खूप महत्त्वाची कागदपत्र एखाद्या व्यक्तीला किंवा सरकारी-खाजगी कार्यालयांना पाठवायची असतील तर आपण वर्षानुवर्ष पोस्टाची ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा वापरत आहोत. अल्पदरात कागदपत्र खात्रीने पोहचवणारी ही सेवा ब्रिटिशांनी भारतात सुरू केली. शाळेचे निकाल, नोकरीचे पत्र, कोर्टाची नोटीस पाठवण्यासाठी ही सेवा वापरली जायची. पण आता भारतीय टपाल विभागाने (India Post) ही जुनी आणि विश्वासार्ह रजिस्टर्ड पोस्ट सेवा 1 सप्टेंबरपासून कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजकाल सगळं काही डिजिटल झालं आहे. आपण ई-मेल, WhatsApp आणि इतर ऑनलाइन सेवा वापरतो. त्यामुळे पोस्टाच्या रजिस्टर्ड पोस्टने पाठवल्या जाणाऱ्या वस्तू खूप कमी झाल्या आहेत. 2011-12 मध्ये 24.4 कोटी रजिस्टर्ड पोस्ट पाठवल्या गेल्या होत्या. पण 2019-20 मध्ये हा आकडा 18.4 कोटींवर आला. म्हणजे जवळजवळ 25% घट झाली. याच कारणामुळे पोस्ट खात्याने हा निर्णय घेतला आहे.
आजकाल खासगी कुरिअर कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी बाजारात खूप स्पर्धा वाढवली आहे. त्यामुळे लोकांना जलद आणि चांगल्या सेवा मिळत आहेत. या सगळ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी पोस्ट विभागालाही स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं होतं.
रजिस्टर्ड पोस्टची जागा ‘स्पीड पोस्ट’ घेणार
त्यामुळे, पोस्ट खात्याकडून सांगण्यात आलं आहे की, रजिस्टर्ड पोस्टची जागा आता ‘स्पीड पोस्ट’ घेणार आहे. 1 सप्टेंबरपासून सर्व सरकारी विभाग, कोर्ट, शाळा, कॉलेज आणि सामान्य लोकांनाही स्पीड पोस्टचाच वापर करावा लागेल. स्पीड पोस्ट ही सेवा 1986 पासून सुरू आहे आणि ती ‘रजिस्टर्ड पोस्ट’पेक्षा जास्त वेगवान आहे. दोन्ही सेवांमध्ये वस्तू पाठवल्यानंतर ती कुठे पोहोचली, हे ट्रॅक करण्याची ऑनलाइन सोय आहे.
हेही वाचा : युपीआय पेमेंटच्या नियमांत बदल, जाणून घ्या नविन नियम काय आहेत?
स्पीड पोस्ट महाग आहे का?
रजिस्टर्ड पोस्ट सेवा खूप स्वस्त होती. तिचा खर्च फक्त 25 रुपये होता, तर स्पीड पोस्टचा दर 41 रुपयांपासून सुरू होतो. म्हणजे स्पीड पोस्ट ही रजिस्टर्ड पोस्टपेक्षा 20-25% महाग आहे. ही दरवाढ ग्रामीण भागातील लोकांसाठी, छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. कारण अनेक गावांमध्ये आजही पोस्ट ऑफिसचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा ही भारतातील खेड्यांसाठी खूप महत्त्वाची आहे.
सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या बदलांमुळे सेवा आणखी आधुनिक होईल. स्पीड पोस्टमध्ये वस्तू कधी पाठवली, कधी पोहोचली आणि कुणी घेतली याची माहिती ऑनलाइन मिळते, त्यामुळे ही सेवा अधिक चांगली आणि सोईची आहे.
रजिस्टर्ड पोस्टची सुरूवात ब्रिटिश काळात झाली होती आणि ती अनेक पिढ्यांसाठी विश्वासाचं प्रतीक होती. बँकेची कागदपत्रे, विद्यापीठांचे निकाल, नोकरीची पत्रे आणि कोर्टाच्या नोटिसा यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी पाठवण्यासाठी ही सेवा वापरली जायची. पोस्टसेवा भारताच्या दुर्गम भागातही आहे त्यामुळं रजिस्टर पोस्ट ही सेवा या देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होती. महत्त्वाचे म्हणजे तिची कायदेशीर वैधताही होती. त्यामुळे सरकारी संस्था आणि सामान्य लोक यावर खूप विश्वास ठेवत असत.
जुन्या पिढीतील लोकांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ‘रजिस्टर्ड पोस्ट’ म्हणजे फक्त एक सेवा नाही, तर विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं एक चिन्ह होतं.पण आता काळानुसार बदल करणं गरजेचं आहे आणि म्हणून पोस्ट खात्याने हा निर्णय घेतला आहे.
हेही पहा : डिजिटल युगाचा फटका? India Post ने Registered Post बंद करण्याचं घेतलं ठराविक पाऊल