पारधी समाज आजही दुर्लक्षित आहे. या समाजाकडे आजही चोर म्हणूनच पाहिलं जातं. भारताला स्वातंत्र्य म्हणून 70 वर्षाहून अधिक काळ झाला तरीसुद्धा पारधी समाजाच्या पदरी निराशाचा आहे. खोट्या गुन्हांमध्ये पारधी समाजातील व्यक्तींना अडकवणे चोरी झाली की पहिल्यांदा त्यांच्यावरच संशय घेणं अशा अनेक अडचणींचा सामना पारधी समाजाला आजही करावा लागतोय. मुळात पारधी समाज हा स्थिर नाही आणि त्यांच्या स्थिरतेसाठी काम करणारे काही मोजके लोकं आहेत. पारधी समाजाच्या प्रगतीसाठी मागील अनेक वर्ष काम करणाऱ्या प्रकाश वायदंडे यांच्याशी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ने बातचीत केली आणि पारधी समाजाचे भीषण वास्तव समजून घेतलं.
पारध्यांच्या प्रश्नांचं भांडवल
प्रकाश वायदंडे या समाजाचे भीषण वास्तव दर्शवताना सांगतात, मी ज्यावेळी या चळवळीत काम सुरू केलं त्यावेळी आधीपासूनच अन्य काही चळवळी बांधव पारधी समाजाच्या प्रश्नावर काम करत असल्याचं समजलं. त्यावेळेला या चळवळीत काम करणाऱ्यांकडून पारध्यांच्या प्रश्नांचे भांडवल होतं असल्याचं वास्तव ही चळवळीची दुसरी बाजू समोर आली. पारध्यांच्या असह्यतेचा फायदा घेत आपलं नेतृत्व फुलवलं जातं. हा सर्व प्रकार समजल्यानंतर मला हे खटकायला लागलं. कारण पारधी समाजाचे प्रश्न घोंगड्यासारखे भिजत ठेवत कार्यकर्ते किंवा नेत्यांनी त्याचा वापर केला होता. म्हणून पारध्यांना या गर्तेतून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काम करावं लागेल हे लक्षात ठेवून मी काम सुरू केलं.
मला या घटकांसाठी काम करावसं वाटलं, कारण माझ्या गावात पारध्यांच्या मुलांकडून एका वडापावाच्या बदल्यात अख्खी ट्रॉली वाळू भरून घेतली जात होती. आणि तीच ट्रॉली भरायला दुसरे मजूर पन्नास रुपये घ्यायचे. याची चीड आल्यानंतर मी या समाजासाठी काम करण्याचं ठरवलं.
माझे आजोबा कोतवाल होते. पूर्वी आमच्या घरी पारधी आणि कंधारभाट समाजाचे लोक यायचे. या दोन्ही जातींना गुन्हेगारीचं लेबल होतं. पोलीस पाटलांनी कोतवालाला चिठ्ठी द्यायची, ती चिठ्ठी घेऊन पारधी आणि कंजारभाट समाजाची लोक भीक मागत फिरायचे. हा सर्व प्रकार पाहून माझ्या मनात चिड निर्माण झाली. या समाजातील व्यक्तींना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी मी काम सुरू केलं. त्यांना रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जातीचे दाखले तसेच राहण्यासाठी घर या बाबींवर काम केलं महाराष्ट्रातील अनेक भागात यावर काम करून काही प्रमाणात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
हे ही पाहा : Podcast | पारधी समाजाचं भीषण वास्तव! समाजासाठी अनेक वर्ष झटणाऱ्या प्रकाश वायदंडे यांच्या तोंडून…
सर्वच पारधी समाज गुन्हेगार नाही
सर्वच पारधी समाज गुन्हेगार नाही. एका कार्यक्रमात मला एका एसपींनी बोलावलं होतं. तेव्हा त्या कार्यक्रमात एका एलसीबीच्या पीआयने भाषण करताना सर्व गुन्ह्यात पारधी समाजाचा सहभाग असल्याचे सांगितले. आणि पारध्यांना सुधारण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे असं सांगितले. त्यावेळी मी त्यांना यावर्षी दरोडा, घरफोडी, रस्ता लुटीचे गुन्हे किती घडलेत हे विचारलं. त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकारात एकूण 283 गुन्हे घडल्याचे सांगितले. या सगळ्या गुन्ह्यापैकी फक्त 23 गुन्ह्यात पारध्यांचा सहभाग असल्याचं उघड झालं. त्यावेळी मी इतर राहिलेल्या गुन्ह्यात कोणाचा सहभाग होता हा प्रश्न उपस्थित केला. म्हणजेच पारधी समाजाला लागलेलं लेबल हे त्यांच्यासाठी अन्यायाचंच आहे. कारण त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसताना देखील तेच गुन्हेगार आहेत, असा समज सगळ्यांचा होतो.
पारध्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते
दिवे आगारला गणपती मंदिरावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन वॉचमनचा मृत्यू झाला होता. सोन्याचा गणपती चोरला गेला होता. त्यावेळी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला, आर आर पाटलांचा राजीनामा मागितला गेला. विधानसभेतही गदारोळ झाला. या घटनेत मिरज तालुक्यातील तीन पारध्यांना पोलीस घेऊन गेले आणि त्यांना दिवेआगार पोलिसांकडं सोपवलं. व्हेरिफिकेशन केल्यानंतर ते दोषी आढळले नाहीत. त्यांना सोडलं गेलं. आणि त्यांना ज्यावेळी सोडलं गेलं तेव्हा सोडताना त्यांचा ताबा खोपोली पोलिसांना दिला. दोन दरोड्यांच्या प्रकरणात हा ताबा दिला. त्यावेळी दापोली पोलिसांनी त्याच दिवशी कोर्टाला सांगितले. आमच्या इथल्या गुन्हामध्ये या पारद्यांचा कसलाही संबंध नाही. त्यानंतर त्या पारध्यांना रत्नागिरी, खेड,चिपळूण आणि सावर्डे या चार पोलीस स्टेशनला 16 गुन्ह्यांमध्ये 395, 392 मध्ये अडकवण्यात आलं. फक्त श्रेयवादासाठी पोलिसांनी या तीन पारध्यांना अटक केलं. या तीनही पारध्यांकडे त्यांच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांना वाट खर्चाला पैसे नव्हते. त्यांच्या घरातील महिला कशातरी त्या तीन पारध्यांनाना सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचायच्या. आम्ही पोलिसांना अन्याय करू नका सांगत होतो. या तीनही पारद्यांचा वरील कोणत्याही गुन्हामध्ये सहभाग नसल्याचे सांगत होतो. मात्र पोलिसांनी काही ऐकलं नाही. त्या पारद्यांना त्यांनी मारहाण केली. थर्ड डिग्री दिली अनेक नको त्या पद्धतीने टॉर्चर करत त्यांचे हाल हाल केले. त्यांच्यावर नको त्या पद्धतीने किळसवाणे प्रकार केले. या सर्व घडामोडीनंतर या तिघांना त्यांच्याच जात बांधवांनी जातीबाहेर काढलं. असं सर्व प्रकार घडला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी काही ऐकलं नाही. तेव्हा आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली. त्यांनी दखल घेत तपास करण्यास सांगितले. तेव्हा या पारध्यांच्या कुटुंबीयांना मॅनेज करून केस मागे घेतली. दरम्यान त्याच दिवेआगर केसमधील आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यात सापडले. आणि विनाकारण या तीन पारध्यांचे हाल हाल करण्यात आले. याच घटनेत आणखीन एक भयानक प्रकार घडला. यातल्या एका पारध्याच्या बायकोने केसला येण्या जाण्यासाठी वाट खर्चाला पैसे नव्हते म्हणून आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलीला विकलं हे भयाण वास्तव या समाजाचे आहे.
अजून एका मुलाच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगतो. एक पारधी समाजाचा मुलगा ज्याला काही अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलं होतं. त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि तो एमपीएससीचा अभ्यास करू लागला. त्यावेळी आम्ही कराडमध्ये काही कामानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तो मुलगा माझ्यासोबतच होता. आम्ही फडणवीस यांना भेटत होतो. त्याच दरम्यान त्याच्यावर 326 चा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे जर पोलिसांना गुन्ह्यातील आरोपी सापडत नसतील तर काही अधिकारी पारधी समाजाचा वापर करतात हे उघड उघड सत्य आहे.
हे ही वाचा : बाईला मिळालेली निसर्गदत्त देणगी नाकारण्याचा अधिकार यांना कुणी दिला?
आमच्यासारख्याच काहींनी या समाजाचे भांडवल केलं
पारधी समाजाचे काहींनी भांडवल केलं असून त्यांच्या स्वार्थासाठी पारधी समाजाचा वापर केला गेला. दंगा करायचा असेल घ्या पारध्यांना, मोर्चा काढायचा असेल घ्या पाराध्याना… याही पुढे जाऊन एका राजकारण्याने जाहिर पत्रकार परिषदेत पारध्यांना अंगावर सोडू असं वक्तव्य केलं होतं. या सर्वांनाच पारध्यांना गुन्हेगारच बनवून टाकायचं आहे असंच दिसतंय.