विश्वनाथन आनंद, रमेशबाबू प्रज्ञानंद, रमेशबाबू वैशाली, अर्जुन कल्याण, पी.व्ही.नंदीधा, मॅन्यूएल अॅरोन, सुब्बरामण विजयलक्ष्मी, शशीकिरण कृष्णन, अधिबान भास्करन, श्यामनिखिल प्रशांत, गुकेश डी. ही फलटन आहे, तामिळनाडूतील बुद्धीबळ जेत्यांची.
कोणी वर्ल्ड चॅम्पियन, कोणी नॅशनल तर कोणी ग्रँडमास्टरचा किताबाचा मानकरी ठरलेला आहे. आणि हे सगळे खेळाडू आहेत तामिळनाडू राज्यातील.
अभिनेता शाहरूख खान यांचा ‘चक दे इंडिया’ सिनेमामध्ये एक दृश्य आहे. जिथं खेळाडू त्यांचं नाव सांगताना आपापल्या राज्याचं नाव सांगत होते. तेव्हा शाहरूख खान त्यांना अडवतो आणि आता आपण भारतीय आहोत, हीच एकमेव आपली ओळख आहे असं ठासून सांगतो.
पण बुद्धीबळ खेळामध्ये ज्या पद्धतीने तामिळनाडू राज्यातून हे चॅम्पियन्स घडवले जात आहेत, ते पाहता त्यांच्या नावामागे त्यांच्या राज्याचं नाव आवर्जून दिलंच पाहिजे. जेणेकरून इतर राज्याही यातून प्रेरणा घेऊन त्या अनुषगांने काम करतील. कारण देशातील 85 ग्रँडमास्टरर्सपैकी 31 ग्रँडमास्टरर्स हे तामिळनाडू राज्यातील आहेत. तामिळनाडूतील तिरुवरूर जिल्हा हे या बुद्धीबळपटूंचं मंदिर म्हणून उदयास येत आहे.
13 नोव्हेंबरपासून सिंगापूर येथे वर्ल्ड चेस चॅम्पियन्सशीप सुरू आहे. त्यामध्ये गुकेश डी. हा 18 वर्षाचा तरूण आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 14 डिसेंबरला स्पर्धेची अंतीम फेरी आहे. गुकेश डी. याच्या ‘वर्ल्ड चॅम्पियन होणं’ या स्वप्नाशी तामिळनाडूतील विशेषत: वेलमल नेक्सस स्कूलमधल्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न जोडलेलं आहे.
बुध्दीबळपटूंचे गुरू वेलावन सुब्बिया
आज तामिळानाडूमधून अक्षरश: बुद्धीबळपटूंची खाण निर्माण केली जात आहे. आणि यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो वेलावन सुब्बिया या 56 वर्षाच्या कोचचा. तामिळनाडूतील बरेचसे बुद्धीबळपटू हे वेलावन यांचे विद्यार्थ्यी आहेत. वेलावन हे 10 वर्षाहून अधिक काळ शाळेत कोचची भूमिका बजावत आहेत.
वेलावन सुब्बिया हे पूर्वी कन्स्ट्रंक्शन साईट्स वर मटेरियल सप्लाय करण्याचा व्यवसाय करत होते. सुब्बिया यांची मुलगी वर्षानी हिने सुद्धा ग्रँडमास्टर किताब मिळवलेला आहे. तिच्यावरून सुब्बिया आणि शाळेचा परिचय आला. शाळेच्या बुद्धिबळ कोचने राजीनामा दिल्यावर वेलावन सुब्बिया हे मुलीच्याच शाळेत कोच म्हणून रुजू झाले. या कामात त्यांनी स्वत:ला एवढं गुंतवून घेतलं की त्यांनी आपला व्यवसाय बंद केला आणि पूर्ण वेळ कोचची जबाबदारी पार पाडू लागले. आज ते मटेरिअल सप्लायर नसून, देशाला गौरव प्राप्त करुन देणाऱ्या बुद्धीबळपटूचा पुरवठा करत आहेत, असं म्हणणं वावगं ठरत नाही.
वेलामल अकादमी
वेलामल शाळेने दहा वर्षापूर्वी 300 विद्यार्थ्यांसह विशेष बुद्धीबळ अकादमी सुरू केली. आज संपूर्ण चेन्नईमधून वेलामल नेक्सास स्कूलच्या 15 शाळांमधून तब्बल 2 हजार विद्यार्थी या अकादमीमध्ये शिकत आहेत.
चार वर्षाच्या मुलांना या शाळेत बुद्धीपटावर खेळायला शिकवलं जातं. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे चार वर्षाखालील मुलांमधील हे कौशल्य हेरून त्यांना तेव्हापासूनच विशेष ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली जाते.
विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूची शाळेची फी माफ
शाळेत्तर अभ्यासक्रमाची अॅक्टव्हिटी म्हणून मुलांना बुद्धीबळ शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यानुसार दर आठवड्याला तीन सत्रांचं नियोजन केलेलं आहे. या खेळात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेची फी माफ केली जाते. तसचं त्यांच्या कोचिंगसाठी, टूर्नामेंट्स, तेथील प्रवास अशा अन्य खर्चासाठी सुद्धा आर्थिक मदत सुद्धा दिली जाते. तसेच या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांचा अभ्यासक्रम आणि परिक्षाचं नियोजन केलं जातं.
बुद्धीबळपटूंची खाण निर्माण करणारी वेलामल अकादमी म्हणून नावारूपला येत आहे.
राजकीय वरदहस्त
आज चैन्नईमध्ये बुद्धीबळपटूंची निर्मिती होत आहे, आणि यासाठी राजकीय पक्षांचाही चांगला पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेते झालेल्या ग्रँडमास्टर्सना तामिळनाडू सरकार मोठ्या रकमेची बक्षिसं देत आहे. राज्यात वेळोवेळी बुद्धीबळ स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यासाठी चांगल्या रकमांची बक्षिसही दिली जातात.
चेस ऑलिम्पियाडमुळे तळागाळात पोहचलं स्पर्धात्मक बुद्धीबळ
पण जेव्हा 2022 साली चेस ऑलिम्पियांड स्पर्धेचं आयोजन चैन्नईमध्ये केलं तेव्हा तर या सगळ्यामध्ये आणखीन भर पडली. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशिया मध्ये आयोजन केलेल्या स्पर्धा रद्द करत त्या भारतात, चैन्नईमध्ये आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवर बुद्धीबळ खेळाविषयी आणखीन उत्सुकता निर्माण होत अधिकाधिक विद्यार्थी या खेळाकडे वळू लागले.
बुद्धीबळ खेळाला राजाश्रय
सन 2013 साली तामिळनाडूतील तत्कालिन एआयएडीएमके सरकारने राज्यातल्या प्रत्येक शाळेत बुद्धीबळ हा अभ्यासक्रमातीलच एक विषय म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतलेला. त्यानुसार वयोवर्ष 7 ते 17 वयातील विद्यार्थ्यांना बुद्धीबळ शाळेत एक विषय म्हणून शिकवला जातो. विशेष म्हणजे त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारनेसुद्धा हा नियम कायम ठेवत बुद्धीबळ खेळाला राजाश्रय दिल्याचं पाहायला मिळतं.
विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा त्याग
या खेळाला राजाश्रय मिळत असला, शाळेतूनच या खेळाचे धडे शिकवले जात असले तरी यामध्ये करिअर करताना, जेतेपद मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणतात ना, “कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है.”
दक्षिणेकडील समाजाच्या विचारसरणीनुसार अन्य अॅक्टिव्हिटीज पेक्षा अभ्यासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. मात्र, बुद्धीबळ खेळाच्या बाबतीत तसं घडलं नाही.
बुद्धीबळ हा मेंदूच्या विकासासाठी आणि बौद्धीक खेळ असल्याने अनेक पालक हे आपल्या मुलांना बुद्धीबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात.
वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धेत भाग घेत स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या कोचचे जितके कष्ट असते तितकेच कष्ट हे त्या विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत. अगदी मुलांच्या या खेळातील करिअरसाठी पालक त्याचं करिअर ही थांबवत आहेत.
आज वर्ल्ड चेस कॉम्पिटिशनमध्ये खेळत असलेल्या गुकेश डी. याचे वडील ENT चे सर्जन आहेत. पण वारंवार टुर्नामेंट्ससाठी देश-विदेशातील प्रवास, मुलांचा सराव अशा सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपलं करिअर सोडलेलं आहे.
ग्रँडमास्टर्स वैशाली आणि प्रज्ञानंद यांच्या सोबत त्यांची आई नागालक्ष्मी या सुद्धा मुलांसोबत टुर्नामेंट्ससाठी त्यांच्यासोबत सतत प्रवास करत आपल्या मुलांच्या तब्येतीची काळजी घेतात. त्यांच्यासाठी स्वत: जेवण तयार करतात.
अनेक विद्यार्थ्यी आपल्या बालपणातील मौजमजा, सणावरांतील आनंदाचा त्याग करत दिवसातील 6-6 तास खेळाचा सराव करत असतात.
लहान बहिणीच्या कोचिंगसाठी मोठ्या बहिणीचे पैंजण विकले
नऊ वर्षाची श्रावणिका सरवणन हीने या क्षेत्रात सर्वात लहान आशिया बुद्धीबळ मास्टरचा बहुमान मिळवलेला आहे. पण श्रावणिका हिच्या या यशासाठी तिच्या आई-वडिलांनी आणि मोठ्या बहिणींनी बऱ्याच खास्त खाल्ल्या आहेत. त्यांनी त्याचं राहतं घर सोडून श्रावणिकाच्या कोचिंगसाठी शिवकाशीला स्थलांतर केलं. तिच्या क्लासेसची फी भरण्यासाठी घरातील महत्त्वाच्या गोष्टी जसं की, फ्रिज, टिव्ही, फर्निचर विकलं. एवढंच नाहीतर मोठ्या मुलींचे पैंजणही विकून त्यांनी तिच्या खेळासाठी पैसे उभे केले आहेत. आज श्रावणिका ही या खेळात जबरदस्त प्रगती करत आहे. या लहान वयातच तिला आता स्पॉनसर्स मिळत आहेत. त्यामुळे तिचे कोचिंगही सुरळीतपणे सुरू आहेत.
कोविड लॉकडाउनचा सकारात्मक वापर
कोविड काळामधील अनेक वाईट अनुभव प्रत्येकांकडेच आहेत. पण याच काळात चैन्नईमध्ये या खेळाला चांगले दिवस आले. विश्वनाथन आनंद यांच्या बुद्धीबळ खेळातील यशानंतर या खेळांबद्दल सामान्य लोकांमध्ये आवड निर्माण झाली होतीच. त्यामुळे कोवीड काळामध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक मुलांनी बुद्धीबळ खेळ शिकायला सुरूवात केली. आज चैन्नईतल्या गल्ली गल्लीमध्ये हा खेळ शिकवणारे क्लासेस सुरू आहेत.