गाव विकास आराखडा

GramPanchayet : लोकसहभाग, लोकवर्गणीतून हातभार लावावा असा ग्रामविकासाचा सुंदर प्रयोग म्हणजे "ग्रामपंचायत विकास आराखडा". तो प्रत्येकाला आपला वाटावा म्हणून "आमचा गाव- आमचा विकास" हे त्याचं राज्याने केलेलं नामकरण.
[gspeech type=button]

‘आमचा गाव, आमचा विकास’ असा कार्यक्रम देऊन सरकारने गावकऱ्यांना गावाचे नियोजन करायला भाग पाडले. त्यात केंद्रीय वित्त आयोगाचा हस्तक्षेप होता. त्यामुळे का असेना गाव विकासाचे नियोजन हा विषय गावकऱ्यांना परिचित झाला. आपल्याला  विकास कसा हवा, हे सर्वांनी एकत्र बसून ठरवावे. आजची स्थिती आणि भविष्यातील म्हणजे किमान पुढील पाच वर्षातील गाव यावर चिंतन करावे. कामे निवडावी. योजना तयार कराव्या आणि वार्षिक कृती आराखड्यात प्राधान्यक्रम ठरवून त्याला मूर्तरुप द्यावे. निधीचे अनेक स्रोत त्यासाठी तिकडे वळते करावेत. त्याला लोकसहभाग, लोकवर्गणीतून हातभार लावावा असा ग्रामविकासाचा सुंदर प्रयोग म्हणजे “ग्रामपंचायत विकास आराखडा”. तो प्रत्येकाला आपला वाटावा म्हणून “आमचा गाव- आमचा विकास” हे त्याचं राज्याने केलेलं नामकरण.

शाश्वत विकासाला प्राधान्य               

या विकास आराखड्यात प्राधान्य द्यायचे आहे ते शाश्वत विकासाला… “वसुधैव कुटुंबकम” मुळे आपल्या गावातील आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम  जगाला भोगावे लागत असल्याने आता गावाला फक्त गावापुरतं मर्यादित राहता येणार नाही.  संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाची 17 ध्येय ठरवून 2030 पर्यंत ती साध्य करण्याची जबाबदारी सहभागी राष्ट्रावर सोपविली आहे. त्यात एकूण 193 देश सहभागी आहेत. आपला देश त्यातील एक. हा विषय प्रत्येक भारतीयांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने गावपातळीवर ती 17 ध्येय साध्य करण्यासाठी नऊ संकल्पना दिल्या. त्यात गरिबी मुक्त गाव,आरोग्य दायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या  सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव आणि महिलास्नेही गाव यांचा समावेश आहे.

                               खुर्सापार ग्रामपंचायतील प्रशिक्षण केंद्र

एकत्र येऊन निधी आणि त्याचा विनियोग ठरवणे

गाव विकास आराखडा तयार करतेवेळी वित्त आयोगाचा निधी खर्च करताना नियोजनात  जलसमृद्ध, स्वच्छ हरित गाव अशा संकल्पनांना  प्राधान्य द्यावे लागते. अभिसरण करून काम पूर्ण करणे एखादे काम त्या संबंधित योजनेच्या निधी अभावी पूर्ण होत नसेल तर इतर योजनांच्या निधीची सांगड घालून ते काम पूर्ण करता येते, त्यालाच अभिसरण असे म्हणतात.  अशा अभिसरणातून ग्रामसभेने ग्रामविकास आराखड्यात समाविष्ट केलेली आणि प्राधान्याने निवड केलेली कामे करता येतात. एकूण काय तर या सर्व संकल्पना घेऊन गाव विकासाचा सुंदर आराखडा गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा : लोकसहभाग आणि गाव विकास

ग्राम संसाधन गट

ग्राम संसाधन गट आराखड्यात कोणत्या बाबींचा समावेश करावा यासाठी गावातील जाणकार व्यक्तींचा मिळून एक ग्राम संसाधन गट तयार करण्यात येतो. या ग्राम संसाधन गटांमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील विविध क्षेत्रातील काही तज्ञ मंडळी, उपक्रमशील बचत गटांच्या अध्यक्ष सचिव यांचा समावेश असतो. हा गावातील अनुभवी, जबाबदार व्यक्तींचा  ‘ग्राम संसाधन गट’  ग्रामसभेच्या माध्यमातून स्थापन करावा लागतो. त्याची सदस्य संख्या ही ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या तिप्पट इतकी असावी लागते. या गटाने  गाव विकास नियोजनाला योग्य प्रकारे हातभार लावावा अशी अपेक्षा असते. 

लोक सहभागी तंत्राचा वापर कुठे करता येतो?

लोक सहभागी तंत्राचा वापर गावकऱ्यांना या सर्व बाबी आपल्या वाटाव्या, त्यांनी त्यात रुची घ्यावी म्हणून नियोजनाला प्रारंभ करण्यापूर्वी  गाव नकाशा तयार करणे, मशाल फेरी, शिवार फेरीचे आयोजन, ऋतू चक्र विश्लेषण  या सारख्या लोक सहभागी तंत्रांचा वापर करण्यात येतो. गाव नकाशा तयार करताना सर्व गावकरी  गावातील एक मोकळ्या ठिकाणी एकत्र येतात. आपल्या गावातील उपलब्ध संसाधनांची माहिती त्या वेळी उपलब्ध साधनांचा वापर करून जमिनीवर गावाचा नकाशा काढून एकमेकांशी संवादाद्वारे ते करून घेतात. तर मशाल फेरी द्वारे गावातील सर्व घटकांना एकत्र येण्यासाठी वातावरण निर्मिती केल्या जाते. शिवार फेरीच्या आयोजनातून गावांतर्गत येणाऱ्या भौगोलिक क्षेत्रातील सर्व उपलब्ध संसाधनांचा अभ्यास करून  ‘सॉट’अनालिसिस केल्या जाते. ज्या अंतर्गत उपलब्ध जमेच्या बाजू, संधी,उणिवा आणि धोके यांची माहिती होते.

खुर्सापार येथील कुलस्वामिनी भवानी मंदिर तिर्थस्थानाचा विकास आराखडा

हवामान बदलाचा अभ्यास

ऋतुचक्र विश्लेषणाच्या माध्यमातून गावात गत दहा वर्षांपूर्वीपासून झालेल्या हवामान बदलांचा अभ्यास करून त्याचे परिणाम अभ्यासले जातात. असे हे लोक सहभागी नियोजनाचे तंत्र. या सर्व बाबी गावागावात सुरू होऊन आता जवळपास एक दशक लोटले. 

गावकरी सहभाग का घेत नाहीत?

ग्रामपंचायत विकास आराखडा हा त्या गावातील लोकांनी आपल्या गावाचे सुंदर चित्र मनात रेखाटून तयार करावा अशी अपेक्षा आहे. मात्र गावकऱ्यांची विकासाची संकल्पना ही बांधकामा पलीकडे जाताना दिसत नाही. गावागावात ग्राम संसाधन गटाच्या माध्यमातून याबाबत जागृती होणे गरजेचे असताना अनेक गावात ग्राम संसाधन गट देखील स्थापन करण्यात आलेले नाही. आराखड्यामधील बाबी विविध यंत्रणांना समजून देण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्हास्तर तालुकास्तर आणि ग्राम स्तरावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. मात्र या प्रशिक्षणाकडे केवळ अर्थप्राप्तीचे साधन म्हणून बघण्याची बहुतांश अधिकारी वर्गाची वृत्ती, उरकून टाका या धरतीवर आयोजित केलेली प्रशिक्षणे त्यामुळे या आराखड्यांमधील मूळ गाभा गावकऱ्यांना  समजलाच नाही. मूळ संकल्पना समजून न घेतल्याने असंख्य गावे अजून आमचा गाव, आमचा विकास या संकल्पनेपासून  आणि पर्यायाने शाश्वत विकासा पासून दूर असल्याचे दिसून येते.

हे ही वाचा : शाश्वत ग्राम विकास मॉडेल – पंचम

आराखड्याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता

हा आराखडा तयार करण्यात बोटावर मोजता येतील इतकी गावे सोडली तर  फार कमी  गावकरी त्यात लक्ष घालतात.  वेगवेगळ्या योजनांच्या निधीचा समन्वय साधताना काही  बाबी न समजल्याने दरवर्षीची एक प्रक्रिया म्हणून फक्त ग्रामपंचायत अधिकारी आणि संगणक ऑपरेटर या नियोजनाकडे बघतात. आणि तेच विकास आराखडे तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर करतात असा आजपर्यंतचा  अनुभव आहे. काही अपवाद वगळता फारच कमी सरपंच आणि गावकरी त्यात रुची दाखवताना दिसतात. गावकऱ्यांना या नियोजन प्रक्रियेत कसे सहभागी करून घेता येईल याचा विचार ग्राम प्रशासनाने करणे गरजेचे आहे..

काही आशादायी चित्रे

काही गावांनी मात्र विकासाचे सुंदर चित्र रेखाटून त्याला प्रत्यक्षात उतरविले. शाश्वत विकासाला अनुसरून स्वतःचे प्रशिक्षण केंद्र, रोजगार देणाऱ्या कार्यशाळा, अभ्यासिका, आरोग्यासाठी उपक्रम, शिक्षणाच्या योजना,  स्वच्छता अभियान, प्रक्रिया उद्योग, नाना-नानी पार्क, जल संवर्धन असे उपक्रम या नियोजनातून सुंदर रीतीने राबविले. हे नियोजन आणि बदललेले गाव बघायचे झाले तर इतर गावातील गावप्रमुखांनी नागपूर जिल्ह्यातील खुरसापर, एनिकोनी, बोरखेडी रेल्वे, खापरी केने या  गावांना आवर्जून भेटी द्यायला हव्यात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ