निवडणुकीत भावनिकतेचा बाजार जोरात असतो. इतका जोरात की समोरचा उमेदवार भावनिक बाजार करतोय असं नॅरेटिव प्रस्थापित करण्यासाठी भावनेच्या भरात विरोधी उमेदवारही रडतच असतो. प्रगतीचं रोल मॉडेल समजल्या जाणाऱ्या बारामतीत या निवडणुकीत भावना फारच स्वस्त झाली. पवार कुटुंबामध्ये ‘दिवार’ सिनेमा घडतोय. ही भिंत कुटुंबातल्या ज्येष्ठांना दावणीला बांधू लागली आहे.
अजितदादा पवार यांनी सांगता सभेमध्ये मातोश्री श्रीमती आशा अनंतराव पवार यांना आणलं. त्या 87 वर्षांच्या आहेत. आजारी असतात. तोंडाला मास्क लावून खुर्चीवर बसून होत्या. ‘मेरे पास माँ हैं’ हा खरं तर ‘दिवार’मधल्या धाकट्या भावाचा डायलॉग. पण तो डायलॉगही अजितदादांनी स्वतः मनगटाला बांधला. ज्या थोरल्या भावाकडे गाडी, बंगला, धनदौलत, ऐषोआराम, इज्जत, शोहरत आणि उपमुख्यमंत्रीपद आहे त्याच्याकडेच आता ‘माँ’पण आहे. हा ‘दिवार’ सिनेमाचा बारामती सिक्वल आहे.
मग धाकट्याकडे काय आहे? त्यांच्याकडे 84 वर्षांचे महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री समजले जाणारे ‘काका’ आहेत. लाडकी बहीण आहे. आणि राजकारणात परिस्थितीवश संधी मिळालेला तरुण मुलगा आहे.
सिनेमातल्याप्रमाणे धाकटा बंधू हा काही प्रामाणिक पोलिस अधिकारी नाही. बापूंच्या बारामतीतल्या टोयोटा गाड्यांच्या शोरूमवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सर्च ऑपरेशन केलं. त्यांनी तिथे पार्क केलेल्या गाड्यांच्या डिक्या तपासल्या. निवडणूक काळात भरारी पथकं गाड्यांच्या डिक्या का तपासतात हे आता गुपित राहिलेलं नाही. सर्वसामान्यांनी निवडणूक काळात निकोप लोकशाहीसाठी या तपासणीला सामोरं जाणं खुल्या दिलाने पत्करलं. पण श्रीनिवास बापूंनी मीडियाला बाइट देत याचं राजकारण केलं. तीही त्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी असावी.
राज ठाकरेंनी प्रचाराच्या भाषणात उद्धव ठाकरेंना रडुबाई असं संबोधलं होतं. राज ठाकरेंना भाषणात पब्लिक नस बरोबर कळते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी ही रडुबाईची झूल पांघरली आहे. ती प्रसंगी इरीटेट करणारी ठरू शकते. मविआच्या नेत्यांनी सतत व्हिक्टिम प्ले करणं हे लोकांना कमजोरपणाचं लक्षण वाटू शकतं. महाराष्ट्रातल्या लोकांना कमजोर राजकारणी आवडत नाहीत.
बारामतीत खासदार शरद पवार यांनी व्यापक मॅक्रो पातळीवरचा पवार कुटुंबातला कलह युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उमेदवारी देऊन मायक्रो केला. त्यामुळे बारामतीची लढाई अजितदादा आणि श्रीनिवासबापू पवार या सख्ख्या भावांच्या कुटुंबातली झाली. शरदचंद्र गोविंदराव पवार या 84 वर्षांच्या प्रगल्भ चतुरस्र राजकीय व्यक्तिमत्वाभोवती वयोमानाच्या सहानुभूतीची धार होतीच. ती बोथट करण्यासाठी अजितदादांनी आपल्या आईला सांगता सभेला आणलं असा आरोप होणं साहजिकच.
श्रीनिवास पवार यांनी माध्यमांना भावनिक राजकारण झाल्याचं सांगितलं. सांगता सभेत श्रीमती आशा अनंतराव पवार यांचं पत्र वाचून दाखवलं गेलं. त्या पत्राच्या सत्यतेवरही बापूंनी बोट ठेवलं. आपल्या आईला दबावाखाली सभेला आणलं गेलं असा सूर श्रीनिवास बापूंनी काढला. परंतु, या दोघांच्या मातोश्रींचा सभेतला वावर कम्फर्टेबल होता. त्या लोकांना अभिवादन करत होत्या. माध्यमांच्या कॅमेऱ्यांना हातही दाखवत होत्या. त्यामुळे भावनिकतेला काटशह देण्यासाठी श्रीनिवास बापूंनीही भावनिकतेचाच आधार घेतल्याचं स्पष्ट होतंय.
आता सोशल मीडियावरचे निष्पाप निरागस ट्रोलर श्रीनिवास बापूंना विचारतायत की, तुम्ही नाही का 84 वर्षांच्या शरद पवारांना निवडणुकीत दिवसाला चार-चार सभांमध्ये फिरवलं. मग अजितदादांनी 87 वर्षांच्या आईला सभेत आणलं तर काय बिघडलं? त्यांच्यापेक्षाही निरागसतेत आणि निष्पाप वर्तनात वरचढ असलेले प्रतिट्रोलर्स मग त्यावर म्हणतायत की शरद पवार राजकीय जीवनात सहा दशकं आहेत. आशाताई तर राजकारणात कधी नव्हत्याच.
पण स्वतःच्या मुलाचा प्रचार करण्यासाठी राजकारणात मोठी करिअर असण्याची काय गरज? महायुतीच्या सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये वडिलांसोबत आईचं नाव लावण्याचा कायदा केला. अजितदादांसह सर्वच महायुतीचे नेते आपल्या कचेरीच्या पाटीवर आईचं नाव अभिमानानं आणि आनंदानं मिरवतात. त्यामुळे प्रचाराच्या सभेला आईला आणणं हे लॉजिक अजितदादांच्या केव्हाही फायद्याचंच.
तरीही निवडणूक प्रचारात कुणाचंही वय काढणं हा मुद्दा कितपत संयुक्तिक? वयोमानाच्या शह-काटशहाच्या राजकारणात लोक हे विसरत आहेत की, राजकीय प्रचारात अनेक ज्येष्ठ हिरीरीने सहभाग घेतात. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकाचं वय 60 वर्षे आहे. म्हणजे साठ वर्षांच्या वरचा प्रत्येक नागरिक ज्येष्ठच म्हणावा लागेल. या न्यायाने साठ टक्के उमेदवारांना वयस्क या सदरात गणावं लागेल. त्यांचा प्रचार करणाऱ्या साठीच्या वरच्या प्रत्येक नागरिकाला घरीच बसवावं लागेल.
निवडणूक प्रचारात अनेक ज्येष्ठ उत्साहाने उतरतात. उमेदवारांच्या पावत्या तयार करून वाटणे, घरोघरी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणे, स्थानिक उमेदवारांना भाषणं लिहून देणे यात ज्येष्ठांचा वापर होतो. गर्दी जमवण्यासाठी बाया-बापड्यांना गोळा करण्यासाठी ज्येष्ठांचाच वापर केला जातो. अगदी कॅश वाटप करताना सापडल्याचा आरोप असलेले निरागस नेतेसुद्धा साठीपार आहेत. टीव्ही आणि युट्युबवर राजकीय चर्चा करणारे वयाने आणि बुद्धीने केव्हाच साठीपार झालेले असतात.
आपल्या राज्यात 9 टक्के मतदार हे ज्येष्ठ नागरिक या गटात मोडतात. हा मोठा आकडा आहे. अधिक पावसाळे पाहिल्यामुळे, तसेच विविध अनुभवामुळे आपसुक प्राप्त झालेल्या सामाजिक तसेच राजकीय प्रगल्भतेचा फायदा त्यांना असतो. ते स्वतःहून राजकारणात डोकावत असतात. तरुणांकडे राजकारणाची धुरा सोपवली पाहिजे हे वयस्कांचं एक भावनिक नॅरेटिव. प्रत्यक्षात तसं कुणी करत नसतं. त्यामुळे शरद पवार काय किंवा सांगता सभेतल्या आशाताई पवार काय या स्वतःच्या कुठल्या ना कुठल्या भावनिक प्रेरणेनेच या प्रचारात सामील झालेल्या असतात. आशाताई पवार या सक्रिय राजकारणात कधी नव्हत्या तरी त्यांना स्वतःच्या मुलाच्या प्रचारात उपस्थित राहण्याचा अधिकार नक्कीच आहे. शरद पवारांच्या दिवसाच्या चार-चार सभांमध्ये सामील होण्याबद्दल लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतात. तो त्यांचा आणि अर्थात मविआचा युएसपी आहे.
पक्षफोडी, ईडी किंवा तत्सम केंद्रीय संस्थांचा वापर, भ्रष्ट नेत्यांचं धुलाई मशीन, स्वपक्षातील जुन्या जाणत्यांना डावलणं यामुळे महायुतीबद्दल नकारात्मकता आहे. लोकसभेला 0.6 टक्के मतवाट्याने पडलेला फरक विधानसभेतही उलथापालथ करू शकतो.
सकारात्मक परसेप्शन आजही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पण तरीही हे महाविकास आघाडीतले नेते महायुतीच्या मुरलेल्या राजकारण्यांना पुरून उरत ‘कांटे की टक्कर’ देऊ शकतात असं नॅरेटिव उभं करण्यात मात्र अपुरे पडले आहेत. अपवाद फक्त वयोवृद्ध शरद पवार. महाविकास आघाडीच्या प्रचारात महाराष्ट्रात शरद पवार आणि केंद्रातून राहुल गांधी सोडले तर अशी जिगर कुठल्याच विरोधकाने दुर्दैवाने दाखवली नाही.
बारामतीत मात्र लढाई मविआ किंवा महायुतीची नाही.
शरद पवारांनीच ती लढाई अजितदादा आणि श्रीनिवास बापूंमधली करून टाकली आहे.
त्यात दोघांच्याही आईचं पत्र हरवलंय हे मात्र नक्की!