भारतासाठी अत्यंत अभिमानाची बातमी! भगवत गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र या दोन ऐतिहासिक ग्रंथांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय जागतिक वारसा दिनानिमित्त जाहीर करण्यात आला. यामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाला जागतिक मान्यता मिळाली आहे.
भारतासाठी अभिमानाचा क्षण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, “भगवतगीता आणि नाट्यशास्त्र यांना युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट करणं, म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञानाला आणि समृद्ध संस्कृतीला जगानं दिलेली मान्यता आहे. या दोन पुस्तकांनी अनेक शतकांपासून आपली संस्कृती आणि विचार समृद्ध केले आहेत. यातील ज्ञान आजही जगाला प्रेरणा देतं.
हेही वाचा: यूनेस्को – जागतिक वारसा मानांकन देणारी संस्था
भरत मुनींचं नाट्यशास्त्र
युनेस्कोने नाट्यशास्त्राबद्दल माहिती देताना सांगितलं की, हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. ते सुमारे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात लिहिलं गेलं होतं आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत (Bhandarkar Oriental Research Institute) जपून ठेवलं आहे.
नाट्यशास्त्र म्हणजे नाट्यवेदाचा महत्त्वाचा भाग. नाट्यवेद म्हणजे संगीत, नृत्य आणि नाटक यांसारख्या कलांचं 36 हजार श्लोकांचं मोठं ज्ञानभांडार होतं. याला गांधर्ववेद असंही म्हणतात. भरत मुनींचं नाट्यशास्त्र हे याच ज्ञानाचा महत्त्वाचा आणि छोटा भाग आहे.
रसाशिवाय नाटकाला अर्थ नाही
युनेस्को म्हणतं की, भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, ‘जोपर्यंत रस नाही, तोपर्यंत नाटकाला खरा अर्थ येत नाही.’ ही गोष्ट जगातील साहित्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे.
नाट्यशास्त्रामध्ये नाटक कसं असावं, अभिनय कसा करावा, रस म्हणजे काय , भाव म्हणजे काय, संगीत कसं असावं, या सगळ्या गोष्टींचे नियम सांगितले आहेत. यामुळे भारतीय नाटक, कविता, सौंदर्यशास्त्र, नृत्य आणि संगीत कसं असावं हे समजतं.
भगवतगीतेच्या हस्तलिखिताला युनेस्कोच्या यादीत मानाचं स्थान
भगवतगीतेमध्ये 18 अध्यायांमध्ये 700 श्लोक आहेत. हे श्लोक महाभारताच्या भीष्मपर्वामध्ये येतात. या श्लोकांत कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद आहे. जेव्हा मोठी लढाई होणार असते, तेव्हा अर्जुन निराश होतो आणि त्याला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी भगवान कृष्ण उपदेश करतात.
भगवतगीता हे भारताच्या प्राचीन विचारांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. यात वैदिक, बौद्ध, जैन आणि चार्वाक यांसारख्या अनेक विचारसरणींचा समन्वय आहे.
युनेस्कोने सांगितलं आहे, की भगवतगीतेत खूप खोलवरचे आणि विस्तृत विचार मांडलेले आहेत. त्यामुळेच हे पुस्तक जगभरात अनेक शतकांपासून वाचलं जात आहे आणि अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘एक्स’ (X) वर म्हटलं आहे, की “भारताच्या संस्कृतीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव करतो.”
गजेंद्र सिंह यांनी पुढे असंही सांगितलं की, भगवतगीता आणि नाट्यशास्त्र ही दोन्ही पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नाही तर ती आपल्या विचारांचा आणि भावनांचा पाया आहेत. आपण काय विचार करतो, आपले अनुभव, आपण कसं जीवन जगतोय या सगळ्यावर त्यांचा प्रभाव आहे. या नव्या समावेशामुळे आता युनेस्कोच्या यादीत आपल्या देशाच्या एकूण 14 गोष्टी आहेत. त्यांनी या दोन्ही पुस्तकांची काही छायाचित्रंही शेअर केली आहेत.
17 एप्रिल 2025 , गुरवारी युनेस्कोने जगातील 74 नवीन ऐतिहासिक कागदपत्रांचा आणि पुस्तकांचा समावेश त्यांच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये केला. त्यामुळे आता या यादीत एकूण 570 गोष्टींची नोंद झाली आहे, असं युनेस्कोने सांगितलं. युनेस्कोची एक खास समिती या सर्व नोंदीचं परीक्षण करते आणि त्यानंतर युनेस्कोचे कार्यकारी मंडळ याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात.
आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वाच्या नोंदी युनेस्कोच्या यादीत
अनेक नवीन नोंदी अशा आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या महत्त्वाच्या करारांविषयी आणि घटनांविषयी आहेत. यात स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा कराराचा (Geneva Conventions) समावेश आहे. ते युद्ध आणि मानवतावादी मदतीसंबंधी नियम ठरवतात. याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार घोषणेचा (Universal Declaration of Human Rights) आणि नामिबियाच्या 1991 च्या विंडहोक घोषणेचा (Windhoek Declaration) समावेश आहे.
युनेस्कोचे मत
युनेस्कोच्या महासंचालिका ऑड्रे अझोले यांनी सांगितले की, “ऐतिहासिक दस्तऐवज हा जगाच्या आठवणींचा एक नाजूक पण महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी यामध्ये मॉरिटानियातील चिनगुएट्टी येथील लायब्ररी आणि कोटे डी’आयव्हर येथील संग्रहालयांचे उदाहरण दिले.
भारताच्या युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी मंडळानेही भारताच्या प्राचीन ग्रंथांचा या यादीत समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि युनेस्कोचे आभार मानले.