कलाकार खरंच निवृत्त होतात का ?

Bollywood : कलाकार ही व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. कधी ती हट्टी असते; तर कधी रागीट असते. काही कलाकार हे विनाकारण सतत 'विनोद निर्मितीचा अट्टहास' बाळगून भेटणाऱ्या प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करत असतात
[gspeech type=button]

कलाकार ही व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. कधी ती हट्टी असते; तर कधी रागीट असते. काही कलाकार हे विनाकारण सतत ‘विनोद निर्मितीचा अट्टहास’ बाळगून भेटणाऱ्या प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर काही कलाकार हे विक्षिप्त असतात, तर काही कलाकार हे स्वतःच्या अतिप्रेमात असतात. आपण चर्चेत नसलो तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय की काय ? अशी भीती त्यांना सतावत असते.

सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळी मानसिकता घेऊन जन्माला आलेल्या या लोकांनी आपलं आयुष्य हे जणूकाही जन्मानेच त्यांच्या प्रेक्षकांना समर्पित केलेलं असतं. वयानुसार हे लोक काम करणं कमी करतात. पण, त्यांच्या कामातून निवृत्ती घेणं हे त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेसारखं असतं.

सिनेक्षेत्रातील सेकंड इनिंग

अमिताभ बच्चन हे ‘खुदा गवाह’ नंतर नायकाच्या पदावरून पायउतार झाले खरे; पण, त्यानंतर त्यांनी जी काही सेकंड इनिंग खेळली आहे, ज्या उत्साहाने ते सगळीकडे वावरत आहेत ते आजच्या नव नायकांना देखील प्रेरणा देणारं आहे. ‘सुपरस्टार’ म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर अमिताभ यांनी अभिनय शिकवण्यासाठी ‘एबीसीएल’ नावाची कंपनी सुरू केली, त्यासाठी खूप मोठी रक्कम त्यांनी कर्जाच्या रुपाने उभी केली. या कंपनीचं अर्थ गणित काही त्यांना जमलं नाही. ही ‘एबीसीएल’ कंपनी त्यांना बंद करावी लागली.

बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अमिताभ यांनी पुन्हा एकदा काम करायचं ठरवलं. यश चोप्रा यावेळी निर्माता बनून अमिताभ यांच्या मदतीला धावून आले. ‘मोहोब्बते’ नावाच्या एका मोठ्या स्केलवरील सिनेमाची यशराज बॅनरने निर्मिती केली. आपल्या लाडक्या अभिनेत्याला ‘नारायण शंकर’ रूपाने आपल्या समोर सादर केलं आणि अमिताभ 2.0 हा सिलसिला सुरू झाला. पुढे छोट्या पडद्यावर ‘केबीसी’आलं आणि त्या शो ने या महानायकाला एक व्यक्ती म्हणून घरोघरी लोकप्रिय केलं आणि ‘अमिताभ रिटायर होत नसतो’ हे सिद्ध झालं.

आध्यात्मिक ब्रेक नंतर सिनेक्षेत्रात रिएंट्री

विनोद खन्ना या समकालीन स्टारने आपलं करिअर बहरत असताना ओशो यांच्या आश्रमात जाऊन वास्तव्य करण्यासाठी अभिनयातून मोठा ब्रेक घेतला होता. तरुणपणी आपल्या दिसण्याने समस्त भारतीयांना प्रभावित करणाऱ्या या अभिनेत्याने ‘दबंग’ मध्ये सलमान खानचे वडील बनून मोठया पडद्यावर पुनरागमन केलं. ‘दबंग’ या सिरीजच्या दोन सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.

सुनील दत्त यांचं कमबॅक

असाच कमबॅक हा काही वर्षांनी सुनील दत्त यांनी केला होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये आपल्या मुलाच्या वडिलांचा रोल करण्याची संधी त्यांना राजू हिराणी या गुणी दिग्दर्शकाने दिली. या सिनेमातील तो सीन जेव्हा संजय दत्त आपल्या वडील सुनील दत्त यांना आपण खरे डॉक्टर नसल्याचं सांगून त्यांची माफी मागतो, तेव्हा सुनील दत्त यांचा अभिनय, एक्सप्रेशन्स हे त्यांच्यातील कलाकार अजूनही किती तरुण आहे हे दर्शवतो.

नायिका म्हणून राखीचं कमबॅक अविस्मरणीय

बॉलीवूड नायिकांपैकी सांगायचं झालं तर, मोठ्या पडद्यावर ‘करण अर्जुन’च्या आई झालेल्या राखीने अभिनयाची सर्वात मोठी इनिंग खेळली होती. राखीने ‘कसमे वादे’ सिनेमा आपल्या अभिनयाने गाजवला होता. त्यावेळी हा सिनेमा राखीचा शेवटचा सिनेमा असेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र त्यांनी प्रत्येक सिनेमानंतर छोटा छोटा ब्रेक घेत नवनव्या भूमिकेतून पडद्यावर आगमन केलं आहे. आणि ती प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्याजोगी आहे.

सिनेक्षेत्रातून निवृत्ती घेत राजकारण क्षेत्रात पदार्पण

कलाकार म्हणून निवृत्ती घेणाऱ्या नायिकांमध्ये जया बच्चन आणि जया प्रदा यांचं नाव आधी येतं. या दोन्ही नायिकांनी बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. जया बच्चन या करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ सारख्या सिनेमांमधून आईचा रोल करताना दिसल्या होत्या.

निवृत्तीचा पब्लिक स्टंट

विक्रांत मेसी या कलाकाराने ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा केल्यानंतर आपण निवृत्त होणार, कुटुंबाकडे लक्ष देणार अशी एक पोस्ट केली होती. काही दिवस यावर खूप चर्चा देखील झाली. पण, एक महिन्याच्या आत विक्रांतने त्यावर स्पष्टीकरण दिलं की, ते वक्तव्य मी काही समाज कंटकांनी दिलेल्या त्रासामुळे उद्विग्नतेत केलं होतं. ’12th फेल’, ‘हसीन दिलरुबा’ सारखे हिट सिनेमे देणारा हा अभिनेता इतक्यात तरी बॉलीवूडचा निरोप घेऊ शकत नाही आणि हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे हे जाणकार ओळखून होते.

आमिर खान खरंच निवृत्ती घेणार?

आमिर खान देखील सध्या आपल्या वय झाल्याच्या, निवृत्तीच्या वक्तव्यावरून चर्चेत आहे. आपला मुलगा जुनैदला मिळणारे सिनेमे बघून कदाचित आमिर असं म्हणाला असावा अशी त्याच्या फॅन्सला आशा आहे. प्रत्येक गोष्टीत आपलं परफेक्शन सिद्ध करणारा आमिर हा इतक्यात तरी निवृत्त होणार नाही, अशी सर्वांना खात्री आहे.

परदेशात वास्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीचं कमबॅक

प्रीती झिंटा, प्रियांका चोप्रा यांनी परदेशात वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींशी लग्न केल्यावर बॉलीवूडमधून काही काळ ब्रेक घेतला होता. पण, आता ‘लाहोर 1947’ या सिनेमामधून प्रीती झिंटा आणि एस राजमौली यांच्या आगामी सिनेमातून प्रियांका चोप्रा कमबॅक करणार आहेत.

माधुरी दिक्षीतने काही काळ बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता. पण, नंतर त्यांनी टेलिव्हिजन शोज् मधून जजच्या रुपात कमबॅक करून, ‘देढ इष्कीया’, ‘टोटल धमाल’ आणि ‘भुलभुलैय्या 3’ सारखे सिनेमे करत आपली गाडी त्यांनी पुन्हा बॉलीवूडच्या ट्रॅकवर आणली.

कुटुंबासाठी सिनेक्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या नायिका

‘गजनी’ फेम ‘आसिन’ नावाच्या अभिनेत्रीने देखील 2016 मध्ये एका व्यावसायिकाशी लग्न करून बॉलीवूडचा निरोप घेतला. आयेशा टाकिया हिने ‘टारझन – द वंडर कार’, ‘डोर’, ‘वॉन्टेड’ सारख्या सिनेमांमधून काम करत लोकप्रियता मिळवली होती. पण, फरहान आझमी सोबत तिने लग्न केल्यावर बॉलीवूड करिअर सोडलं.

वेगळ्या वाटा चोखळणाऱ्या नायिका

अलिकडच्या नायिकांपैकी ट्वींकल खन्ना ही एक अभिनेत्री आहे जिने आपल्या इंटेरिअर डिझाईन आणि लेखन कार्याला पूर्ण वेळ देण्यासाठी नायिका म्हणून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आणि या दोन क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

पडद्यावरुन थेट आयटी क्षेत्र

बॉलीवूड मधून निवृत्ती घेतल्यानंतरही यशस्वी करिअर करू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये मयुरी कांगो हिचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. ‘पापा कहते है’ या सिनेमातून आपला अभिनय आणि निरागसता दाखवणाऱ्या मयुरी कांगोला बॉलीवूडने सिनेमा फ्लॉप झाल्यावर ‘अनलकी’ म्हणून लेबल लावलं. तिने ही टीका सिरियसली घेतली आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिने आयटी मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. आज मयुरी कांगो या गुगल इंडियाच्या हेड म्हणून गुरगाव येथे कार्यरत आहेत.

या क्षेत्रात निवृत्तीचं ना वय आहे ना पर्याय

‘बॉलीवूड’ ला जेव्हा पासून उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे, तेव्हापासून निर्माता, अभिनेता यांना हे क्लिअर आहे की, इथे देखील मंदी येऊ शकते. आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जसं ‘बेंच वर’ बसवतात तसं इथे देखील काही काळ काम न मिळणे वगैरे होऊ शकतं. या सर्व परिस्थितीत जो टिकून राहू शकतो त्यानेच या इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा विचार करावा असं ट्रेंड सांगतोय. इथे तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात, त्यासाठी तुम्हाला कोणी एचआर वगैरे नसतो हा पण एक मोठा फरक आहे.

जे कलाकार इथे स्वतःला फ्लेक्सिबल ठेवू शकतात, सिनेमा नाही तर ओटीटी, सिरीज नाही तर स्टेज शोज्, मोठा पडदा नाही तर छोटा पडदा तेच फक्त इथे आपलं आयुष्य घडवू शकतात आणि सदा कार्यरत राहू शकतात, त्यांना कोणीच निवृत्त करू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ