सामाजिक बदलासाठी पुस्तक हे एक प्रभावी साधन असते, आणि आंबेडकरवादी समाज हे चांगलेच ओळखून आहे. त्यामुळेच चैत्यभूमी असो, दीक्षाभूमी असो तुम्हाला पुस्तकांची दुकाने हमखास दिसतात. क्रांतीचा महत्वाचा टप्पा हा वाचन संस्कृतीतूनच होणार आहे असा आंबेडकरी जनतेचा, प्रामुख्याने युवा, सुशिक्षित पिढीचा समज आहे. या विचारालाच त्यांनी आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले आहे. ही परंपरा फक्त ज्ञान मिळवण्यापुरती मर्यादित नाही; ती सामाजिक न्यायाच्या लढ्याला दिशा देणारी आणि विचारांच्या धाग्यांना एकत्र ठेवणारी आहे. त्यामुळेच चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांची पावले आपसूकच शिवाजी पार्कातल्या पुस्तकांच्या दुकानांकडे वळतात.
वैचारिक बांधिलकी दर्शवण्याची कृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा समाज पुस्तक खरेदीला केवळ ज्ञानसंपादनाचा भाग मानत नाही, तर ती एक वैचारिक बांधिलकी दर्शवण्याची कृती आहे असं मानतात. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी हे वाचक आणि लेखक अशा दोन्ही भूमिकेत आपल्याला दिसतात. चैत्यभूमीवर असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर बाबासाहेबांचे भाषण संग्रह, बौद्ध धर्मावरील साहित्य, दलित लेखन आणि सामाजिक न्यायाशी निगडित विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात. अनेकांसाठी, या पुस्तकांची खरेदी करणे म्हणजे आपल्या विचारधारेशी जोडलेले राहण्याचा मार्ग आहे. तरुण प्रकाशक देखील आता या चळवळीत कार्यरत असल्याचे दिसते. कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, ललित लेखन अशी अनेक प्रकारची पुस्तके तुम्हाला इथे मिळतात. वर्षभराची वैचारिक शिदोरी खरेदी करण्यासाठी रांगा लावून पुस्तक खरेदी करणारे युवक तुम्हाला दीक्षाभूमीवर हमखास दिसतील.
शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे
डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व उलगडले आणि शोषित-वंचित समाजाला बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या त्यांच्या घोषवाक्याने समाजाला शिक्षणाकडे वळवले. त्यांनी स्वतः पुस्तके लिहून समाजाला विचारांचे शस्त्र दिले. ;आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू’ असे संत तुकाराम म्हणून गेले. त्यांचा हा विचार आंबेडकरी समुदायाने चांगलाच आत्मसात केला आहे असे दिसते. त्यांच्या विचारांची ही परंपरा आजही जिवंत ठेवली जाते आहे.
दुर्मिळ पुस्तके मिळण्याचे ठिकाण
आंबेडकरवादी समुहात बौद्धिक चर्चेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुस्तक खरेदीमुळे ही चर्चा अधिक समृद्ध होते. समाजवादी, गांधीवादी, साम्यवादी, द्राविडी असे अनेक अंगाचे, ढंगाचे साहित्य चैत्यभूमीवर आढळते. काही संदर्भग्रंथ केवळ चैत्यभूमीवरच मिळतात. शेकडो अभ्यासक, संशोधक खास संदर्भग्रंथ खरेदीसाठी दीक्षाभूमीवर येत असतात. हे साहित्य प्रत्येक वाचकाला वेगवेगळ्या विचारांशी जोडते आणि त्यातून वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग खुला होतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वाचन ही आंबेडकरी सांस्कृतिक परंपरा
ही पुस्तके केवळ ज्ञानसंपादनाचे साधन नाहीत, ती पिढ्यांमधील विचारांची जोडणी करण्याचे माध्यम आहेत. एक पिढी समुहातील ज्येष्ठ लेखकांची विचारसरणी स्वीकारते आणि पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचवते आणि विचारधारेची ही परंपरा विवेकवादाशी आपले भक्कम नाते सांगते. त्यामुळे आंबेडकरी समुहात वाचन चळवळ ही केवळ नावापुरती नसून एक सांस्कृतिक परंपरेचा भाग देखील आहे. यातून प्रत्येकाला आपापल्या विचारांवर पुन्हा विचार करण्याची संधी मिळत असते. पुस्तक खरेदी ही केवळ वैयक्तिक कृती नाही, तर ती सांस्कृतिक ओळख दर्शवण्याचा एक प्रकार आहे.
समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचं डॉक्युमेंटेशन
दलित साहित्य, कवितासंग्रह, आणि ऐतिहासिक पुस्तकांद्वारे त्यांच्या चळवळीचे दस्तऐवजीकरण होत असते. त्यामुळेच 80 वर्षांची एखादी निरक्षर आजी किंवा आजोबा चैत्यभूमीवर पुस्तक खरेदी करताना दिसतात, कारण त्यांच्या नातवंडासाठी त्यांना ही विचारांची शिदोरी घेऊन जायची असते. यामुळे ही पुस्तक खरेदी ही फक्त माहिती मिळवण्यापुरती मर्यादित राहात नाही; तर ती समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान जपणारी देखील ठरत असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सामूहिक बदलाचे हत्यार
पुस्तक खरेदी-विक्रीतून वंचित समुहातून येणाऱ्या लेखक, प्रकाशक, आणि विचारवंतांना देखील आर्थिक पाठबळ मिळते. मुख्य प्रवाहातील साहित्याला टक्कर देणारे हे लेखन वंचित समाजाच्या समस्या आणि त्यांच्या लढ्यांना आवाज देत असते.पुस्तक खरेदीमुळे वंचित लेखकांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळत असते. दरवर्षी केवळ पुस्तकखरेदीतून चैत्यभूमीवर कोटींची उलाढाल होत असते. पुस्तके केवळ वैयक्तिक जीवन बदलण्यासाठी नसतात, तर ती सामूहिक बदलाचे हत्यार देखील ठरतात. डॉ. आंबेडकरांनी जशी आपल्या पुस्तकांमधून एक विचारधारा दिली, त्याचप्रमाणे आंबेडकरवादी समाजही त्या विचारांवर आधारित नवीन मार्ग शोधत असतो. हा नवमार्ग शोधण्याचा लढा अजूनही सुरु आहे. ही वैचारिक घुसळण समूहाला शिक्षित, प्रशिक्षित करतेच परंतु त्यांना प्रबुद्ध करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल देखील घडवून आणते.
पुस्तकं खरेदीनं महामानवाला अभिवादन
समाजातील न्याय, समता, आणि बंधुतेच्या आदर्शांवर आधारित पुस्तकांची परंपरा पुढे नेणे ही आंबेडकरवादी समाजाची जबाबदारी आहे हे ते जाणतात. त्यामुळे पुस्तक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. डॉ. आंबेडकरांना पुस्तक खरेदी करून अभिवादन करणे ही किती आदर्शवत गोष्ट आहे. कुणा महामानवाला अशी अभिनव श्रद्धांजली अर्पण करण्याची पद्धत जगात इतरत्र कुठे असेल असे वाटत नाही.