देशभरातल्या 56 टक्के जिल्ह्यातले भूजल साठे हे प्रदूषित झाले आहेत. केंद्रीय भूजल मंडळाने केलेल्या परिक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. सन 2013 मध्ये देशातल्या 359 जिल्ह्यामधलं भूजल साठे हे प्रदूषित झाले होते. 2023 मध्ये या जिल्ह्यामध्ये 81 जिल्ह्यांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण 440 जिल्ह्यातले भूजल साठे हे नायट्रेट केमिकलमुळे प्रदूषित झाल्याचं केंद्रीय भूजल परिक्षण मंडळाच्या अहवालातून समोर आलं आहे.
नायट्रेट केमिकलमुळे भूजल साठे प्रदूषित
केंद्रीय भूजल परिक्षण मंडळाने भूजल साठ्याचं परिक्षण करण्यासाठी 15 हजार 239 जिल्ह्यातील पाण्याचे नमुने गोळा केले होते. यापैकी 19.8 टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेट्स केमिकल आढळून आलं. या प्रमाणानुसार, 1 लीटर पाण्यामध्ये 45 मिलीग्रॅम नायट्रेड केमिकलचे घटक होते.
सन 2017 मध्ये 13 हजार 028 नमुने तपासली होती. या नमुन्यांमध्ये 21.6 टक्के जास्त नायट्रेट होतं.
आरोग्यावर होणारे परिणाम
नायट्रेटयुक्त पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊन मेथेमोग्लोबीमेनिया आजार होतो. या आजारामुळे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तपेशी अशक्त होऊन त्या ऑक्सिजन वाहून नेण्यात कमी पडतात. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेताना दम लागणे, मळमळ आणि सायनोसिस म्हणजे त्वचा निळसर रंगांची होते.
नायट्रेटयुक्त पाण्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम
तलावांमधल्या पाण्यात नायट्रेट केमिकल घटक असलेले पाणी मिसळते, तेव्हा त्या तलावांमध्ये अल्गल ब्यूम्स नावाची जलपर्णी उगवून संपूर्ण तलावाचं पृष्ठभाग व्यापते. यामुळे संपूर्ण तलाव प्रदूषित होऊन संपूर्ण परिसंस्था विस्कळीत होते.
नायट्रेट स्वरुपातलं नायड्रोजन केमिकल हे पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होतं. जमिनीमध्ये मात्र हे नायड्रोजन कमी प्रमाण आढळून येतं. शेतामध्ये अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, यूरिया, डीअमोनियम हायड्रोजन, फॉस्फेट अशा सगळ्या खतांच्या वापरामुळे नायट्रोजनयुक्त केमिकलचं प्रमाण कमी आहे.
भूजल साठ्यातील दूषित पाण्यामध्ये नायट्रेटमुळे अमोनियम (NH4+), अमोनिया (NH3), नायट्रोजन (N2), नायट्रोस ऑक्साइड (N2O) आणि ऑर्गेनिक नायट्रोजनचे घटक आढळून येतात.
दूषित भूजल साठ्यात राजस्थान पहिल्या क्रमांकावर
राजस्थान राज्यामध्ये सर्वात जास्त 49 टक्के भूजल साठा हा प्रदूषित झाला आहे. त्यानंतर कर्नाटक 48 टक्के आणि तामिळनाडूतील 37 टक्के भूजलसाठे प्रदूषित झाले आहेत. सन 2017 पासूनच राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील भूजलसाठ्यांमधल्या पाण्यामध्ये अतिरिक्त नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे. यावरुन मध्य आणि दक्षिण भारतामधील राज्यातील जलसाठे हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याचं स्पष्ट आहे.
दरम्यान, या अहवालानुसार महाराष्ट्रातील 32.74 टक्के, तेलंगणा 27.48 टक्के, आंध्रप्रदेश 23.5 टक्के आणि मध्यप्रदेशमधील 22.58 टक्के भूजल साठे प्रदूषित आहेत.
नायट्रोजनमुळेच पाणी प्रदूषित झालं आहे का?
नायट्रोजनसह दूषित भूजल पाणी साठ्यातील नमुन्यांमध्ये अर्सेनिक, आयर्न, फ्लूराइड आणि युरेनियम हे केमिकल घटक आढळून आले आहेत. 19.8 टक्के पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेटचं अतिरिक्त प्रमाण आढळलं आहे. तर, 9.04 टक्के नमुन्यामध्ये फ्यूराइडचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे.
राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील पाण्याच्या नमुन्यामध्ये फ्यूराइडचं जास्त प्रमाणात आढळलं आहे. तर राजस्थान आणि पंजाब मधल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये युरेनियमचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं पाहायला मिळालं. पाण्यामध्ये प्रति दशलक्ष प्रमाण 30 (parts per billion) पेक्षा जास्त युरेनियम असणं धोक्याचं मानलं जातं. अशा परिस्थितीत राजस्थान आणि पंजाब येथील पाण्यामध्ये हे प्रमाण तब्बल 100 (PPb) आहे. या दोन राज्यांसह गुजरात, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातल्या पाण्यामध्ये युरेनियमचं प्रमाण खूपच जास्त प्रमाणात असल्याचं परिक्षणामधून समोर आलं आहे.