून दोन्ही बाजूंची कडक निर्भत्सना केली होती.

हे ही वाचा : ठाण्यातील पहिले सार्वजनिक सरकारी वाचनालय – म्युलक लायब्ररी

सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना प्राधान्य

अरुणोदय मध्येच सुप्रसिध्द ज्योतिषशास्त्रज्ञ शंकर बाळकृष्ण दिक्षित यांचा सायन पंचागाचा ‘एक पंधरवडा’ प्रसिध्द होत असे. अरुणोदय वर्तमानपत्र प्रसिद्ध होत असे त्या काळात एक गैरसमज असा प्रचलित होता की, छापखान्याच्या शाईत चरबी मिसळलेली असते. त्यामुळे अशा शाईत छापलेले धार्मिक ग्रंथ अपवित्र मानले जात असत. त्यामुळे अरुणोदयामध्ये सोवळ्याची वाचण्याची गुरुचरित्राची पोथी प्रसिध्द होत असल्याची जाहिरात पाहायला मिळते. अरुणोदयमध्ये सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना विशेष प्राधान्य दिलं जायचं. अरुणोदयच्या संपादकांचा कल जहाल विचारसरणीकडे होता. अरुणोदयकार फडक्यांचे सडेतोड आणि निर्भिड लेखन अर्थातच तेव्हाच्या इंग्रज सरकारच्या नजरेत आलं होतं. मात्र काशीनाथपंत हयात असेपर्यंत अरुणोदयवर सरकारी वरवंटा फिरला नाही. 

पत्रकारितेचा वारसा

काशीनाथ पंतांच्या पश्चात अरुणोदयचे संपादक म्हणून त्यांचे सुपुत्र  धोंडोपंत फडके यांनी जहाल विचारसरणीचे समर्थन आणि परकीय राजसत्तेविरुध्दचा लढा सुरूच ठेवला. धोंडोपंतांच्या संपादकीय कौशल्याचे उदाहरण म्हणजे, अरुणोदयच्या नव्या वर्षाच्या पहिल्या अंकात आधीच्या वर्षातील लेखांची अक्षरानुसार सूची (अल्फाबेटिकल इंडेक्स) देण्यात येत असे. अरुणोदय पत्राने आरंभापासून इंग्रज सरकारविरुध्द पवित्रा घेतलेला होता. त्यामुळे सरकारकडून अरुणोदयकारांना समजही देण्यात आली होती. तेव्हा अलाहाबादच्या पायोनियर मध्ये चटर्जी नावाच्या बंगाली गृहस्थाने ‘प्रेझेंट कंडिशन’ नावाचा लेख लिहिला होता. ‘अरुणोदय’मध्ये ना.गो.चाफेकर यांनी या लेखाच्या अनुषंगाने दोन – तीन अग्रलेख लिहिले होते. त्या काळच्या पध्दतीनुसार त्या लेखांचे इंग्रजीत भाषांतर होऊन ते सरकार दरबारी सादर करण्यात आले. त्यानंतर इंग्रज सरकारकडून ठाण्याच्या कलेक्टरमार्फत अरुणोदयाच्या संपादकांना बोलावून ताकीद दिली होती. 

हे ही वाचा : ऐतिहासिक घोडबंदर किल्ला

निडर पत्रकारितेसाठी तुरुंगवास

1908 मध्ये लोकमान्य टिळकांनी  प्रफुल्लचंद्र चाकी आणि खुदीराम बोस यांच्या कृत्याचे केसरीमध्ये अग्रलेख लिहून समर्थन केले. त्यावरुन इंग्रज सरकारने त्यांच्या विरुध्द राजद्रोहाचा खटला चालवला. याच सुमारास मुंबई, ठाणे इथल्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ‘महत्वाची इशारत’ या मथळ्याच्या एका निनावी पत्राला प्रसिध्दी देण्यात आली. मूळ इंग्रजीत असलेल्या या पत्रातील मुद्यांवर धोंडोपंत फडके यांनीही अरुणोदय मध्ये अग्रलेख लिहिला. त्याचे निमित्त करुन इंग्रज सरकारने अरुणोदयवर खटला भरला. या संदर्भात लोकमान्य टिळकांचा विचार घ्यावा म्हणून धोंडोपंत पुण्याला गेले. तेव्हा टिळकांच्या समोरच्या मेजावर अरुणोदयचा अंक होता आणि त्यातील काही मजकुराखाली रेषा मारुन तो अधोरेखित करण्यात आला होता. फडक्यांना पाहिल्यावर टिळकांनी विचारले की, ‘खटल्याविषयी विचारायला आला असाल ? ’ धोंडोपंतांना टिळकांनी व्यवहार्य सल्ला दिला की ‘तुरुंगात जायचं नसेल तर सरकारची माफी मागून मोकळे व्हा’. त्यावर धोंडोपंत फडके यांनी बाणेदारपणे सांगितलं की, ‘माफी मागणार नाही. तुरुंगात जायची तयारी आहे’.

या खटल्याने अरुणोदय छापखाना आणि वर्तमानपत्र यांची दुर्दशा झाली. धोंडोपंतांना जामिनावर सोडण्यासाठी हायकोर्टात केलेला अर्ज मंजूर झाला. तेव्हा विनायक लक्ष्मण भावे आणि शेठ मंगळदास देवीदास हे जामिन राहिले होते. नंतर जून महिन्यात खटल्याची सुनावणी होऊन धोंडोपंत फडके यांना तुरूंगवास झाला. त्यावेळी अरुणोदय छापखाना जोरात सुरू होता. 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेची तिकिटे छापण्याचे कंत्राट अरुणोदय छापखान्याकडे होते. या छापखान्याची पुण्याला शाखा होती. मात्र सरकारी वक्रदृष्टी फिरल्यावर हे सारं बंद पडलं. 

शुध्दलेखन कोशकर्ते अरुण फडके यांच्याकडे जबाबदारी

1957 साली धोंडोपंतांनी ‘प्रतियोगी’ नावाचे साप्ताहिक सुरू केलं. टिळकयुगाचे साक्षिदार असलेल्या धोंडोपंत फडक्यांचे 13 फेब्रुवारी 1958 रोजी निधन झालं. त्यांच्या पश्चात अरुणोदय छापखाना आणि ‘प्रतियोगी’ साप्ताहिकाची जबाबदारी त्यांचे धाकटे चिरंजीव गोपाळ फडके यांनी सांभाळली. धोंडोपंतांचे वंशज म्हणजे शुध्दलेखन कोशकर्ते अरुण फडके, ज्यांनी  शुध्दलेखन कार्यशाळा घेऊन मराठी लेखन अधिक निकोप आणि बिनचूक व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ठाणे शहराला जी पत्रकारीतेची आणि वर्तमानपत्रांची गौरवशाली परंपरा लाभली आहे, तिचा पाया फडक्यांच्या ‘अरुणोदय’ या साप्ताहिकाने घातला हे विसरून चालणार नाही.

1 Comment

  • प्रशांत कुलकर्णी

    माझ्या माहितीप्रमाणे याच काशिनाथ फडके यांनी माझ्या माहिती नुसार याच काशिनाथ फडके यांनी मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक हिंदू पंच हे सुरू केले होते. या हिंदू पंचाचे अंक मला बघायला मिळतील का ? तातडीने हवे आहेत खूप ठिकाणी
    विचारूनही हिंदू पंच बघावयास मिळाला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. माझ्या माहितीप्रमाणे याच काशिनाथ फडके यांनी माझ्या माहिती नुसार याच काशिनाथ फडके यांनी मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक हिंदू पंच हे सुरू केले होते. या हिंदू पंचाचे अंक मला बघायला मिळतील का ? तातडीने हवे आहेत खूप ठिकाणी
    विचारूनही हिंदू पंच बघावयास मिळाला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thane : ठाणे शहराचं एक मोठ्ठ वैशिष्ट्य म्हणजे या शहरात फक्त दीड किलोमीटरच्या टप्प्यात सहा वेगवेगळ्या धर्मांची प्राचीन प्रार्थना स्थळे
Thane : 1937 नंतर ठाणे नगरपालिकेची स्वतःची वास्तू उभी राहिली.बाजारपेठेतील स्टेशन रोडवरच्या या वास्तूमधून पुढे सतरा-अठरा वर्षे – महापालिका झाल्यावरही
Thane : ब्रिटिशांनी ठाणे शहराच्या जडण घडणीवर सर्वात मोठा परिणाम घडवून आणणारी एक संस्था, एक यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ