लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिलं हे आता प्रस्थापित होतंय.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत 50 लाख मतदार वाढले. महाराष्ट्रातील 9 कोटी 20 लाख मतदारांची संख्या वाढून 9 कोटी 70 लाख इतकी झाली. पैकी महिला मतदार 26 लाख 57 हजार मतांनी वाढले.
पैकी मागच्या 2019 च्या विधानसभेला 2 कोटी 53 लाख 90 हजार महिलांनी प्रत्यक्ष मतदान केलं. यंदाच्या विधानसभेला 3 कोटी साडेसहा लाख महिला मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केलं. म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 52 लाख 58 हजार 671 महिला मतदार वाढल्या.
पण खरी गंमत गेल्या पाच महिन्यांतली आहे. लोकसभेला मार्च 2024 अखेरीस एकूण महिला मतदात्या होत्या 4 कोटी 43 लाखांच्या आसपास. तर अवघ्या पाच महिन्यांत 26 लाख 57 हजार मतदात्या वाढल्या. म्हणजे पाच वर्षांत जितक्या महिला मतदारांची संख्या वाढली त्याच्या 50 टक्के महिला मतदार अवघ्या पाच महिन्यांत वाढल्या. लाडकी बहीण योजनेमुळेच हे घडलं असं मानायला जागा आहे.
लोकसभेला महिला मतदारांचा उत्साह नव्हता. परिस्थिती ‘जैसे थे’ होती. मात्र विधानसभेला अधिकच्या साडेसव्हिस लाख महिलांनी महायुतीला पाठिंबा दिला. हा अर्थातच योगायोग नाही. वाढलेल्या मतदारांमधल्या अंदाजे 26.5 लाख महिलांच्या नोंदणीची खबर माध्यमांना लागलीच नाही. ऑक्टोबरच्या शेवटी निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली. त्या आकडेवारीत त्यातल्या त्यात नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या महिला जास्त दिसत होत्या. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात सरासरी 9228 म्हणजे सव्वा नऊ हजार महिला मतदार वाढल्या. आणि या महिला मतदारांनी चमत्कार घडवून आणला.
लाडकी बहीण योजना जाहीर झाली तेव्हा ती मुख्यमंत्र्यांच्या नावे झाली. या योजनेचं श्रेय घेण्यावरून सुरुवातीला ‘तूतूमैंमैं’ झालं. विरोधकांना या योजनेचं गांभीर्य कळलं नाही. सुप्रिया सुळेंनी सुरुवातीला आपल्या चुलत बहिणीशी प्रतारणा करणारे महाराष्ट्रातल्या बहिणींना काय मदत करणार, अशी भूमिका घेतली. जेव्हा या योजनेची खोली कळली तेव्हा अविरोधाची भूमिका घेतली गेली.
प्रत्यक्षात ही योजना अर्थखात्याची होती. 29 ऑगस्ट 2024 रोजी विधिमंडळात अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी ही योजना मांडली. या योजनेची मूळ संकल्पना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची होती आणि या योजनेच्या अंमलबजावणीचं कामही आदिती तटकरे यांच्याकडे होतं. काही महिन्यांच्या अवधीत आदिती तटकरेंच्या महिला व बालविकास खात्याने दोन कोटींपेक्षी अधिक महिलांची नोंदणी या योजनेसाठी केली. यातल्या 20 टक्के महिलांनी महायुतीला साथ दिल्याचं आकडेवारी बोलतेय. या योजनेची अंमलबजावणी होताना महायुतीतील घटकपक्षांनी या महिलांची मतदार नोंदणीही होईल हे पाहिलं. योजनेसोबत मतदार नोंदणी हमखाल पद्धतीने झाली. त्यात महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यामुळे प्रत्यक्ष त्या महिलेला जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशीपासून पैसे मिळू लागले तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसणार याची प्रचीती यायला हवी होती.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागील शिंदे सरकारमधील एकमेव महिला मंत्री दिली. महिलांचा विषय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विशेषत्वाने प्रथमपासून हाती घेतला होता.
जून 2023 मध्ये शरद पवारांसोबत उठाव करून अजित पवार 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर सुरुवातीचं कवित्व संपल्यावर लगेचच पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातल्या महिलांचा मंगळागौर कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला अजित पवारांना केंद्रस्थानी ठेवलं गेलं. परंतु आयत्या वेळी या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत. त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवार आल्या. दादांच्या बहिणींचा हिरमोड झाला.
पण अजित पवारांनी ही चूक लवकरच सुधारली. कारण फुले, शाहू, आंबेडकर ही त्यांच्या पक्षाची विचारधारा असली तरी ती सोयीची ठरत नव्हती. भारतीय जनता पार्टीचा पदर धरल्यामुळे लोकांमध्ये नकारात्मकता होती. पण अजित पवारांना धड सॉफ्ट हिंदुत्वही खांद्यावर घेता येत नव्हतं. अशावेळी 50 टक्के मतदार असलेल्या महिलांचा अनुनय करण्याची राजकीय भूमिका अजित पवार आणि त्यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व इतर सहकाऱ्यांनी घेतली.
राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील महिला मेळाव्यात षण्मुखानंद हॉलमध्ये अजितदादा उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवधूत गुप्ते यांचं भगिनींना उद्देशून असलेलं गाणं याच कार्यक्रमात लॉन्च केलं गेलं. ‘अजिंक्य भगिनी, अजित भगिनी’ हे गाणं महिलांमध्ये लोकप्रिय केलं गेलं.
पुढचा टप्पा अर्थातच लाडकी बहीण योजना होता. ही योजना एक वर्ष आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात घोळत होती. सर्व पक्षीयांचं अप्रूव्हल येता येता लोकसभेची आचारसंहिता लागली. मात्र लोकसभा निवडणूक संपताच ऑगस्ट महिन्यात ही योजना जाहीर केली गेली. अर्थात महिला मतदारांचं कन्व्हर्जन गृहित धरण्यात आलं होतं. रंगबिरंगी कपड्यातल्या महिलांच्या कार्यक्रमाला टाळणारे अजितदादा पुढे कँपेनमधे गुलाबी रंगाचं जाकिट परिधान करू लागले.
आता या योजनेचं श्रेय एकत्रितपणे घेतलं जात आहे. ही युतीची जमेची बाब आहे. पण लाडक्या बहिणींच्या पदरात टाकलेली ही ओवाळणी या लाडक्या भावांना आता निभावावी लागणार यात शंका नाही.