छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यातल्या 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यापैकी 6 नक्षलवाद्यांवर सरकारने एकत्रितरित्या 25 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. तर यातले 9 नक्षलवादी हे सुकमा जिल्ह्यातले केरलापांडा ग्रामपंचायत गावातले होते. या नऊही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे केरलापांडा गाव हे नक्षलमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे हे गाव छत्तीसगड राज्य सरकारच्या एल्वाड पंचायत योजनेसाठी पात्र ठरलं आहे.
एल्वाड पंचायत योजना
या एल्वाड पंचायत योजने अंतर्गत छत्तीसगडमध्ये गावाच्या विकासासाठी विशेष निधी दिला जातो. जानेवारी 2025 मध्ये नक्षली आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाचा भाग म्हणून ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेनुसार, छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायांमध्ये सहभागी असलेल्या गावातल्या सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं तर, त्या गावाला नक्षलमुक्त घोषित केलं जातं. आणि मग त्यांना 1 कोटी किंमतीच्या विकास प्रकल्पांसाठी अनुदान दिलं जातं.
एप्रिल महिन्यात सुकमा जिल्ह्यातल्या बडेसट्टी गावातल्या 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे हे गावही नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं.
दिशाभूल करुन नक्षली चळवळीत सहभाग
दरम्यान, नक्षलवाद्यांच्या पोकळ आश्वासनं, फसवी विचारसरणी आणि अत्याचारांमुळेच नक्षलवादी चळवळीशी जोडलो गेल्याची माहिती देत एका महिला नक्षलवादी कार्यकर्तीसह 16 जणांनी सीआरपीएफ जवानांकडे आत्मसमर्पण केलं, अशी माहिती सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
हे ही वाचा : नक्षलवाद्यांच्या हरयाणवी कॅडरचं आत्मसमर्पण
नक्षलमुक्त भारत
गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी मोठी मोहिम राबवली जात आहे. 14 मे 2025 रोजी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरच्या कुर्रगुट्टालू डोंगरावर (KGF) आतापर्यंतची सगळ्यात मोठी नक्षल विरोधी मोहीम राबवली. या कारवाईत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या डोंगरावर पूर्वी लाल दहशतवाद्याचं राज्य होतं. त्याठिकाणी आता तिरंगा फडकायला सुरुवात झाली आहे. या कुर्रगुट्टालू डोंगरावर PLGA बटालियन 1, DKSZC, TSC आणि CRC यासारख्या मोठ्या नक्षली संस्थाचे मुख्य केंद्र होतं. इथे नक्षली प्रशिक्षण आणि हत्यारं बनवली जात.
खराब वातावरणातही सुरक्षा रक्षकांनी 21 दिवसांच्या कारवाईत हे केंद्र पूर्ण उद्धवस्त केलं. यामध्ये एकही जवान शहीद झाला नाही.
नक्षली चळवळीत जबरदस्तीने भरती करणाऱ्यांवर आरोपपत्र दाखल
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिनांक 31 मे 2025 रोजी 3 नक्षलवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं. झारखंडमधल्या रांची इथल्या विशेष न्यायालयात कृष्णा हंसदा उर्फ सौरव दा उर्फ अविनाश दा, अभिजित कोरह उर्फ मतला कोरह उर्फ सुनील कोरह आणि रामदयाल महतो उर्फ नीलेश दा उर्फ बच्चन दा यांच्यावर 2023 च्या सीपीआय दहशतवादी कट प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप ठेवला आहे. याशिवाय हे तिघे नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचे आढळून आलं असून झारखंडमधल्या गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथच्या सामान्य भागात खंडणी, सशस्त्र धमकी आणि जबरदस्तीने भरती करण्याच्या मोठ्या कटाचा भाग होते असं या आरोपपत्रात म्हटलं आहे.