भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातील ऐतिहासिक प्रवास!

Shubhanshu Shukla : भारताचे अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) ला भेट देऊन इतिहास रचला आहे आणि आता ते सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत.
[gspeech type=button]

भारताचे अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) ला भेट देऊन इतिहास रचला आहे आणि आता ते सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत.

सोमवार दिनांक 14 जुलै 2025  रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4.50 वाजता ‘अ‍ॅक्सियम-4′  (Ax-4)’ मिशनची टीम ISS वरून पृथ्वीकडे परतीच्या प्रवासाला निघाली होती. हे यान मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी 22 तासांच्या परतीच्या प्रवास पूर्ण करत पृथ्वीवर परतले आहे. दुपारी 3 च्या सुमारास त्यांचे यान सॅन डिएगोच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.

शुक्ला यांचा अंतराळ प्रवास कसा होता?

25 जून 2025 रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने शुक्ला आणि त्यांचे साथीदार अमेरिकेचे अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उजनान्स्की विन्सिव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपू यांनी ISS कडे उड्डाण केलं. हे ‘अ‍ॅक्सियम-4 (Ax-4)’ मिशन अमेरिकेतील खासगी कंपनी ‘अ‍ॅक्सियम स्पेस’ने चालवले होते. यात नासा (NASA), भारताची इस्रो (ISRO), युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि स्पेसएक्स (SpaceX) या संस्थांचा सहभाग होता.

ISS स्थानकात ते दोन आठवडे थांबणार होते, पण हवामान बदलामुळे त्यांचा मुक्काम काही दिवसांनी वाढला. आणि अखेरीस, 14 जुलै 2025 रोजी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मोहिमेचे नेतृत्व नासाचे अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी केले तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे यानाचे पायलट होते.

‘ड्रॅगन कॅप्सूल ‘ग्रेस’च्या माध्यमातून ही संपूर्ण टीम पृथ्वीवर परतणार आहे. हे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर अटलांटिक महासागरात किंवा मेक्सिकोच्या खाडीमध्ये सॉफ्ट स्प्लॅशडाऊन उतरेल. पण, जर या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असेल, पाऊस किंवा वादळी परिस्थिती असेल, तर हे यान सुरक्षितपणे उतरवणे कठीण होऊ शकतं. यामुळेच परतीचा प्रवास लांबणीवर पडला होता.

अंतराळवीरांनी कोणते वैज्ञानिक प्रयोग केले?

शुभांशु शुक्ला यांची अंतराळयात्रा केवळ ऐतिहासिक नव्हती, तर वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्त्वाची ठरली. त्यांनी केवळ तांत्रिक कामासोबत अनेक वैज्ञानिक प्रयोगांमध्येही सक्रिय सहभाग घेतला. या मुक्कामादरम्यान, अ‍ॅक्सियम स्पेसने सांगितले की, अंतराळवीरांनी 60 वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यात इस्रोने तयार केलेल्या सात प्रयोगांचा समावेश होता.

हेही वाचा : अंतराळात प्रवास करणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला कोण आहेत?

त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या प्रयोगांची माहिती पुढीलप्रमाणे : 

मायक्रोअल्गी (सूक्ष्म शेवाळ) प्रयोग

शुक्ला यांनी मायक्रोअल्गीचे सॅम्पल घेतलं आहे. हे मायक्रोअल्गी भविष्यात मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैवइंधनचे स्रोत ठरू शकतात. अ‍ॅक्सियम स्पेसने सांगितले की मायक्रोअल्गीमध्ये असलेली सहनशक्ती त्यांना पृथ्वीबाहेरही जिवंत राहण्यासाठी एक उपयुक्त पर्याय बनवते.

‘व्हॉयजर डिस्प्ले’ चा अभ्यास

अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या हालचालींवर आणि त्यांच्या समन्वयावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी व्हॉयजर डिस्प्ले बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचं काम क्रूने केलं.

अंतराळातील वातावरणाशी जुळवून घेणं 

अंतराळात असताना अंतराळवीर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला कसं अनुभवतात आणि त्यासोबत कसं जुळवून घेतात, हे समजून घेण्यासाठी टीमने डेटा गोळा केला. ही माहिती भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी मानसिकदृष्ट्या आरामदायक आणि जगण्यायोग्य जागा कशा असाव्यात, याच्या डिझाइनसाठी मदत करेल.

सेरेब्रल ब्लड फ्लो म्हणजेच मेंदूमधील रक्तप्रवाह विषयी अभ्यास

या अभ्यासात मायक्रोग्रॅव्हिटी आणि जास्त प्रमाणात असलेला कार्बन डायऑक्साइड हृदयावर कसा परिणाम करतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. हा अभ्यास भविष्यात अंतराळवीरांसोबतच पृथ्वीवरील रुग्णांसाठीही उपयोगी ठरू शकतो.

किरणोत्सर्ग (रेडिएशन) निरीक्षण

क्रूने अंतराळातील किरणोत्सर्गाचा कसा परिणाम होतो याची निगराणी ठेवण्यासाठी ‘रॅड नॅनो डोझीमीटर’ नावाचं एक छोटंसं उपकरण वापरलं. हे उपकरण अंतराळवीरांच्या सुरक्षिततेचा अंदाज लावण्यासाठी कसं महत्त्वाचं आहे याचे निरीक्षण केलं.

अ‍ॅक्वायर्ड इक्विव्हेलेन्स टेस्ट

हा एक मानसिक प्रयोग होता, जो अंतराळात शिकण्याची आणि तिथे राहण्याची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी केला जातो.

‘फोटॉनग्रॅव्ह’ अभ्यास

या अभ्यासासाठी मेंदूच्या हालचालींशी संबंधित माहिती गोळा केली, जेणेकरून अंतराळ आणि वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरू शकणाऱ्या न्यूरो-अ‍ॅडॅप्टिव्ह तंत्रज्ञानाला समजून घेता येईल.

इस्रोने ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांच्या अंतराळ प्रवासासाठी 5 अब्ज रुपये खर्च केले आहेत. इस्रोला विश्वास आहे की, ISS वरील त्यांच्या या अनुभवामुळे भारताला भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांमध्ये खूप मदत मिळेल.

भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमा

इस्रोने 2027 मध्ये गगनयान नावाचे भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण सुरू करण्याची घोषणा  केली आहे. तसेच, 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची आणि 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला हे त्या चार भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्यांची गेल्या वर्षी गगनयान मोहिमेसाठी निवड झाली होती. त्यामुळे, त्यांचा ISS वरील अनुभव गगनयान आणि इतर भविष्यातील मोहिमांसाठी खूप मोलाचा ठरणार आहे.

शुक्लांचा प्रेरणादायी निरोप संदेश

रविवार, 13 जुलै 2025 रोजी ISS वरून निरोप घेताना शुभांशु शुक्ला यांनी एक खूप प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “हा एक अविश्वसनीय प्रवास होता. जरी आता हा प्रवास संपत असला तरी, आपल्या सर्वांसाठी अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपल्या मानवी अंतराळ मोहिमेचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण आहे. पण जर आपण दृढनिश्चयी असू, तर आपल्याला तारेही गाठता येतील.”

त्यांनी राकेश शर्मांच्या प्रसिद्ध ‘सारे जहाँ से अच्छा’ या 1924 च्या उर्दू गाण्याचा उल्लेख करत सांगितले की, राकेश शर्मांनी म्हटले होते की ‘भारत जगातील इतर देशांपेक्षा सुंदर दिसतो’. “आजही आपल्याला अंतराळातून भारत कसा दिसतो हे जाणून घ्यायचे आहे. तर, मी तुम्हाला सांगतो, अंतराळातून आजचा भारत महत्वाकांक्षी दिसतो, निर्भय दिसतो, आत्मविश्वासू दिसतो, अभिमानास्पद दिसतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगू शकतो की, आजचा भारत अजूनही जगातील इतर देशांपेक्षा सुंदर दिसतो.”

शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास केवळ एका अंतराळवीराचा प्रवास नव्हता, तर तो कोट्यवधी भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांचा एक अविस्मरणीय टप्पा होता. त्यांच्या या यशाने भारताच्या अंतराळ सामर्थ्याला आणखी बळकटी मिळाली आहे आणि भविष्यातील मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

A Decade of Digital India Reel Contest : डिजिटल इंडिया मिशनने गेल्या 10 वर्षात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा, आर्थिक
Good news for central govt staff: आता केंद्र सरकारचे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी वर्षभरात 30 दिवसांची सुट्टी घेऊ
नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं की, “एअरलाईनच्या सर्व फ्लाईट कर्मचाऱ्यांमध्ये आजारपणाच्या वैद्यकीय रजेचं प्रमाण वाढलं आहे.” अहमदाबाद

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ