भारताविरुद्ध दहशतवादी कट रचून हल्ल्याचे नियोजन केले गेले अशा सीमेपलीकडील नऊ ठिकाणी बुधवारी 7 मे रोजी (6 मे उत्तररात्री) भारतानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे, प्रेस इन्फरमेशन ब्युरोनं एका पत्रकात प्रसिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट कमिटीची बैठक आज घेणार आहेत.
आतापर्यंतच्या घडामोडी –
- 22 एप्रिल 2025 ला पहलगामला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. बुधवारचा हा हल्ला या अतिरेकी हल्ल्याला पहिलं चोख प्रत्युत्तर मानलं जात आहे.
- पाकिस्तानी सैन्याचे तळ टाळून केवळ अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला केल्याचे संरक्षण दलाने पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
- बहावलपूर, मुरिडके, गुलपूर, भिमबेर, चाक अम्रू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद या नऊ ठिकाणी अतिरेकी अड्ड्यांवर भारतीय सैन्यांचा क्षेपणाचा हल्ला.
- मुरिडकेमधील लष्कर ए तोयबाचे हेडक्वार्टर आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूर अझहरच्या मदरशा यांचा या नऊ ठिकाणांमध्ये समावेश आहे.
- सूत्रांनुसार या हल्ल्यात 17 अतिरेकी ठार झाले असून 60 जण जखमी झाले आहेत.
- भारतीय सैन्य सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार.
- पाकिस्तानी संरक्षण दलानं भारतीय हद्दीतून क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. डॉन वृत्तपत्रानुसार या हल्ल्यात 3 पाकिस्तानी नागरिक ठार झाले असून 12 पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.
- पाकिस्तानी पंतप्रधानांनी या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हटलं आहे.
- या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपलं हवाई दल सज्ज ठेवले असून सीमेवर हाय अलर्ट देण्यात आला आहे.
- या हल्ल्यामुळे दोन देशांतील आण्विक हल्ल्याच्या शक्यता वाढली आहे.
- बारामुल्ला, कुपवारा आणि गुरेझमधील शाळा, कॉलेजं आज बंद राहतील.
- भारतीय विमान कंपन्यांनी कश्मिरला जाणारी विमानं रद्द केली आहेत. राजस्थान आणि पंजाब या पाकिस्तानी सीमेवरील राज्यांमधील विमानंही रद्द अथवा इतर जागी वळवण्यात आली आहेत.
- संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांनी संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.