‘अंदाज अपना अपना’ या राजकुमार संतोषीच्या अजरामर सिनेमात एक प्रसंग आहे. दोन दोन परेश रावल ‘मै तेजा हूँ, मै तेजा हूँ’ म्हणून भांडत असतात. अचानक एकजण म्हणतो ‘मै तेजा हूँ, मार्क इधर है’ असंच काहीसं आपलं प्रमुख अन्न असणाऱ्या भाताच्या बाबतीत होतंय.
भारत – पाकिस्तान दरम्यान फक्त काश्मीर आणि क्रिकेटचाच वाद नाही बरं का! सध्या भारत आणि पाकिस्तान या देशा दरम्यान तांदूळाचा वाद सुरू आहे. आणि तो ही बासमती तांदूळासाठी. आंब्यात जसं हापूसचं स्थान आहे तेच बासमतीचं तांदुळाच्या वाणांमध्ये आहे. खवैय्यांना हा बासमती तांदळाचा वास वेड लावत असतो. या तांदुळाच्या महानपणाचं एकच उदाहरण पुरे आहे, ते म्हणजे बिर्याणी.
आपण दम बिर्याणी आवडीने खातो. ती व्हेज किंवा नॉनव्हेज कशीही असो. ज्याप्रकारचं प्रेशर या बिर्याणीला लागतं त्या प्रेशरसाठी मजबूतच तांदूळ लागतो. आणि तो मजबूतपणा बासमती तांदळामध्ये आहे. या तांदळाचा दाणा हा लांबसडक आणि शुभ्र असतो. शिजवल्यानंतरही या तांदूळाच्या भाताचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की, दाणा आणखीन लांब आणि सहज कुस्करला जात नाही. म्हणून तर शक्यतो बिर्याणीत बासमती तांदूळ वापरतात.
बासमतीसाठी भारत – पाकिस्तान वाद?
तर बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. भारत सरकारने कृषी उत्पादने आणि खाद्यपदार्थांकरिता युरोपियन युनियनच्या गुणवत्ता योजनांवरील संरक्षित भौगोलिक संकेत (पीजीआय) स्थितीसाठी अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेत या तांदळाचं कौतुक होऊ लागलं आहे. आणि युरोपीय महासंघानेही यासाठी मंजुरी दिली आहे. पण मधल्या काळात पाकिस्तानी सरकारने युरोपीय राष्ट्रसंघांमध्ये बासमतीच्या ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’साठी (भौगोलिक निर्देशन – जीआय) भारताने दाखल केलेल्या दाव्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी त्याच्या स्वामित्वासाठी पुरावे दाखल केले. त्या पुराव्यांना अजूनही युरोपीय महासंघाने समोर आणलेलं नाहीये.
यामुळे बासमती तांदूळावरची भारताची मालकी एकप्रकारे पूर्णत्वाला पोहोचेल.
भारताला जर जीआय टॅग मिळाला तर आपल्या निर्यातीवर परिणाम होईल, म्हणून पाकिस्तानने या अर्जाला विरोध केला आहे. मात्र, युरोपीय महासंघाकडून पाकिस्तानच्या विरोधाला दुजोरा दिला जात नसल्यामुळे पाकिस्तानची ही भीती सत्यात उतरताना दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्यावतीने रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाणिज्य सचिव, बौद्धिक संपदा संस्थेचे (आयपीओ-पाकिस्तान) अध्यक्ष, पाकिस्तान तांदूळ निर्यात संघाचे (आरईएपी) प्रतिनिधी आणि कायदेतज्ज्ञही उपस्थित होते. या बैठकीमध्ये आरईएपीच्या प्रतिनिधिंनी पाकिस्तान हा बासमती उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश असून भारताने या वाणावर दावा सांगणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. भारताने युरोपीय महासंघात बासमती हे आपलं उत्पादन असल्याचं मांडलं आणि पाकिस्तानच्या शेपटावर पाय पडला आहे. 2005 पर्यंत पाकिस्तान डिप्लोमसी याबाबतीत आपल्या खूपच वरचढ होता. काहीशी त्याचीच झलक दिसून आली. पण गेल्या काही वर्षांत आक्रमक झालेल्या भारताने त्याला उत्तम पद्धतीने तोंड दिलं आहे.
पण त्याआधी जागतिक पातळीवर आपण आपल्या देशांतील प्रमुख उत्पादनांचं रक्षण करण्याआधी देशांतर्गत परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भौगोलिक निर्देशांक म्हणजे काय
प्रत्येक उत्पादनांमध्ये कच्च्या मालाची गुणवत्ता ही प्रमुख भूमिका बजावत असते. खाण्याच्या पदार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं तर, एखाद्या भौगोलिक भागात असणारी हवा, तापमान, माती, पाणी या सर्व घटकांमधून एखादं पीक उत्पन्न होत असतं. या पीकांचा जेव्हा अन्नामध्ये रूपांतर होते तेव्हा त्या पदार्थांला मूळ भौगोलिक प्रदेशाची सर असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थांचं आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तुचं वैशिष्ट जोखलं जातं. जरी एकसमान पदार्थ वा वस्तू निरनिराळ्या ठिकाणी पिकत असल्या तरी त्यामध्ये विविधता असते. त्यामुळे मूळ पीक हे जरी इतर भौगोलिक प्रदेशात उत्पन्न झालं तरी त्याला मूळ पिकांची सर येऊ शकत नाही. त्यामुळे जर त्या पिकांमध्ये मूळ गुणवत्ता नसतानाही जर त्या दुसऱ्या उत्पादकाने प्रचंड जाहिरात आणि प्रचार करून आपलाच माल लोकांवर ठसवला तर ते चुकीचं ठरेल. यामध्ये जे मूळ उत्पादन आणि गुणवत्तेनुसार उत्तम असलेल्या पिकांवर आणि ते उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो.
भौगलिक निर्देशांक संकल्पना
देशोदेशीची दारू आणि फ्रान्सचं चीज, हे पहिले काही असा निर्देशांक मिळवणारे पदार्थ. पोर्तुगालची पोर्टवाईन, स्कॉटलँडची स्कॉच, मेक्सिकोची तकीला ही काही उदाहरणं. आता उस्मानाबादच्या शेळीलाही हा निर्देशांक मिळतोय. तेव्हा याचा वापर जगाने सुरु केला आणि आपण त्यात सहभागी झालो.
टेक्सास प्रांतात अमेरिकेची बासमती तयार होऊ लागली आणि तिला टॅक्समती म्हणून अमेरिकेत पेटंट मिळालंही. नेहमीप्रमाणे आपल्याला उशिरा जाग आली. आणि मग सुरु झाला ‘बासमतीआमच्या भूमीतील आणि आमच्याच कौशल्याने बनलेला’ हे मांडण्याचा लढा. त्याला बऱ्याच प्रमाणात यशही आलं.
पण खरी गोम पुढे आहे. मूळचा बासमती हा ‘हिमालय की गोद मे’ किंवा पायथ्याचा. फाळनीनंतर बासमती तांदूळ नेमका कुठला हा वाद सुरू झाला. याचवेळी बासमतीच्या विविध वाणांचं उत्पादन होऊन ते भारतभर पसरलं. याच वेगवेगळ्या वाणांपैकी पुसा बासमती – 1 हे वाण जास्त प्रचलित झालं. या तांदळाचा दर्जा हा अप्रतिम आणि टिकाऊ होता.
इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) च्या डायरेक्टरेट ऑफ राइस रिसर्च (डीआरआर)ने 1989 मध्ये डॉ. सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जात शोधून काढली. बासमतीचा स्वाद आणि सुगंध असतो तो प्रामुख्याने 2 असेटील पायरोलीन (2-AP) आणि तत्सम 40 इतर द्रव्यांच्या मिश्रणामुळे. उत्कृष्ट दर्जाच्या बासमतीत 2-APचे प्रमाण असते 1000-1500 पार्ट्स पर बिलीयन(पीपीबी). या संशोधनामुळे देशांतर्गत बासमतीचा उत्पादन वाढलं. तरी भारतात मूळ बासमती तांदूळ हा उत्तरेकडील राज्याचचं प्रमुख पीक असल्याचं न्यायालयानेही स्पष्ट केलं आहे.
बासमती वाद 2004 सालापासूनचा
मुळात 2004 सालचा बासमतीच्या पेटंटचा वाद. 1500 पानांचं दस्तऐवज देऊन ते आपण खोडून काढायला लावलं. पण या आपल्या प्रमुख पिकांवर भौगोलिक निर्देशांक मिळण्याची प्रक्रिया आपण अलीकडेच सुरू केली. मात्र पाकिस्तानने त्यामध्ये खोडा घालत या अर्जाला आव्हान दिलं आहे.