पश्चिम बंगालमध्ये असे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याला नाव नाही! होय, तुम्ही बरोबर वाचलंत. 2008 साली बर्धमान शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर हे नवीन रेल्वे स्टेशन बनवण्यात आले. पण या रेल्वे स्टेशनला आजतागायत अधिकृत नाव दिलं गेलं नाही. त्यामुळे याला ‘नाव नसलेले स्टेशन’ असेच ओळखलं जातं. या स्टेशनवर रोज सहा वेळा गाड्या थांबतात.
भारतीय रेल्वेच्या एकूण 7112 रेल्वे स्टेशन पैकी हे एक स्टेशन वेगळं आहे. या स्टेशनला अधिकृत नाव नसलं तरीही या स्टेशनचा कारभार व्यवस्थित सुरू आहे.
हे स्टेशन बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाईनवर आहे. हे रेल्वे स्टेशन रैना आणि रैनागढ या दोन गावांच्या मध्यभागी आहे. सुरुवातीला या स्टेशनला रैनागढ नाव दिलं गेलं होतं. पण रैना गावातील लोकांना हे मान्य नव्हतं. कारण स्टेशनचं बांधकाम रैना गावाच्या जमिनीवर झालं होतं. त्यामुळे रैना गावातील लोकांचं असं मत होतं की, या स्टेशनचं नाव रैनागढ नाही तर रैना असायला हवं.
या दोन्ही गावांमध्ये या स्टेशनच्या नावावरून वाद सुरू झाला. आणि हा वाद रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचला. त्यानंतर भारतीय रेल्वेने इथे लावण्यात आलेले सगळेच साइन बोर्ड हटवले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, तिकीट अजूनही जुन्या रैनागढ या नावानेच दिलं जातं.
बांकुरा-मसग्राम ही एकमेव गाडी या स्टेशनवरून सहा वेळा धावते. या स्टेशनवर नवीन प्रवासी उतरल्यावर त्यांना कळत नाही की ते कुठे उतरले आहेत. कारण प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाचे रिकामे फलक आहेत. त्यावर स्टेशनचे नाव नसल्यामुळे , प्रवाश्यांना ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी स्थानिकांशी बोलाव लागतं.
या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर नबकुमार नंदी यांच्या म्हणण्यानुसार, या स्टेशनला कोणतं नाव द्यायचं याबाबत स्थानिक लोक रेल्वेच्या निर्णयाशी सहमत नाहीत. त्यामुळे कोर्ट या प्रकरणावर निर्णय घेईल. तसेच, रविवारी या स्टेशनवर कोणतीही गाडी येत नाही. त्या दिवशी स्टेशन मास्तर नवीन तिकिटे आणण्यासाठी बर्धमान शहरात जातात. ते सांगतात की, या तिकिटांवर अजूनही जुने ‘रैनागढ’ नाव लिहिलं जातं.