आज रविवार, सुट्टीचा दिवस. कामाच्या गडबडीतून एक दिवस मोकळा मिळतो म्हणून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटतं. आठवडाभर कष्ट करून मिळणारा हा निवांत दिवस म्हणजे खरं तर एक पर्वणीच. या दिवशी कुणी घरात बसून आवडतं पुस्तक वाचतं, कुणी कुटुंबासोबत वेळ घालवतं, कुणी मित्रांबरोबर बाहेर फिरायला जातं, तर कुणी घरात राहून फक्त आराम करतं. पण कधी विचार केलात का, ही रविवारची सुट्टी आपल्याला मिळाली तरी कशी? हा दिवस अचानक सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये कसा आला?
तर यामागे मोठा संघर्ष लपलेला आहे. आणि या संघर्षाचं नेतृत्व केलं एका मराठी माणसानं ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी.
ब्रिटिश राजवटीत मजुरांचे हाल
18-19 व्या शतकात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा देशभरात गिरण्या, कारखाने उभे राहत होते. परंतु या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अतिशय दयनीय होती. आठवड्याचे सातही दिवस काम, ना सुट्टी, ना विश्रांती. सकाळपासून रात्रीपर्यंत राबराब राबणं, केवळ जेवण आणि शौचासाठी वेळ मिळणं एवढीच मोकळीक त्यांना मिळायची. कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी देखील वेळ मिळत नव्हता.
इंग्रज अधिकारी मात्र आपल्या सोयीने सुट्ट्या घेत असत. याचे एक कारण म्हणजे, बहुतांश इंग्रज ख्रिश्चन धर्मीय असल्यामुळे त्यांना ‘संडे’ म्हणजे रविवार सुट्टी असायची. मात्र भारतातील मजुरांसाठी अशा सुट्टीचा काहीच नियम नव्हता.
कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढणारा नेता
सासवडजवळील कान्हेसर या गावात एका गरीब कुटुंबात नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांच्या घरच्यांनी त्यांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण करू दिलं.
नारायण लोखंडे यांनी सुरुवातीला रेल्वेच्या पोस्ट विभागात नोकरी केली. मात्र या नोकरीत त्यांना ना विश्रांती मिळायची, ना कुटुंबासोबत वेळ घालवता यायचा. यानंतर त्यांना बॉम्बे टेक्सटाईल मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून काम मिळाले. मिलमध्ये काम करत असताना त्यांनी मजूरवर्गाच्या हलाखीच्या परिस्थितीचा जवळून अनुभव घेतला. दिवसरात्र कष्ट करणाऱ्या कामगारांना ना विश्रांती, ना चांगले आरोग्य याची त्यांना जाणीव झाली.
स्वतः सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांनी लक्षात घेतले की, मजुरांचे प्रश्न थेट सरकार दरबारी पोहोचवणे सोपे नाही. तरीही त्यांनी या कामासाठी स्वतःला झोकून दिले आणि भारतीय कामगार चळवळीचा पाया घातला.
वृत्तपत्रातून क्रांतीची सुरवात
नारायण मेघाजी लोखंडे यांनी मजुरांच्या समस्यांवर आधारित अनेक लेख आपल्या वृत्तपत्रातून प्रकाशित केले. या लेखांनी अनेक कामगार आणि क्रांतिकारी प्रेरित झाले. त्यानंतर, 1884 साली त्यांनी ‘बॉम्बे हँड्स असोसिएशन’ची स्थापना केली. भारतातील ही पहिलीच कामगार संघटना होती. याआधी, 1881 सालीच त्यांनी इंग्रज सरकारकडे कारखाना अधिनियमात बदल करण्याची मागणी केली होती, परंतु ही मागणी फेटाळण्यात आली होती.
मागणी फेटाळल्यानंतर लोखंडे यांनी देशभरात श्रमिक सभा आयोजित केल्या. त्यांनी रविवारच्या सुट्टीसह जेवणासाठी सुट्टी, ठराविक कामाचे तास आणि अपघातग्रस्त कामगारांना सुट्टी मिळावी यांसारख्या मागण्या मांडल्या. तसेच, कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला निर्वाह भत्ता देण्याचीही मागणी त्यांनी केली.
5500 कामगारांची साथ आणि मिलमालकांचा विरोध
या मागण्यांसाठी लोखंडे यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर 5500 कामगारांनी सह्या केल्या आणि ते पत्र फॅक्टरी कमिशनकडे सादर केले. मात्र, मिलमालकांनी त्याला तीव्र विरोध केला आणि मजुरांवर अधिक अन्याय सुरू केला. लहान मुलांनाही कामावर लावले गेले.
सहा वर्षांचा संघर्ष
सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि मजुरांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवला. हा संघर्ष तब्बल सहा वर्षे चालला. अखेर लोखंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. इंग्रज सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि 10 जून 1890 रोजी भारतात रविवारीची साप्ताहिक सुट्टी अधिकृतपणे लागू झाली. कामगार चळवळीच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला.
रविवारची ही सुट्टी सुरुवातीला केवळ मजुरांसाठी लागू झाली होती. पण हळूहळू सरकारी यंत्रणा, शाळा आणि इतर कार्यालयांमध्येही ती लागू करण्यात आली.