भारतीय तटरक्षक दलाने समुद्रा मार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत, अंदमान आणि निकोबार बेटांजवळ म्यानमारच्या एका बोटीमधून 6000 किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची किंमत अंदाजे 36,000 कोटी रुपये आहे. ही भारताच्या जलक्षेत्रात झालेली सर्वात मोठी समुद्री ड्रग्स जप्ती आहे. तटरक्षक दलाने या बोटीसह तिथं असलेले कर्मचारी आणि एक सॅटेलाईट फोनही ताब्यात घेतला आहे.
भारतीय महासागर आणि ड्रग्स तस्करी
भारतीय महासागर हा जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वपूर्ण समुद्री मार्ग आहे. परंतु आता हा मार्ग गुन्हेगारी नेटवर्कसाठी, विशेषतः ड्रग्स तस्करीसाठी, एक सोयीस्कर मार्ग बनला आहे.
युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईमच्या (UNODC) अहवालानुसार, ‘गोल्डन क्रेसेंट’ (अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान) आणि ‘गोल्डन ट्रायंगल’ (थायलंड, म्यानमार, लाओस) या क्षेत्रांपासून ड्रग्सची तस्करी केली जाते. हे ड्रग्स भारत, श्रीलंका आणि दक्षिण आशियावर मोठा परिणाम करतात.
भारतीय महासागरात वाढत असलेल्या ड्रग्स तस्करीला रोखण्यासाठी भारत काय करत आहे ?
भारताने या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
भारतीय महासागरातील समुद्री गुन्हेगारी रोखण्यासाठी, सिंगापूर, मादागास्कर आणि भारत अशा तीन ठिकाणी माहिती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना पकडणे सोपे होते. तसेच प्रादेशिक समन्वय केंद्रांची स्थापना करून समुद्री क्षेत्रातील जागरूकता वाढवण्यात आली आहे.
ही केंद्र प्रादेशिक केंद्र म्हणून काम करतात. विविध स्त्रोतांमधून समुद्रातल्या हालचालींविषयी माहिती गोळा करतात आणि या हालचालींचे व्यापक चित्र तयार करतात. ही माहिती समुद्री गुन्ह्यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे.
नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्सटँसेस ॲक्ट, 1985 या कायद्याच्या आधारे, भारतीय तटरक्षक दल भारताच्या प्रादेशिक पाण्यांमध्ये कायदा अंमलबजावणी करण्याची मुख्य भूमिका बजावते. तसचं त्यांनी इतर देशांशी सहकार्य वाढवले आहे आणि समुद्रातील ड्रग्स जप्तीसाठी अनेक कारवाया केल्या आहेत.
भारतीय नौदलही महासागरातील तस्करीला तोंड देत आहे. त्यांनी यावर्षी 3300 किलो ड्रग्स जप्त केली असून, ‘कंबाइंड मॅरीटाइम फोर्सेस’ (CMF) सोबत काम करत 940 किलो ड्रग्स जप्त केले आहे.
भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि विविध जागतिक संघटनांच्या सहकार्याने भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर होणारी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी काम करत आहेत. तरीही, भारताला यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील.