खडतर अशा इंग्लंड दौऱ्याचं नेतृत्व युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. 20 जून पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अचानक कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाचा दौरा असेल.
रोहित आणि विरटच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये ‘ट्रान्झिशन पिरिएड सुरु झाला आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सर्कलला इंग्लिश दौऱ्यापासून प्रारंभ होईल. हा दौरा ‘गिल सेने’साठी चांगलाच आव्हानात्मक ठरणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? यासाठी अनेक क्रिकेटपटू शर्यतीत होते. अखेर भविष्याचा विचार करत निवड समितीने शुभमन गिलच्या नावाला पसंती देण्याचा निर्णय घेतला. आणि आमची निवड गिल योग्य ठरवले अशी आशा निवड समितीने व्यक्त केली आहे.
शुभारंभ
25 वर्षीय शुभमन गिलची टीम इंडियाचा 37 वा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. मन्सूर अली खान पतौडी, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि रवि शास्त्री यांच्यानंतरचा तो भारताचा सर्वात युवा कर्णधार आहे. कसोटी पदार्पण करुन गिलला जेमतेम पाच वर्ष झाली आहेत. आणि त्याच्याकडे भारतीय संघाचं कर्णधारपद दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिलने आतपर्यंत खेळलेल्या 32 कसोटी सामन्यात 35.05 च्या सरासरीने 1,823 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून गिलला आपली छाप सोडावी तर लागणारच आहे. शिवाय एक फलंदाज म्हणूनही त्याला निवड समितीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवावा लागेल. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला शेवटच्या सामन्यात संधी मिळालेली नव्हती. त्यावरुनही त्याला टीकेचं लक्ष्य केलं जातंय. जो क्रिकेटपटू कसोटी संघात आपलं स्थान पटकांवण्यासाठी झगडत होता. तो या संघाचा कर्णधार कसा होऊ शकतो? असा सवाल काही माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: कोण होणार रोहित शर्माचा उत्तराधिकारी ?
बुमराह आणि पंतला मागे टाकत गिल कर्णधार
रोहित शर्माने निवृत्ती घेतलेल्यानंतर अनुभवाच्या जोरावर जसप्रीत बुमराहला संघाचं कर्णधाकपद सोपवावं, असं क्रिकेट पंडितांचं मत होतं. त्यातच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहितच्या अनुपस्थित त्याने संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळे साहजिकच बुमराह कर्णधार व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, ऑस्ट्रेलियावरुद्धच्या अखेरच्या कसोटीत जर त्याला दुखापत झाली नसती तर, त्याच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे. तसंच बुमराहने आपण इंग्लंडमध्ये पूर्ण पाच कसोटी खेळणार नसल्याचं निवड समितीला कळवलंय. त्यामुळे बुमराह ऐवजी गिलची निवड करण्यात आली. तर ऋषभ पंतकडे उपकर्णधापद देण्याचा निर्णय घेण्यात आला. शुभमन गिलने इंडियन प्रिमियर लीगमध्ये यशस्वीपणे नेतृत्व केलंय. त्यामुळे हा आयपीएलमधील अनुभव त्याच्या पथ्यावरच पडणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात गिलची अगनिपरीक्षा
आगमी इंग्लिश दौऱ्यामध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाची चांगली कसोटी लागणार आहे. 18 जणांची निवड केलेल्या या संघातून ‘अंतिम अकरा’मध्ये कुठल्या क्रिकेटपटूची निवड करण्याचं आव्हान त्याच्यासमोर असेल. त्याचप्रमाणे रोहित शर्माऐवजी यशस्वी जयस्वाल बरोबर सलामी कोण येणार ?, तसंच विराट कोहलीची चौथ्या क्रमांची जागा कोण घेणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधावी लागणार आहेत. के एल राहुल जर सलामीला आला तर चौथ्या क्रमांकावर गिल स्वत: येणार की, आठ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणारा करुण नायर ही जागा घेणार, हा महत्त्वाचा निर्णय त्याला प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबर घ्यावा लागणार आहे. युवा साईसुदर्शन या दौऱ्यात कुठली भूमिका बाजवणार? याकडेही क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल. आजच्या घडीला भारतीय कसोटी संघात रविंद्र जाडेजा हा एकमेव अनुभवी क्रिकेटपटू आहे. ज्याने 80 कसोटी सामन्यात 3 हजाराहून अधिक धावा आणि 300 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्यात. जसप्रीत बुमराहने या दौऱ्यात केवळ तीन कसोटी सामनेच खेळणार असल्याचं म्हटलंय. तर हे तीन कसोटी सामने कुठले असतील त्याच्यावर गोलंदाजीचा भार अधिक येणार नाही, याची काळजी कर्णधार गिलला घ्यावी लागेल. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूर या दोन अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी कोणाला पसंत देण्यात यावी, याचा निर्णयही त्याला घ्यावा लागणार आहे. तेज गोलंदाजीची धुरा बुमराह बरोबर कोण सांभाळणार तेही पहावे लागेल. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीपसिंग यापैकी अंतिम अकरामध्ये कुणाला संधी देण्यात येईल ते कसोटी मालिका सुरु झाल्यावरच स्पष्ट होईल.
जीजी युगाचा प्रारंभ
भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आता खऱ्याअर्थानी ‘जीजी युगा’ला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शुभमन गिल ही जोडगोळी इंग्लंड दौऱ्यात कशी कामगिरी करते त्यावर बरचं काही अवलंबून असणार आहे. 2007 पासून भारतीय संघ इंग्लंमध्ये मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं आव्हान या दोघांसमोर असेल. सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाला परदेशात कसोटी जिंकण्याची सवय लावली. तर विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर टीम इंडियाला परदेशात मालिका विजय कसा मिळवायचा हे शिकवलं. विराट कोहली आणि रवि शास्त्री ही जोडी कसोटी क्रिकेटमध्ये कमालीची यशस्वी झाली होती. आता गिल आणि गंभीर ही जोडी भारतीय कसोटीमध्ये कशा प्रकारे आपला प्रभाव पाडणार या सर्वांची उत्तरं काही काळात आपल्याला मिळतील. युवा क्रिकेटपटूंचा भरणा असलेला हा संघ भारताचं कसोटी क्रिकेटमधील भविष्य ठरवणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विनमुळे भारतीय कसोटी संघात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विराटचा मैदानावरचा आक्रमकपणा आणि रोहितचा संयमीपणा या युवा टीमला प्रकर्षाने जाणवणार आहे. आता शुभमन गिल या युवा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सध्या जवळपास 6च्या रनरेटने कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या इंग्लिश संघाला रोखण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. तर भारतीय कसोटी संघात सुरु झालेलं ‘जीजी पर्व’ भारतीय कसोटी क्रिकेटसाठी फलदायी ठरणार का? ते येणारा काळच ठरवणार आहे.
1 Comment
टिम इंडिया आणि नविन कर्णधार यांची खरी कसोटी या कसोटी मालिकेत बघायला मिळेल.