भारताच्या सैन्यदलाकडून अमृतसरच्या अटारी सीमेवर आणि फिरोजपूरच्या हुसैनीवाला सीमेवर पुन्हा एकदा बीटिंग रिट्रीटला सुरुवात करणार आहेत. पहलगाम दहसतववादी हल्ल्याच्या घटनेनंतर या समारंभाला स्थगिती दिली होती. दोन्ही देशांदरम्यान तणावाची परिस्थिती काही स्वरुपात निवळल्यामुळे मंगळवार 20 मे पासून या रिट्रीटला सुरुवात करण्यात येत आहे. संध्याकाळी 6 वाजताच ही बीटिंग रिट्रीट सुरु होणार आहे. पण या बीटिंग रिट्रीटच्या स्वरुपात मात्र बदल करण्यात आले आहेत.
जवान हस्तांदोलन करणार नाहीत
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान 1959 पासून बीटिंग रिट्रीटची परंपरा आहे. प्रोटोकॉलनुसार, दोन्ही देशाचे सैन्य हे दररोज संध्याकाळी अटारी-वाघा क्रॉसिंगवर सीमा दरवाजे उघडतात आणि त्यानंतर पारंपारिक हस्तांदोलन करतात. पण 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा समारंभ थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
आजपासून जरी या बीटिंग रिट्रीटला सुरुवात होणार असली तरी या दोन्ही बाजूंचे दरवाजे बंद राहणार आहेत. आणि बीएसएफचे जवान पाकिस्तानी रेंजर्सशी हस्तांदोलन करणार नाहीत, अशी माहिती पंजाब फ्रंटियरचे सीमा सुरक्षा दलाचे आयजी अतुल फुलझेले यांनी माध्यमांना दिली.
हे ही वाचा : ‘टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत’ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक इशारा
सीडीएस, लष्कराने सीमा भागातील परिस्थितीचा घेतला आढावा
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थान आणि कच्छमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तैनात केलेल्या हवाई संरक्षण प्रणालींचा आढावा घेतला. तसंच सुरतगड आणि नालिया इथल्या लष्करी सुविधांची पाहणी केली. तर जनरल द्विवेदी यांनी लोंगेवाला आणि वाळवंट क्षेत्रातील लष्कराच्या 12 व्या कोणार्क कॉर्प्सच्या देखरेखीखाली असलेल्या विविध महत्त्वपूर्ण जागांना भेट दिली.
भारत – पाकिस्तान दरम्यानची सद्यस्थिती
भारत – पाकिस्तानच्या डिजीएमओ दरम्यान अलिकडे चर्चा झाली. या चर्चनंतर दोन्ही देशादम्यान, 18 मे पर्यंत युद्धबंदी वैध आहे, अशी माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. भारताने ही माहिती फेटाळत म्हटलं की, भारत – पाकिस्तान दरम्यान सीमेवरील कारवाया थांबवण्यासाठी काळमर्यादा आखून देता येणार नाही. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणं ही दीर्धकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे 12 मे रोजी झालेल्या चर्चनुसार युद्धबंदी सुरु ठेवण्याबाबत कोणतीच अंतिम तारीख नाही.
दिनांक 15 मे 2025 रोजी भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सीमाभागात दोन्ही देशांबाजूलने सैन्य सतर्कतेची पातळी कमी करण्यासाठी विश्वास निर्माण करणाऱ्या उपाययोजना (कॉन्फिडन्स बिल्डींग मेजर्स ) राबवण्याची योजना आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री एशाक दार यांनी माध्यमांना सांगितलं की, भारत-पाकिस्तान दरम्यान 18 मे पर्यंत युद्धबंदी असणार आहे.