आजकाल घराबाहेर जाताना पाण्याची आवश्यकता भासली की, आपण विचार न करता मिनरल वॉटरच्या बाटल्या किंवा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर विकत घेतो. पूर्वी लोक मडक्यातील पाणी प्यायचे, पण आता त्याची जागा प्लास्टिकच्या बाटल्यांनी घेतली आहे. लोकांना असे वाटते की हे पाणी आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पॅकेज वॉटर आणि मिनरल वॉटरही आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते, पण या बाटल्यांमुळे शरीरात सूक्ष्म प्लास्टिक प्रवेश करत आहे. यामुळे मेंदूला हानी होऊ शकते. सूक्ष्म प्लास्टिक पाणी आणि अन्नामध्येही प्रवेश करतो, यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे. FSSAI ने पॅकेज वॉटर आणि मिनरल वॉटरच्या उत्पादनामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा समावेश, याचे गंभीर परिणाम लक्षात घेत, या उत्पादनांना उच्च जोखमीच्या श्रेणीत समाविष्ट केलं आहे.
FSSAI ने पॅकेज वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी नवीन नियम जारी केलेत. आता, या उत्पादकांना वार्षिक तपासणीस सामोरे जावे लागेल, आणि त्यांना परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी, या तपासणीचे पालन करणे बंधनकारक असेल. यामुळे पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचे गुणवत्तेची खात्री करणे शक्य होईल.
भारत सरकारने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर इंडस्ट्रीसाठी नियम सुलभ करण्याची मागणी केली होती, परंतु आता FSSAI आणि Bureau of Indian Standards (BIS) कडून दोन प्रमाणपत्रांची आवश्यकता ठेवली आहे. हे प्रमाणपत्र उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.
‘हाय-रिस्क’फूड म्हणजे काय?
FSSAI कडून हाय-रिस्क अन्न असलेल्या ठिकाणांवर अधिक तपासणी केली जाते. अन्न सुरक्षा अधिकारी या तपासणी करतात आणि त्यासाठी एक ठरलेला प्लान वापरतात. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न आयुक्त या तपासणीवर लक्ष ठेवतात, जेणेकरून सर्व नियम पाळले जातील.
अस्वच्छ अन्नामुळे आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो, जसं की अन्न विषबाधा. याशिवाय, चुकीच्या अन्न सुरक्षा पद्धतींमुळे आर्थिक नुकसान, ग्राहक तक्रारी, कायदेशीर कारवाई आणि मोठे दंड देखील भरावे लागतात.
दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी आणि भारतीय मिठाई या अन्न पदार्थांचा ‘उच्च-जोखीम खाद्य श्रेणींमध्ये समावेश होतो.