भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळात मलेरिया हा सर्वदूर पसरलेला एक मोठा आजार होता. त्याकाळी साधारण साडेसात करोड रुग्ण होते त्यापैकी आठ लाख मृत्यू मलेरियामुळे होत होते. याचा धोका एवढा मोठा होता की अगदी 2000 सालानंतरही प्रत्येक तापाच्या रुग्णाची मलेरियासाठी तपासणी करणे बंधनकारक होते.
मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे आता मलेरियाचा धोका कमी होऊ लागला आहे. 2023 मध्ये एकूण वीस लाख रुग्णांना मलेरिया झाला. मात्र वेळेवर निदान आणि योग्य उपचाराने मृत्यूचा धोका कमी झाला. वीस लाखांतील केवळ 83 लोकांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र राज्य कॅटेगरी 2
2030 पर्यंत भारताने मलेरिया मुक्त होण्याचे ध्येय ठेवले आहे. 2023 मध्ये 122 जिल्ह्यांमध्ये एकही मलेरिया रुग्ण आढळून आला नाही. लक्षदीप व पांडिचेरी या कॅटेगरी शून्य राज्यांमध्ये मलेरियाचे 0 रुग्ण आहेत. अनेक राज्य मलेरियाची रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले महाराष्ट्र राज्य कॅटेगरी 2 या गटात आहे. म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा प्रसार रोखला गेला असला तरी काही जिल्हे मात्र जोखमीचे जिल्हे आहेत.
भारताला मलेरिया मुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी मलेरियाची माहिती घेऊन मलेरिया पासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी.
मलेरिया म्हणजे काय?
मलेरिया हा एक संसर्गजन्य आजार आहे जो Anopheles नावाच्या डासांमुळे पसरतो. संसर्गित अनाफेलेस डासाची मादा चावल्याने हा आजार पसरतो.
संक्रमित डासाच्या लाळेमध्ये Plasmodium नावाचा एक सूक्ष्म परजीवी असतो. हा परजीवी आपल्या शरीरात गेल्यावर यकृत आणि नंतर रक्तातल्या लाल पेशींवर हल्ला करतो. ज्यावेळी लाल पेशींमधून हा परजीवी रक्तामध्ये पसरत असतो त्यावेळी थंडी वाजून ताप येऊ लागतो. जेव्हा मलेरियाच्या रुग्णाला डास चावतो तेव्हा तो डासही संक्रमित होतो आणि आजार पुढे पसरत राहतो.
मलेरियाची लक्षणं काय असतात?
ताप आला म्हणजे लगेच मलेरिया असं नाही, पण मलेरियाची काही ठराविक लक्षणे असतात. जसं की:
अंग खूप थरथर कापतं आणि ताप येतो
तापानंतर भरपूर घाम येतो
थकवा, अशक्तपणा जाणवतो
डोकेदुखी, मळमळ, उलटी होऊ शकते
जर मलेरियामध्ये गंभीर गुंतागुंत झाली तर कधी कधी झटकेही येऊ शकतात. अत्याधिक थकवा संभ्रमित अवस्था श्वास घेण्यास त्रास होणे गडद किंवा काळ्या रंगाची लघवी होणे अशी लक्षणे गंभीर मलेरियाची असतात.
मलेरिया गंभीर रूप घेण्याचा धोका हा पाच वर्षाखालील मुलांमध्ये तसेच गरोदर स्त्रियांमध्ये अधिक असतो. गरोदर स्त्रीला मलेरिया झाल्यास अपुऱ्या दिवसाच्या बाळाचा जन्म तसेच कमी वजनांचे बाळ किंवा माता मृत्यू होऊ शकतो.
संक्रमित डासाच्या चाव्या नंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. लक्षणं दिसली की डॉक्टरांकडे जाणं फार महत्त्वाचं आहे. वेळेवर उपचार झाले, तर मलेरिया पूर्णपणे बरा होतो!
मलेरियावर उपचार काय असतात?
ज्या परजीवी जंतूमुळे मलेरिया झाला आहे त्याचा प्रकार ओळखणे हे उपचारासाठी महत्त्वाचे असते यासाठी रक्ताची तपासणी केली जाते व जंतूच्या प्रकारानुसार उपचार ठरवले जातात.
काहीवेळा डॉक्टर ACTs (Artemisinin-based combination therapy) देतात. जर परजीवी संवेदनशील असतील तर क्लोरोक्वीन औषध दिले जाते. अन्यथा primaquine औषध दिले जाते. त्यामुळे योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
तसेच मलेरियाची गंभीर गुंतागुंत होत असल्यास शिरेद्वारे देखील औषधे घ्यावी लागू शकतात.
मलेरियासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर आणि पूर्ण घ्यावीत. परजीवींमध्ये औषधांसाठीचे प्रतिरोध आढळून येत असल्याने उपचार करण्यामध्ये अडचणी येत आहेत.
एक गोष्ट लक्षात ठेवा — औषधं अर्धवट थांबवू नका! त्यामुळे परजीवी अधिक ताकदवर होऊ शकतो.
हेही वाचा – क्षयरोगाचा धोका कोणाला असू शकतो?
डासांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?
या रोगाचा प्रसार डासांच्या चाव्यामुळे होत असल्याने डासांपासून स्वतःचा बचाव किंवा डासांचे निर्मूलन केले तर मलेरियाचा धोकाही कमी होतो. यासाठी काही सोपे उपाय वापरता येतात.
✓ झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. जिथे जोखीम अधिक आहे त्या ठिकाणी कीटकनाशक युक्त मच्छरदाणी देखील सरकारतर्फे पुरवली जाते.
✓ डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा. डासांची अगरबत्ती किंवा मॅट देखील वापरता येते.
✓ संध्याकाळी आणि रात्री अंग झाकतील असे पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
✓ खिडक्यांना जाळ्या लावा जेणेकरून संध्याकाळी घरामध्ये डास येणार नाहीत.
✓ घराच्या आसपास पाण्याचे मोठे साठे असतील तर त्यामध्ये गप्पी मासे सोडा, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही.
✓ हे डास घरामध्ये विश्रांती घेत असल्याने घराच्या अंतर्गत भागामध्ये भिंतींवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तुमच्या भागात अशी तपासणी होत असेल तर त्यासाठी सहकार्य करा. मात्र आता डासांमध्ये देखील कीटकनाशकांसाठी प्रतिरोध दिसून येत असल्याने याविषयी काळजी घ्यायला हवी.
“डास टाळा, मलेरिया टाळा” ही सोपी पण महत्वाची युक्ती लक्षात ठेवा!
मलेरिया प्रतिबंध
हो, आता एक चांगली बातमी आहे! मलेरियांसाठी दोन लसींना परवानगी मिळालेली आहे. RTS,S/AS01 आणि R21/Matrix-M या दोन लसी आफ्रिका मध्ये लहान मुलांना दिला जातात. या लशी WHO ने मान्य केल्या असून, लहान मुलांसाठी गंभीर आजार टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पैकी R21/Matrix-M ही लस भारतात उपलब्ध होत आहे.
याखेरीज प्रवाशांमध्ये व जोखीमगटांमध्ये मलेरिया होऊ नये यासाठी किमो प्रोफाईल एक्सेस म्हणजे प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. विशेषतः आफ्रिकेतील देशांमध्ये प्रवास करणार असाल तर त्यापूर्वी दोन ते तीन आठवडे व त्यानंतर चार आठवडे ही औषधे नियमितपणे न चुकता घ्यायला हवीत.
थोडक्यात सांगायचं झालं तर…
मलेरिया अजूनही गंभीर आहे, पण त्याला रोखणं आणि बरा करणं आज शक्य आहे. आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो, फक्त थोडं लक्ष ठेवायला हवं.
भारताची मलेरिया नियंत्रणातील प्रगती बघून 2023 साली WHO ने भारताची ‘High Burden to High Impact’ यादीतून बाहेर काढलंय. 2015 पासून एकूण 14 देशांना मलेरिया मुक्त देशांचा दर्जा मिळाला आहे आपला शेजारी श्रीलंका देश देखील 2016 मध्ये मलेरिया मुक्त झालेला आहे.
भारतही लवकरच मलेरिया मुक्त व्हावा यासाठी चला एक पाऊल पुढे टाकू—मलेरिया मुक्त समाजासाठी सरकारच्या कृतींमध्ये सहभाग नोंदवू!
1 Comment
thank you for info . i am aplstic anemia patient. shall i take this vaccine or ask my hemato first