आपला देश कृषीप्रधान आहे आणि त्यामुळेच आपलं अर्थकारण, सण-उत्सव हे सर्व कृषी हंगामाशीच निगडीत असतात. सौरमान आणि चांद्रमान कालगणतीच्या आधारे पेरणी, कापणी आणि शेतीची इतर कामे केली जातात. मार्च-एप्रिल महिन्यांच्या दरम्यान वसंत ऋतूचा उत्साह सर्वत्र ओसंडत असतो. झाडांना नवी पालवी फुटण्याचा, फुलं धरण्याचा, फळांनी झाडं लगडण्याचा काळ. अशा उत्साहाच्या काळात ज्या निसर्गाकडून आपल्याला एवढं भरभरून मिळतं त्याबद्दल त्याचे आभार मानायचे, ही संपन्नता, सुबत्ता कायम लाभू देत अशी प्रार्थना करण्याचा उत्तम काळ.
ऋतूबदलाने नविन वर्षाची सुरूवात
निसर्गपूजेला आपल्या देशात खूप महत्त्व आहे. रब्बीचा हंगाम संपून पीक हातात आलेलं असतं. एक ऋतूचक्रही संपलेलं असतं. ऋतूबदलानेच नविन वर्षाची सुरूवात होते. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रांतागणिक कालगणनेतही बदल दिसून येतो. कालगणनेसाठी काही ठिकाणी सौरमान तर काही ठिकाणी चांद्रमान पद्धतीचा अवलंब केला जातो.
भारतात दोन पद्धतीनं कालगणना
भारतात चांद्रमान आणि सौरमान पद्धतीनं कालगणना होते. काही राज्य किंवा समुदाय चांद्रमान पद्धतीचा अवलंब करतात. तर काही समुदाय सौरमान कालपद्धतीचा. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ऋतूचक्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. देशात बहुतांश भागात सौरमान कालगणना पद्धतीचा अवलंब केला जातो.
सौरमान आणि चांद्रमान कालपद्धतील फरक
चांद्रमान पद्धतीत चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नववर्षाला सुरूवात होते. सौरमान पद्धतीत 12 राशींच्याच नावाने 12 महिने ओळखले जातात. केरळ, तामिळनाडूत मेष हा सुरूवातीचा महिना मानला जातो. सूर्याचा मेष राशीत ज्या दिवशी प्रवेश होतो, त्यादिवशी नवीन वर्षाला सुरूवात होते. इंग्रजी कॅलेंडरनुसार सौरमान नवीन वर्षाचा पहिला दिवस इंग्रजी कॅलेंडरनुसार 14 एप्रिलच्या आसपास असतो.
हे ही वाचा : देशोदेशीच्या नूतन वर्षाच्या परंपरा
आंध्रमध्ये अभ्यंगस्नान आणि पंचागश्रवण

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा भागात कालगणनेकरता चांद्रमान पद्धत वापरली जाते. कर्नाटका, आंध्र या भागात नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘युगादी’ नावाने साजरा केला जातो. युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात. थंडी संपलेली असते आणि वसंत ऋतूला, नवनिर्मितीला सुरूवात झालेली असते. पहाटे दारासमोर, अंगणात सडा शिंपडून युगादीच्या रांगोळ्या काढल्या जातात. तीळाचं तेलं लावून अभ्यंग स्नान केलं जातं. आंध्र भागात पछडीचं सेवन करतात. बारिक चिरलेली कैरी, कडुनिंबाची फुलं, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि हिरवी मिरची हे या पछडीचे अविभाज्य घटक. आंबट, कडू, गोड, खारट, तिखट, चटपटीत अशा सर्व चवींचे सेवन करण्याचा उद्देश हाच की, येणाऱ्या वर्षात सुख, दु:ख, राग, भीती, आश्चर्य यासर्वाचा योग्य मेळ राखला जाईल. यानंतर सर्वजण देवळात जातात आणि ‘पंचांगश्रवण’ करतात. येणाऱ्या वर्षाचा अंदाज यावेळी पुरोहित वर्तवतात. आणि मग घरी पुलिहोरा म्हणजेच चिंचेच्या कोळातला भात आणि पुरणपोळ्यांच्या जेवणावर ताव मारला जातो. कर्नाटकातही अशाच प्रकारे युगादी साजरा करतात. इथंही महाराष्ट्राप्रमाणे फुलांच्या तोरणासोबत आंब्याचा टाळा आणि कडुनिंबांचा पाला दाराच्या चौकटीला बांधला जातो. कडुनिंबाच्या पाल्यात गूळ मिसळून खाल्ला जातो आणि जेवणात ओबाट्टू म्हणजेच पुरणपोळी ही हवीच. शिवाय जोडीला शेवयाची खीर आणि केळ्याच शिकरणही.
सिंधी समुदायाचं चेटीचांद

सिंधी समाजातही चांद्रमान कालगणना केली जाते. चेटीचांद या नावाने सिंधी नववर्षदिन ओळखला जातो. फाळणीनंतर हा समुदाय संबंध भारतात विखुरला गेला. त्यांच्या संस्कृतीची पाळमुळे घट्ट ठेवून, ज्या भागात ते स्थलांतरीत झाले त्या भागातल्या चालीरितीही त्यांनी आपल्याशा केल्या. जलदेवता झुलेलालना मिरवणुकीने नदी, तलाव अशा पाणवठ्यावर नेलं जातं. मिरवणुकीत ‘बहराणा साहिब’ म्हणजेच तेलाचा दिवा, खडिसाखर, वेलची, फळ, कलश, वस्त्र आणि फुलं या वस्तू असलेलं तबक पालखीत असतं. लहानमोठे सर्वच त्यांचा पारंपरिक नाच ‘छेज’ करत असतात. तांदूळ आणि साखरेपासून बनवलेला अखो नावाचा पदार्थ पाण्याला अर्पण केला जातो.
कर्नाटक किनारपट्टी आणि केरळचा ‘विशू’

कर्नाटकातल्या उडुपी, दक्षिण कन्नडा आणि केरळमध्ये विशूने नविन वर्षाची सुरूवात होते. भौगोलिक समानतेमुळे दक्षिण कन्नडा आणि केरळमधली परंपरा सारखीच आहे. बहाव्याच्या पिवळ्या धम्मक सोनेरी फुलांना विशूपूजेत खूप मानाचं स्थान आहे. या काळात जागोजागी बहाव्याचा सोनेरी बहर मनाला मोहवत असतो. केरळमध्ये तर याला ‘राज्यफुला’चाच दर्जा देण्यात आलाय. इथं विशूच्या आदल्या रात्री देवघर सजवलं जातं. देवासमोर दोन दिवे अथवा समया तेवत ठेवतात. देवासमोर आणि अंगणात फुलांची रांगोळी ‘पुकळा’ काढली जाते. देवासमोर त्या हंगामातली फळे आणि भाजी ठेवतात. देव्हाऱ्यासमोर एक लहान आरसा ठेवून सर्वजण झोपी जातात. पहाटे उठल्यावर डोळे न उघडता सरळ देवघरात जायचं आणि या आरशासमोर जाऊन डोळे उघडायचे, आपलं प्रतिबिंब पाहायचं. आन्हिक उरकल्यावर शेतातली गडीमाणसं त्यांच्या अंगणातली भाजी घेऊन मालकाच्या घरी भेट देतात. मालकाकडून त्यांना नविन कपडे, भाजी आणि सद्या (केरळ पद्धतीची जेवणाची थाळी) ही भेट मिळते.
तामिळनाडूमधील चितिराई

तामिळनाडूमध्ये पुत्तंडू अथवा पिरअप्पू या नावाने वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. काही जण संक्रांत अर्थात पोंगललाही नववर्षाची सुरूवात मानतात. पण बरेच जण वसंत ऋतूतल्या चितिराई महिन्यालाच नववर्षाची सुरूवात करतात. तामिळ वर्षही 365 दिवसांचंच असतं, 32,31,30, 29 अशा दिवसांमध्ये त्यांचे 12 महिने विभागले असतात. घरासमोर तांदळाच्या पीठाने कोलम रांगोळी काढली जाते. फणस, कलिगंड, आंबा, भाज्या, नारळ आणि कडुनिंबाचा पाला देवाला अर्पण करून पूजा केली जाते. चांगलं पीकपाणी येऊ देत अशी प्रार्थना करतात. तांदुळाचं पायसम आणि वड्याचा नैवेद्य दाखवतात. कैरी, कडूनिंबाचा पाला, गूळ, चिंच, मीठ एकत्र मिसळलेल्या पछडीचं सेवन करतात. यानंतर एकत्रितपणे पंचांगवाचनही करण्यात येतं.
बिहारमधील सतुआनला नवीन माठाची खरेदी
बिहारमधील नववर्षाचा पहिला दिवस ‘सतुआन’ नावानं ओळखला जातो. या दिवशी गंगेत स्नान करून लोक देवळात जातात. नवीन माठाची खरेदी केली जाते आणि कच्च्या कैरीच्या चटणीसोबत नवीन चण्याच्या सतुचं (काळे चणे भाजून केलेलं पीठ) सेवन केलं जातं. उन्हाळा जसा वाढतो तसं कफाच प्रमाणही वाढत जातं. त्यामुळे मग आहारात ‘सतुआन’पासून सतुच प्रमाण वाढवलं जातं. पराठा, लिटीचोखा, कैरीच्या चटणीसोबत सढळपणे सतुचा वापर केला जातो.
आसाममध्ये बोहाग बिहूला गाईंना हळद लावून आंघोळ

सृष्टीसौंदर्याचं अनोखं वरदान लाभलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्येही नववर्षाचं स्वागत निसर्गदेवतेचे आभार मानण्याकरता करतात. हा स्वागतोत्सव आठवडाभरही चालतो. आसामी नववर्षदिनाला ‘बोहाग बिहू’ असं म्हटलं जातं. इथंही सौरमान पद्धतच आहे. नववर्ष स्वागतोत्सव आसाममध्ये सात दिवस सुरू असतो. रब्बीचा हंगाम संपून घर धनधान्याने भरलं असतं. घरात उत्साहाचं वातावरण असतं. सृष्टीतही नवचैतन्य बहरलं असतं. बोहागच्या आदल्या दिवशी गोपूजन केलं जातं. गाईंना हळद लावून मग आंघोळ घालतात. तिला वांग, दूधी भाज्या खाऊ घालतात. ‘मख्खी ओती, मख्खी पान, मख्खी मारू’ असं गाण म्हणत तिला गोंजारलं जातं. पंख्याने तिला वारा घालतात. बोहागच्या मुख्य दिवशी गायीला लावून उरलेली हळद अंगाला लावून लोक नदीत आंघोळ करतात. घरातले पुरूष एकमेकांना पंचा भेट देतात. दही पोहे आणि पीठा खाल्लं जातं. तर तिसऱ्या दिवशी बोखाई बिहूला भिजवलेल्या चणे, मूग आणि पाच फळांचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. देवाला नवीन वस्त्र घालण्यात येतात. घरात सुमंगल, सुबत्ता नांदावी अशी प्रार्थना केली जाते. आणि मग रंगाली बिहूच्या दिवशी हेसोरी ही पारंपरिक गीत गात, बिहू नाच करत उत्साहात सात दिवस नववर्षाचं स्वागत केलं जातं.
मणीपूरमध्ये चैरोओबाला जुनी भांडी मोडीत

मणीपूरमध्ये ‘चैरोओबा’ या नावाने मैतेयी आदिवासी लोक नववर्षदिन साजरं करतात. इथंही सौरमान पद्धतीने कालगणना केली जाते. ‘सिदाबा मापू’ या देवतेचं पूजन केलं जातं. दोन वर्षांचं मिलन या दिवशी होत असल्याचं इथं मानतात. त्यामुळे हा दिवस नवनिर्मितीला चालना देणारा समजला जातो. जुनी भांडी आणि कपडे मोडीत काढली जातात. चैरोओबाच्या दिवशी पहाटे अंगणात देवाची पूजा करतात. ही जागा फुलांनी सजवली जाते. केळीच्या पानात तांदूळ, भाज्या आणि इतर पारंपरिक पदार्थ छान मांडून देवाला अर्पण केले जातात. आपलं संरक्षण केल्याबद्दल देवाचे आभार मानत, यापुढेही घरात संपन्नता, सुबत्तता नांदू देत अशी प्रार्थना करतात.
अरुणाचलमध्ये 15 दिवस ‘लोसार’चा उत्साह

अरुणाचलमध्ये ‘लोसार’ नावाने नववर्षदिन ओळखला जातो. इथंही सौरमान पद्धतच आहे. तिबेटीयन भाषेत लो म्हणजे वर्ष आणि सार म्हणजे नवीन. इथला नववर्ष स्वागतोत्सव 15 दिवस चालतो. नवीन कपडे आणि भांड्याची खरेदी केली जाते. पहाटे स्थानिक देवतेची आराधना करून उत्सवाची सुरूवात होते. दुसऱ्या दिवशी नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटी घेतात. संध्याकाळी घर दिव्यांनी उजळवतात. घराच्या आसपासही दिव्यांनी उजेड करून वाईट शक्तींना पळवून लावलं जातं. बौद्ध भिक्षूंना कपडे दान करण्यात येतात. यावेळी गुथुक नावाचं पारंपरिक नूडल्स सूप बनवलं जातं. तसेच 9 वेगवेगळ्या प्रकारचे सारण असणारे मोमोज बनवण्यात येतात. ज्याला जे सारण मिळतं, ते त्याच येत्या वर्षाचं भविष्य दर्शवतं.
बंगालमध्ये पोयला बैसाखला लक्ष्मीपूजन

बंगाली भाषिक असणाऱ्या पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा प्रांतात ‘पोयला बैसाख’च्या दिवशी नदीत स्नान करून गणपती आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं. सौरमान कालगणना असणाऱ्या या भागात पहिल्या महिन्याचं नाव आहे बैसाख. या दिवशी घराबाहेर पारंपरिक अल्पना काढली जाते. मध्यभागी पाण्याचा तांब्या ठेवून त्यावर आंब्याचा टाळा, गणपती आणि लक्ष्मीचं प्रतिक म्हणून स्वस्तिक काढला जातो. व्यापारी लोक आपलं नवीन खातेपुस्तक या दिवशी सुरू करतात. त्यांचे पिढीजात ग्राहक यादिवशी आपल्या सहखुषीने काही रक्कम या व्यापाऱ्यांकडे जमा करतात आणि मग नंतर कधीही तिथे जाऊन त्या किंमतीची वस्तू खरेदी करतात.
ओरिसाच्या दमट उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ‘बेल्ला पोणा’चं सेवन

ओरिसामध्ये कोणत्याही समारंभात जगन्नाथजींचं स्थान महत्त्वाचं मानल जातं. त्यामुळे ‘पणा संक्राती’च्या दिवशीही जगन्नाथ मंदिरात प्रचंड उत्साह असतो. सौरमान कालगणनेच्या या पहिल्या दिवशी जगन्नाथ पंचांगाचं वाचन मंदिरात केलं जातं. घरोघरी आणि चौकाचौकात ‘बेल्ला पोणा’चं सेवन आणि वाटप केलं जातं. बेलाच्या फळाचा रस, साखर किंवा गूळ, कैरी, केळं एकत्र करून बेल्ला पोणा बनवलं जातं. ओरिसाच्या दमट उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी या बेल्ला पोणाचं मग उन्हाळ्यात नियमित सेवन केलं जातं.
अशाप्रकारे निसर्गाकडे कृतज्ञता व्यक्त करून येणारं वर्षही असंच फलदायी असू देत अशीच कामना निसर्गदेवतेकडे वेगवेगळ्या पद्धतीने उत्साह साजरा करून लोक करतात.