तामीळनाडूमधील आविन दूध सहकारी संघाने दुधाच्या पॅकेजिंगसाठी वेगळ्या पर्यायाचा विचार करावा, असं आवाहन राष्ट्रीय हरित लवादाने केलं आहे. कारण आविन दूध महासंघांच्या अंम्बात्तूर डेअरी यूनिटमध्ये 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेल्या दूध पिशव्यांचा कचरा गोळा झाला आहे. या कचऱ्यामुळे तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने आविन दूध महासंघाला तब्बल 5.10 कोटीचा दंड ठोठावला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दूध पॅकेजिंगच्या पिशव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे ‘कोरट्टूर लेक प्रोटेक्शन पीपल्स मूव्हमेंट’ने आविन दूध महासंघाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या खटल्यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या दक्षिण खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान, आविन दूध महासंघ तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घालून दिलेल्या अनेक नियमाचं उल्लंघन करत असल्याचं आढळलं आहे.
तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने आविन दूध महासंघाला प्रती दिन 3 लाख लीटर दूध उत्पादनाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महासंघ दिवसाला 4.5 लाख लीटर दूध उत्पादित करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिशव्यांचा कचरा निर्माण होतो. या जमा झालेल्या कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रियाही केली जात नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दूध पॅकेजिंगला पर्याय आहे का ?
राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दूधाच्या पॅकेजिंगच्या विषयावर चर्चा सुरू केली आहे. यापूर्वीही दूधाच्या पॅकेजिंगचा विषय चर्चिला गेला आहे.
2018 मध्ये बृहत बंगळूरू महानगर पालिकेने कर्नाटक दूध महासंघालाही त्यांच्या नंदिनी दूध कंपनीचं पॅकेजिंग बदलण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्यावर काहिही पर्याय मिळाला नाही.
केरळ दूध सहकारी संस्थेने या पॅकेजिंगवर तोडगा काढण्यासाठी ‘मिल्क एटीएम’ सुरू करण्याची कल्पना मांडली होती. म्हणजे ग्राहक एका केंद्रावर आपलं पातेल किंवा भाडं घेऊन येऊन दूध घेतील. मात्र ही ‘मिल्क एटीएम’ संकल्पना कागदोपत्रीच राहिली.
हे ही वाचा : प्लास्टिकचा पुनर्वापर करत आहात, पण जरा सांभाळून!
दूधाच्या पॅकेजिंगचे पर्याय
दूधाच्या या विविध पर्यायांविषयी जाणून घेण्यासाठी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने कृषीविज्ञान, उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि ग्रामीण व्यवस्थापनतज्ञ विनील भुर्के यांच्याशी संवाद साधला. भुर्के यांनी दूध पॅकेजिंगच्या विविध पर्यायाविषयी आणि त्यांच्या पुनर्वापराविषयीची सखोल माहिती दिली.
दूध पॅकेजिंगवेळी उत्पादन खर्च आणि दळणवळणाच्या सुविधेचा विचार सर्वात प्रथम केला जातो. प्लास्टिक पिशव्यांमध्ये केलेलं पॅकेजिंग हे खर्चाच्या बाबतीत खूप स्वस्त आहे. दळणवळणासाठी सुद्धा हे खूप सोपं आहे. मात्र, या पिशव्या मायक्रोप्लास्टीक असल्याने या पिशव्यांचा पुनर्वापर करता येत नाही. त्यामुळे कचरा निर्मिती होते. अनेकदा या प्लास्टिक पिशव्या नाल्यामध्ये किंवा अन्यत्र तशाच टाकून दिल्या जातात. यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. याला पर्याय म्हणून काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, टेट्रापॅक अशा पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. पण त्यामध्येही या वस्तूचं निर्जंतुकीकरण करणं, वाढणारा उत्पादन खर्च आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.
काचेच्या बाटल्या – आरे दूध महासंघाकडून सुरुवातीला काचेच्या बाटल्यांमधून दूध दिलं जायचं. ही बाटली दूध केंद्रावर परत दिली जायची. त्याचं निर्जंतुकीकरण करून ती पुन्हा वापरात आणली जायची. मात्र, काळाच्या ओघात ही व्यवस्था बंद करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला. दूध साठवणीसाठी काचेची बाटली हे उत्तम साधन आहे मात्र, त्या बाटल्यांचं निर्जंतुकीकरण करणं आणि त्यांचं दळणवळण करणं जोखमीचं आहे.
प्लास्टिक बाटल्या – मध्यंतरी प्लास्टिक बाटल्यांमधूनही दूधाची विक्री केली जायची. या बाटल्यांसाठी प्लास्टिक थोड्या जाड मायक्रॉनचे वापर केला जायचा. पण, या बाटल्या दूध उत्पादकांकडून परत घेतल्या जायच्या नाहीत. त्यामुळे या प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापरही मर्यादीत स्वरुपाचा आहे. थोडक्यात, कंपनीकडून दरदिवशी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्यांची निर्मिती केली जायची.
टेट्रापॅक – टेट्रापॅक हा एक उत्तम पर्याय दूधाच्या पॅकेजिंगसाठी उपलब्ध आहे. टेट्रापॅकमध्ये एकूण सात लेयर्स असतात. यामध्ये जाड पुठ्ठ्याचे थर, मेटल आणि पातळ प्लास्टिकचा पातळ थर वापरलेला असतो. यामध्ये पॅकेटमध्ये असलेल्या दूधावर कोणतीच नकारात्मक रासायनिक प्रक्रिया होत नाही. दूधासह विविध ज्यूसही या टेट्रापॅकमध्ये उपलब्ध आहेत.
या टेट्रापॅकमधलं दूध हे दीर्घकाळासाठी फ्रीजमध्ये न ठेवताही फ्रेश राहतं. पण एकदा हे पॅकेट ओपन केल्यावर ते ठराविक दिवसात संपवणं गरजेचं असतं.
टेट्रापॅकचा पुनर्वापर करता येतो की नाही याविषयी अनेकांच्या मनात गैरसमज असतील. पण हे टेट्रापॅक रियुजेबल असतात. त्याचा पून्हा वापर करता येतो. यासंबंधित माहिती त्या -त्या ब्रँडच्या वेबसाईटवर सुद्धा आढळून येते. या टेट्रापॅकच्या कचऱ्यापासून कागदी फर्निचर बनवता येते.
टेट्रापॅकपासून फर्निचर निर्मिती
कुलाब्यातल्या सागर उपवन गार्डनमध्ये या टेट्रापॅकच्या कचऱ्यापासून बनवलेली बाकं आपल्याला बघायला मिळतील. या प्रकल्पाच्या प्रणेत्या आहेत मोनिषा नरके. मोनिषा नरके यांनी त्यांच्या आर यू रिड्युसिंग, रियुजिंग अँन्ड रिसायकलिंग एनजीओ अंतर्गत टेट्रापॅक कचरा गोळा करुन त्याचं पुठ्ठ्यामध्ये रुपांतर करतात. या पुठ्ठ्यावर योग्य ती प्रक्रिया करुन त्यापासून ज्वेलरी ते विविध फर्निचर अशा वस्तूंची निर्मिती करतात.
टेट्रापॅक आणि काचेच्या बाटल्या जरी खर्चाच्या बाबतीत महाग पर्याय वाटत असले तरी, भविष्याच्यादृष्टीने पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा विचार करता हे पर्याय अवलंबण गरजेचं आहे.
प्लास्टिकचा पुनर्वापर
आज अनेक अन्नपदार्थ हे प्लास्टिकच्या डब्यात मिळतात. अनेक विक्रेते हे प्लास्टिकच्या डब्यातून अन्नपदार्थांची विक्री करतात. पुढे त्या डब्याचं काय होणार? याची दुकानदार कोणतीच जबाबदारी घेत नाही.
आज आपल्या प्रत्येकांच्या घरात पार्सलचे अनेक डब्बे जमा झालेले असतात. हे डब्बे आपण घरात विविध गोष्टींसाठी वापरतो. पण या डब्यांच्या पुनर्वापरावरही बंधनं असतात. हे प्लास्टिकचे डब्बे किंवा बाटल्या किती वेळा पुन्हा वापरू शकतो, याविषयी त्या बाटल्यांवर किंवा डब्यावर माहिती दिलेली असते. या वस्तुचा वापर संपल्यावर त्या इतरत्र कुठेही फेकून द्यायची गरज नसते. कायद्यानुसार, या वस्तू एकत्र करुन कोणत्याही दुकानदाराकडे त्या सुपूर्द कराव्यात. पुढे दुकानदारांकडून हे प्लास्टिक संबंधित कंपनीकडे नष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी पाठवलं जातं. यातून दुकानदारांनाही संबंधित कंपनीकडून अनुदान दिलं जात असल्याची माहिती, विनील भुर्के यांनी दिली.
मात्र, अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेमुळे कोणताही दुकानदार हे प्लास्टिक गोळा करून कंपनीकडे देण्याची जबाबदारी घेत नाही. आणि बऱ्याच ग्राहकांना तर याविषयीची माहिती नसते. त्यामुळे कायदा असूनही त्याची अंमलबजावणीच होत नाही.
दूधाच्या बाबतीतही टेट्रापॅक आणि काचेच्या बाटल्या जरी खर्चाच्या बाबतीत महाग पर्याय वाटत असले तरी, भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा विचार करता हे पर्याय अवलंबणं गरजेचं आहे.