‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मौल्यवान धोरण आहे. आणि हे धोरण ‘ऑपरेशन सिंदूर’ मधलं मुख्य घटक ठरला आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेमध्ये केलं आहे.
‘मेक इन इंडिया’ धोरणाअंतर्गत अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधित शस्त्रास्त्रे, उपकरणे हे स्वदेशी बनावटीचे निर्माण केले जात आहेत. या धोरणाअंतर्गत मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ या लढाऊ विमानाच्या आराखड्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली. हे पूर्णत: स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान असणार आहे. याच्या निर्मितीमध्ये खासगी कंपन्यांसुद्धा सहाय्य करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच खासगी कंपन्यांना सरकारी संरक्षण कंपन्यासोबत मोठ्या संरक्षण प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या भागिदारीमुळे संरक्षण क्षेत्र आणखीन मजबूत होईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
पाचव्या जनरेशनचं लढाऊ विमान
भारतात एएमसीए कार्यक्रमा अंतर्गत पाचव्या जनरेशनचं पूर्ण स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान निर्माण केलं जाणार आहे. यामुळे भारतातल्या एरोस्पेस क्षेत्र नवा टप्पा गाठणार आहे. या एएमसीए अंतर्गत पाच प्रोटोटाइप विकसीत केले जाणार आहेत. त्यामुळे मेक इन इंडिया या धोरणाचा सुद्धा हा उच्चांक असेल.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून जर सरकारने संरक्षण क्षेत्र मजबूत केलं नसतं तर सीमापलिकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रभावी उत्तर देता आलं नसतं. संरक्षणासाठी आणि देशाच्या समृद्धीसाठी ‘मेक इन इंडिया’ धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अनेक स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग केला गेला. आणि त्यात यशही मिळालं. यावरुन भारतीय बनावटीचे शस्त्रास्त्रे शत्रूचा बिमोड करण्यासाठी सक्षम असल्याचं पाहायला मिळालं. या शस्त्रास्त्रांच्या मदतीने आपण दहशतवाद्यांचे तळ आणि लष्करी तळं उद्धवस्त करु शकलो. आपण याही पलिकडे पाकिस्तानविरोधात खूप काही करु शकत होतो. पण शक्ती आणि संयम यांचा आपण संतुलित वापर करुन दाखवला, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आपल्या भाषणात म्हणाले.
हे ही वाचा : ‘टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत’ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक इशारा
पीओके स्वेच्छेने भारतात परतेल
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारताने दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाचा व्यवसाय करणं हे फायद्याचं नाही हे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तराने दाखवून दिलं आहे. या घटनेनंतर भारत आता पाकिस्तानसोबत फक्त पीओके विषयावरच चर्चा करणार हेही स्पष्ट करत संवादाची व्याप्ती काय असेल हे सांगितलं आहे.
दरम्यान पीओके हा भारताचाच एक भाग आहे. मात्र जी लोकं स्वेच्छेने भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या भारतापासून दुरावलेले आहेत ते आज ना उद्या पुन्हा भारतात परततील. कारण तिथे राहणाऱ्यांपैकी अनेकांच्या मनात भारताबद्दल आत्मियता आहे. खूप कमी लोक आहेत ज्याची दिशा भरकटलेली आहे. पण या मूठभर लोकांची परिस्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे लहान भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखी आहे. वेगळे झाल्यानंतरही, मोठ्या भावाचा त्याच्या धाकट्या भावावर असलेला विश्वास अबाधित आहे. ते म्हणतात की, ‘तब कुपंथ को छोड़ सुपथ पर स्वयं चला आएगा। मेरा ही भाई है, मुझसे दूर कहाँ जायेगा।
राष्ट्र हित जपणे हा धर्म आहे
सरकारने धोरणात्मक स्पष्टता, स्वदेशीकरण, आर्थिक लवचिकता आणि धोरणात्मक स्वायत्तता यांना प्राधान्य दिलं आहे. मात्र जेव्हा या देशातले उद्योजक, नवउद्योजक, भागधारक हे आपल्या कंपनीच्या हितापेक्षा राष्ट्रीय हिताला महत्त्व देतील तेव्हाच श्रेष्ठ भारतचं उद्दीष्ट पूर्ण होईल. “जर कंपनीचे हित जपणे हे तुमचे कर्म असेल तर राष्ट्रीय हित जपणे हा तुमचा धर्म आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनली आहे ही खूप अभिमानाची बाब आहे. ही केवळ अर्थव्यवस्थेच्या आकारात वाढण्याची गोष्ट नाही तर जागतिक पातळीवरील भारताचं स्थान, भारतावरचा वाढता विश्वास आणि स्वतःवरील विश्वासाची पोच आहे. आज, भारत केवळ संरक्षण तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही तर उत्पादक आणि निर्यातदारही बनला आहे. जेव्हा जग उच्च दर्जाच्या संरक्षण प्रणालींसाठी आपल्याकडे संपर्क साधते तेव्हा ते केवळ बाजारपेठेचे संकेत नसून आपल्या क्षमतेचा आदर आहे.”
संरक्षण क्षेत्राची कामगिरी
10 वर्षांपूर्वी आपलं संरक्षण उत्पादन सुमारे 43 हजार कोटी रुपये होतं. आज ते 1 लाख 46 हजार कोटीहून जास्त झालं आहे. यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा 32 हजार कोटीहून जास्त आहे. 10 वर्षांपूर्वी संरक्षण क्षेत्राची निर्यात ही जवळपास 600 – 700 कोटी रुपये होती आज ती 24 हजार कोटी रुपयाहून जास्त झाली आहे. आपली शस्त्रे, प्रणाली, उप-प्रणाली, घटक आणि सेवा सुमारे 100 देशांमध्ये निर्यात होतात. संरक्षण क्षेत्राशी संबंधित 16 हजार हून अधिक छोटे उद्योजक पुरवठा साखळीचा कणा बनला आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळत आहे.
भारत केवळ लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणालींचे उत्पादन करत नाही तर नवीन युगातील युद्ध तंत्रज्ञानासाठीसुद्धा सज्ज आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर संरक्षण, मानवरहित प्रणाली आणि अंतराळ-आधारित सुरक्षा या क्षेत्रातसुद्धा अभिनव प्रकल्प सुरु आहेत.
2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र असेल
सरकार आणि उद्योग यांच्यातील सामुहिक प्रयत्न आणि समन्वयामुळेच 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनू शकतो. याबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “आजच्या काळात, एखाद्या राष्ट्राची ताकद केवळ त्याच्या आर्थिक निर्देशांक जसं की जीडीपी, परकीय गुंतवणूक किंवा निर्यात आकडेवारीवरून मोजली जात नाही, तर तो देश आपल्या नागरिकांमध्ये आणि जागतिक समुदायामध्ये किती आत्मविश्वास निर्माण करतो यावर सुद्धा अवलंबून असते. देशातल्या नागरिकांमध्ये त्याच्या सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या हीताचं रक्षण केलं जाईल असा विश्वास निर्माण करणे आवश्यक असतं. जेव्हा सुरक्षितता असते तेव्हाच देशाचं मनोबल उंचावतं आणि देशाचा झपाट्याने विकास साधला जातो.