केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयात असं म्हटलं आहे की, नवरा जर बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवत नसेल आणि फक्त आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमला असेल, तर यामुळे बायकोला मानसिक त्रास होऊ शकतो. आणि या त्रासामुळे बायकोला घटस्फोट मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची भर पडली आहे. ‘भावनिक दुर्लक्ष’ हे घटस्फोटाचं कारण असू शकतं, हे या निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे.
भावनिकदृष्ट्या दुर्लक्ष केल्याने लग्नाला तडा
ज्या जोडप्याबद्दल हा निकाल दिला आहे, त्या जोडप्याचं लग्न 2016 मध्ये लग्न झालं. यातील बायको आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तिने कोर्टात सांगितलं की, तिच्या नवऱ्याला त्यांच्या वैवाहिक जीवनात अजिबात रस नव्हता. तो सतत देवळात जाणं, पूजा-पाठ करणं आणि अंधश्रद्धांमध्ये गुंतलेला असायचा. त्याला मुलाबाळांमध्येही काही रस नव्हता. आणि तो शारीरिक संबंधही टाळायचा.
बायकोने कोर्टात हेही सांगितलं की, नवरा तिच्या उच्च शिक्षणात अडथळे आणत होता. तिला मिळणाऱ्या स्टायपेंड पैशांचाही तो गैरवापर करत होता. 2019 मध्ये नवऱ्याने फॅमिली कोर्टात सुधारण्याचे आश्वासन दिल्यावर तिने घटस्फोटाची मागणी मागे घेतली होती. पण त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. त्यामुळे तिने 2022 मध्ये पुन्हा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.
नवऱ्याने आरोप फेटाळले
बायकोनं केलेले आरोप खोटे असल्याचं नवऱ्याने कोर्टाला सांगितलं. नवऱ्याचं म्हणणं आहे की, त्यानं बायकोला शिकायला मदत केली आणि तिनेच तिच्या नोकरीमुळे मुलं होऊ दिली नाहीत. तो कुठल्याच अंधश्रद्धांमध्ये गुंतलेला नाही. तसेच तिच्या पैशांचा गैरवापर केलेला नाही. उलट तिचे आई-वडील तिच्या कमाईवर ताबा ठेवतात.
आध्यात्मिक गोष्टी लादणे आणि वैवाहिक संबंध न ठेवणे म्हणजे छळ
या केसमध्ये कोर्टाने दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले:
1.नवऱ्याने बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि मुलं नको म्हणणे, हा हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(ia) नुसार छळ आहे का?
2.बायकोला आध्यात्मिक गोष्टी (पूजा, मंदिर वगैरे) करायला जबरदस्ती करणे, हा मानसिक छळ आहे का?
कोर्टाने बायकोने सांगितलेली गोष्ट खरी मानली आणि तिला नवऱ्यानं मानसिक त्रास दिला आहे असा निर्णय दिला. कोर्टाने शारीरिक छळ आणि मानसिक छळ यातील फरक स्पष्ट केला. कोर्ट म्हणाले की, शारीरिक छळ सिद्ध करणे सोपे असते. पण मानसिक छळ प्रत्येक केसमध्ये वेगळा असतो. कोर्टाने असंही म्हटलं की, सतत दुर्लक्ष करणे, प्रेम न दाखवणे आणि योग्य कारण नसताना वैवाहिक हक्क नाकारणे यामुळे जोडीदाराला खूप मानसिक त्रास होतो.
आध्यात्मिक गोष्टी लादण्याच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्णय दिला की, “विवाह म्हणजे एका जोडीदाराला दुसऱ्याच्या वैयक्तिक श्रद्धा असोत किंवा इतर गोष्टी असो त्या, ठरवण्याचा अधिकार मिळत नाही.” कोर्टाने ‘रूपा सोनी विरुद्ध कमलनारायण सोनी’ या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला. त्यामध्ये असं म्हटलं होतं की, छळाची व्याख्या लवचिकपणे ठरवली पाहिजे. कारण एका महिलेसाठी छळ ठरणाऱ्या गोष्टी दुसऱ्या पुरुषासाठी छळ नसू शकतात.
केरळ उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल
केरळ उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, नवरा-बायकोमध्ये प्रेम, विश्वास आणि मैत्री नसल्यामुळे त्यांचे लग्न पूर्णपणे तुटले आहे. कोर्टाने सांगितलं की, नवरा सतत मंदिरात जात असे आणि वैवाहिक जबाबदाऱ्यांपासून दूर राहत असे त्यामुळे त्यांचे नाते तुटले.
कोर्टाने नवऱ्याची विनंती नाकारली आणि फॅमिली कोर्टाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य ठरवला. कोर्ट म्हणाले, “आम्हाला हा निर्णय बदलण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. कारण हा निर्णय तथ्य आणि पुराव्यांवर आधारित आहे.” नवऱ्याचं अपील नाकारण्यात आलं आणि दोघांनाही आपापला खर्च स्वतः करायला सांगितला.
या निकालामुळे घटस्फोटाच्या कायद्यात एक नवा मुद्दा जोडला गेला. भावनिक दुर्लक्ष हेही घटस्फोटाचं कारण असू शकतं, हे या निकालाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, नवरा-बायकोच्या नात्यात भावनिक आधार आणि संवाद असणं खूप महत्त्वाचं आहे.