ठाण्याला कोणी मुंबईचा उंबरठा म्हणतं तर कोणी मुंबईची सावली म्हणतं. ठाणं पालथं घातल्याशिवाय मुंबई गाठता येत नाही, अशी पूर्वी ठाण्याची मिरासदारी होती. नंतर नवी-मुंबई वगैरे झाल्यामुळे मग बाकीचेही मुंबईला जाण्याचे चोरदरवाजे किलकिले झाले. मग मात्र कुजबूज म्हणा किंवा गलका म्हणा, पण तो असा सुरू झाला की, ठाणं आता पूर्वीचं राहिलेलं नाही. खरं सांगायचं तर अख्खं जग जिथे बदललं आहे, तिथं ठाणं तरी पूर्वी होतं तसं कसं राहील?
बदललेले निकष
अर्थात ठाणं बदललं आहे असं म्हणताना ठाण्यातल्या, म्हणजे जुन्या ठाण्यातल्या वय झालेल्या जुन्या लोकांचे निकष फार वेगवेगळे आणि फार वेगवेगळ्या पातळींवरचे असतात. आता खुद्द ठाण्यातले लोक आपल्या मुलामुलींचे लग्न करण्यासाठी ठाण्यातले हॉल न निवडता मूळ ठाण्यापासून दूर असलेल्या घोडबंदर रोडवरचे हॉल निवडतात. म्हणून काही लोक ‘ठाणं बदललं’ म्हणतात. बदललेलं ठाणं दाखवण्यासाठी हा निकष तितका खरा नसला तरी, अशा बऱ्याच छोट्या छोट्या बदलांची कोणी यादीच दिली तर कोण काय करणार! ठाणं बदललयं हे मान्य करण्यावाचून त्याच्यापुढे तरुणोपाय नसणार ना!
नौपाडा एकेकाळी ग्रामपंचायत!
ठाण्यातल्या नौपाड्याचंच उदाहरण घ्या. तिथे एखादी (आता टोलेजंग) इमारत उभी राहिलीच तर ती इन द हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे, असं ती बांधणारा बिल्डर तिचं वर्णन आपल्या जाहिरातीत करतो. नौपाडा निर्विवादपणे ठाणे सिटीचं हार्ट आहेच. पण ही हार्ट ऑफ द सिटी असलेलं नौपाडा 1958 पर्यंत नौपाडा ग्रामपंचायतीचं क्षेत्र होतं, हे ऐकल्यावर नव्या पिढीला नवल वाटणार नाही का? आज जो नौपाडा तिथल्या साड्या कपड्यांच्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमुळे झगमगून उठतो. तिथल्या रस्त्यांवर एकेकाळी संध्याकाळ झाली की, खेडेगावासारखा कभिन्न काळोख पसरून राहायचा. फार दाटीवाटी नसलेल्या तेव्हाच्या त्या नौपाड्याचा तो परिसर रात्री निर्जन होऊन जायचा. तेव्हा नौपाड्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारं उघडी असायची केवळ पावसाळ्यात नव्हे तर पावसाळ्याखेरीज इतर वेळीही पाणी तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर यायचं. येणाऱ्याजाणाऱ्यांची रस्त्यावरून वाट काढताना तारांबळ उडायची. आजच्या नौपाड्याकडे बघताना पूर्वीच्या नौपाड्याचं हे चित्र कोणाला पटेल? त्यावेळी ठाण्यात रिक्षा नव्हत्या. होते ते टांगे. काही काळानंतर वामनराव प्रभुदेसाई ह्यांनी ठाण्यात रिक्षा आणण्यासाठी खूप खटपट केली. तेव्हा कुठे पहिली रिक्षा ठाण्यात आली. ओंजळीएवढ्या ठाण्याला ती एक रिक्षा अपुरी पडू लागली. तेव्हा मग वामनराव प्रभुदेसाईंच्याच प्रयत्नाने आणखी पाच रिक्षा ठाण्याच्या रस्त्यांवर अवतरल्या. कमी असणाऱ्या वाहनांमुळे ठाणं सुटसुटीत होतं. आजच्यासारखं बटबटीत नव्हतं. नौपाड्यातली दुकानं दाटीवाटीनं नव्हती. एकमेकांपासून अगदी सुटी सुटी होती. तेव्हाच्या कमी लोकवस्तीमुळे दुकानासमोरून जाणाऱ्या माणसाला दुकानदार अगदी व्यक्तीगत ओळखत असायचे. समोरून जाताना दोन शब्द बोलून पुढे जायचे.
राम मारुती रोडवरचे वाडे आणि दुमजली घर
पुढे नौपाडा रस्त्याला लागून असलेला राम मारुती रोडची वाट रुंद झाली. आधी तिथे दुमजली घरं, वाडे होते. हळूहळू तिथे दुकानं, छोटेमोठे चहाचे ठेले होत गेले. काही दवाखाने सुरू झाले. आता तर राममारुती रोड मोठमोठ्या दुकानांनी इतका गजबजून गेला आहे की, जणू तो ठाण्याचा लॅमिंग्टन रोड झाला आहे.
मुख्याध्यापकांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळा
नौपाड्यात बेडेकर हायस्कूल आणि नौपाडा मिडल स्कूल आलं तसं राममारुती रोडला न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू गर्ल्स स्कूल आलं. आज तर न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू गर्ल्स स्कूल दिसेनासं होऊन त्याठिकाणी इंग्रजी माध्यमाची टोलेजंग शाळा उभी राहिली आहे. खरंतर त्यावेळच्या ठाण्यातल्या शाळा ह्या त्या त्या शाळांच्या हेडमास्तरांच्या नावाने ओळखल्या जायच्या. बेडेकर म्हणजे अशोक चिटणीस सरांची शाळा, न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे लीला पातकरबाईंची शाळा, मो.ह.विद्यालय म्हणजे स.वि. कुलकर्णीसरांची शाळा, दगडी शाळेकडे असलेली महाराष्ट्र विद्यालय म्हणजे द. म. मेहेंदळेसरांची शाळा वगैरे वगैरे. त्यावेळी इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं नसल्यामुळे मराठी माध्यमांतल्या ह्या शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून जायच्या.
सेंट्रल मैदानावर स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव हाती मशाली घेऊन साजरा
1972 साली देशाच्या स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी सेंट्रल मैदानाच्या बाजूला असलेल्या पोलीस परेड मैदानात सर्व शाळांमधल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बोलावलं गेलं होतं आणि त्या सर्व मुलांच्या हातात जळती मशाल देऊन ‘बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींनी लिहिलेलं गीत सामुहिकरित्या गाऊन घेतलं गेलं होतं. स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा होताना तो ठाण्यातला एक जंगी सोहळा होता. आजच्या भाषेत सांगायचं तर तो स्वातंत्र्यदिनाचा इव्हेंट होता. त्यानंतर 1997 साली जेव्हा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव झाला, तेव्हा मात्र ठाण्यातलं पोलीस परेड मैदान ओकंबोकं होतं. शेवटी तो बदलत्या ठाण्याचा, बदलत्या काळाचा साईड इफेक्ट होता.
सेंट्रल मैदानावरच्या राज्यस्तरीय कबड्डी, खो खो स्पर्धा
पोलीस परेड मैदानाचा विषय निघालाच आहे तर हे सांगायला हवं की, ह्या मैदानात तेव्हा राज्य पातळीवरच्या आंतरशालेय स्पर्धा व्हायच्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शाळांमधले खेळाडू तिथे येऊन कबड्डी, खो खो, लगंडी वगैरे खेळ खेळायचे आणि ते मैदान खरोखरच फुलून यायचं. आज ते लंगडी, खो खो हे खेळही राहिले नाहीत आणि त्यासाठी जिथून विद्यार्थी-विद्यार्थिनी यायचे; त्या शाळाही तशा राहिल्या नाहीत. हा ठाण्यातला बदल म्हणता येईल, म्हटल्यास बदललेलं ठाणंही म्हणता येईल.
ग्रीकांचं चेरसोनेस आणि पोर्तुगीजांचं कोकाबे-द-थाना
ठाणं हे असं बदलणारंच होतं. कारण ते ह्या देशातलं जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईला लागून होतं. मुंबईची पडछाया त्यावर पडली नसती तरच नवल! म्हणूनच प्राचीन काळात असलेल्या ठाणे स्टेशनाची श्रीस्थानक ही ओळख कधी पुसली गेली ते कळलंही नाही. त्याआधी ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमीचं ते चेरसोनेस आणि पोर्तुगीजांचं कोकाबे-द-थाना होतं, हे आज कोणा जुन्या ठाणेकराच्या गावीही नाही. ठाण्यात झालेल्या बदलाने घेतलेली ती एक खूप मोठी गिरकी आहे. 1853 मध्ये संपूर्ण भारतात धावत निघालेल्या रेल्वेचं शेवटचं टोक ठाणे होतं. आज त्या शेवटच्या टोकाला नवनव्या टोकाला जाणारे फाटे फुटले आहेत. घोडबंदर रोड हा त्यातलाच एक फाटा. आज तिथे दादर-ठाण्यातल्याच नव्हे तर मूळ ठाण्यात राहणाऱ्या माणसांनीही वस्ती केली आहे. त्यांचं हे ठाण्यातून ठाण्यात जाणं हा ठाण्यातला एक आणखी वेगळाच बदल आहे किंवा त्यांनी ठाण्यातल्या ठाण्यात केलेला बदल आहे.
साहजिकच, ठाण्यातल्या साठीसत्तरी गाठलेल्यांची ते आपलं ठाणं राहिलं नाही अशी कुजबूज त्यांच्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांवर सुरू झालेली असेल तर, त्यांच्या ज्येष्ठ नजरेतून खरी म्हणावीच लागेल !