भगवान परशुराम आणि मध्यप्रदेशचा संबंध

Bhagwan Parashuram: राजाकडून वडिलांचा अमानुष वध झाल्यामुळे परशुराम संतप्त झाला. नर्मदा आणि बुधनेर नदीच्या संगमस्थळी जावून, आपल्या ओंजळीत संगमाचे पाणी घेवून त्या दोन नद्यांना साक्ष ठेवून त्याने क्षत्रियांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे या संगमाला आणि त्या पाण्याला धार्मिक वैधता प्राप्त झाली, आणि हे ठिकाण पवित्र ठरले.
[gspeech type=button]

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात देवगाव नर्मदा परिक्रमेचे एक महत्वाचे ठिकाण आहे. अमरकंटकहून नर्मदा उगम पावल्यावर देवगावमध्येच पहिल्यांदाच ती तिच्या पहिल्या उपनदीला भेटते. ती म्हणजे बुधनेर. त्यामुळे नर्मदा आणि बुधनेर या दोन नद्यांच्या संगमामुळे तयार झालेल्या विस्तृत प्रदेशावर देवगाव वसले आहे. परिक्रमावासी या ठिकाणी बुधनेर नदी पार करून नर्मदा नदीच्या काठावरून त्यांची परिक्रमा पुढे नेतात.

बुधनेर ही नर्मदेची पहिलीच उपनदी असल्याने बुधनेर आणि नर्मदा अनुक्रमे आई आणि मुलगी म्हणून ओळखल्या जातात. म्हणून स्थानिक बुधनेर नदीस ‘बूढी माई’ म्हणजेच वृध्द आई या नावाने ओळखतात. ही बूढी माई म्हणजेच नर्मदा नदीची आई मानली जाते. त्यामुळे आई आणि मुलगी ज्याठिकाणी एकमेकांना भेटतात, त्या देवगावला स्थानिक परंपरेत अनन्यसाधारण महत्व आहे.

तीर्थ आणि तीर पार करणं यांचा संबंध

तीर्थ या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधील तृ या धातूपासून ग्राह्य धरली जाते. “स: तरति इति तीर्थम्”, म्हणजेच जो पार करतो, ते तीर्थ. या संदर्भात एखादी गोष्ट पार करणं हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. भौतिक पार करणं हे सोपं आहे जसं की एका नदीकाठावरून दुसऱ्या काठावर जाणं. मात्र आध्यात्मिक पार करणं हे अधिक तात्त्विक आहे. डायना एक या प्रसिध्द अमेरिकन संशोधकानुसार या अध्यात्मिक पार करण्यामध्ये अशुद्धतेपासून शुद्धतेकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, किंवा आत्म्याचा एका जगातून दुसऱ्या जगात होणारा प्रवास सूचित होतो. हे आध्यात्मिक पार करणे नदीशी जोडलेले आहे कारण प्रवाही पाणी शुद्धतेचं माध्यम मानलं जातं आणि आत्म्याला एका स्तरावरून दुसऱ्यावर नेण्याचे कार्य करते. अशा प्रकारे देवगाव भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून एक तीर्थ ठरते.

 

हेही वाचा – वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त

 

दोन्ही नद्यांना साक्ष ठेवून क्षत्रियांचा नाश करण्याची शपथ

देवगावचा संगम अजून एका कारणासाठी प्रसिध्द आहे. स्थानिक कथेनुसार, देवगाव हे परशुरामाचे वडील ऋषी जमदग्नी यांचे आश्रमस्थान होते. कथेनुसार ऋषी जमदग्नी आपल्या आश्रमात यज्ञ आणि तप करित निवास  करत होते. एक दिवस महिष्मतीचा राजा सहस्रबाहू युद्धातून परतत असताना आपल्या सैन्यासह जमदग्नींच्या आश्रमात पोहोचला. ते सर्व थकलेले आणि उपाशी होते. जमदग्नी ऋषींनी अतिथीधर्माचे पालन करित त्यांना विश्रांतीची जागा व अन्न देवू केले. राजा सहस्रबाहूला वाटले की एक संन्यासी इतक्या मोठ्या सैन्याची भूक कशी भागवेल, पण केवळ आदरयुक्त भावनेने तो जे काही मिळेल ते स्वीकारण्यास तयार झाला. ऋषी जमदग्नींचा पाहुणचार पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने आदरपूर्वक ऋषींना विचारले की हे कसे शक्य झाले. जमदग्नी ऋषींनी सांगितले की त्यांच्याकडे अशी गाय आहे जी अमर्याद अन्न तयार करू शकते. हे ऐकताच राजा सहस्रबाहूच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याला वाटले की, अशी गाय एका तपस्व्याकडे नाही तर, त्याच्याकडे असली पाहिजे. कारण तिच्या साहाय्याने तो अनेक लोकांचे कल्याण करू शकेल. म्हणून त्याने ती गाय मागितली. परंतु ऋषींना ती गाय अत्यंत प्रिय होती, आणि त्यांनी ती राजा सहस्रबाहूला देण्यास नकार दिला. त्यामुळे राजा चिडला. त्याने जमदग्नी ऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांचा निर्घृण वध केला आणि ती गाय घेऊन आपल्या सैन्यासह निघून गेला. काही काळानंतर परशुराम आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आश्रमात आला. त्याने वडिलांचा मृतदेह पाहिला आणि घडलेली सगळी गोष्ट समजून घेतली. अतिथी म्हणून आलेल्या राजाकडून वडिलांचा असा अमानुष वध झाल्यामुळे परशुराम संतप्त झाला. नर्मदा आणि बुधनेर नदीच्या संगमस्थळी जावून, आपल्या ओंजळीत संगमाचे पाणी घेवून त्या दोन नद्यांना साक्ष ठेवून त्याने क्षत्रियांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळे या संगमाला आणि त्या पाण्याला धार्मिक वैधता प्राप्त झाली, आणि हे ठिकाण पवित्र ठरले.

 

अशा प्रकारे एकदा हा संगम तीर्थ म्हणून प्रस्थापित झाल्यावर पुढील काळात येथे अनेक धार्मिक घडामोडी घडत गेल्या आणि या त्याद्वारे या स्थळाचे महत्व वाढत गेले.

संगमाच्या काठावरील जमदग्नेश्वर आणि पाताळेश्वर महादेव मंदिर

गोंड राजांनी बांधलेली विष्णू आणि शिवाची मंदिरे

परशुराम आणि जमदग्नींच्या कथेशी नामसाधर्म्य दाखवणारे जमदग्नेश्वर आणि पाताळेश्वर महादेव मंदिर संगमाच्या काठावर आहे. ही मंदिर इ.स. सोळाव्या शतकाच्या सुमारास गोंड राजांनी राजाश्रय देवून बांधून घेतली. जमदग्नेश्वर आणि पाताळेश्वर महादेव मंदिराच्या मध्यवर्ती गर्भगृहाच्या डाव्या भिंतीवर, सॅण्डस्टोनपासून बनवलेली विष्णूची मूर्ती आहे. ही मूर्ती समपाद मुद्रेमध्ये असून चतुर्भुज आह. तिने वरच्या उजव्या हातात चक्र धारण केले आहेत तर वरचा डावा हात आता तुटलेला व झिजलेला आहे. खालचा उजवा हात शंखपुरुषाच्या रूपातील शंख धारण करत असून शंखपुरुषाची मूर्ती त्रिभंग मुद्रेत उभी आहे. खालचा डावा हात गदादेवीच्या रूपातील गदा धारण करत आहे आणि ती देखील त्रिभंग मुद्रेत दर्शवलेली आहे. या मूर्तीच्या वरच्या भागात समुद्रमंथन प्रसंगाचे चित्रण कोरलेले आहे. तसे मूर्तीच्या दोनही बाजूस दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या शैलीचा अभ्यास केला असता, ती कलचुरी काळातील आहे असे समजते.

 

विष्णू मूर्ती

 

गोंड शैलीतील नर्मदा आणि महिषासूरमर्दिनी मूर्ती

विष्णुमूर्तीशिवाय संगमावर गोंड शैलीतील नर्मदेच्या दोन आणि महिषासुरमर्दिनीची एक मूर्ती अशा तीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. नर्मदेच्या मूर्तींपैकी एक मूर्ती नदीच्या काठी असलेल्या मंदिरात ठेवलेली आहे तर दुसरी मूर्ती घाटाच्या पायऱ्यांमध्ये असलेल्या एका छोट्या देवळीत स्थापन केलेली आहे. ह्या दोनही मूर्ती संगमरवरामध्ये घडविलेल्या असून गोंड काळातील मूर्तिशास्त्रीय शैलीची वैशिष्ट्यं दर्शवतात. यात नर्मदेचे वाहन असलेल्या मकराच्या शेपटीची दिशा वरच्या बाजूने वळलेली असणे हे गोंड मूर्तिशास्त्रातील एक ठळक लक्षण आहे आणि प्रस्तुत दोनही मूर्तींमध्ये ते आढळते.

 

नर्मदा देवीची नवीन मूर्ती. भग्न झालेली जुनी मूर्तीही याच परिसरात आहे

 

आदिवासी शैलीतील मुकुट

महिषासुरमर्दिनीची मूर्ती मंदिराच्या अंगणातील वडाच्या झाडाखाली ठेवलेली आहे. ही मूर्ती अत्यंत लहान आकाराची असून संगमरवरातून बनवलेली आहे. मूळ मूर्ती तुटलेली असून नंतर पुन्हा जोडलेली आहे असे दिसून येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हातात शूल तर खालच्या डाव्या हातात खड्ग (धारदार तलवार) आहे. वरच्या डाव्या हातातील आयुध अस्पष्ट आहे. खालच्या उजव्या हाताने तिने हातमहिषासुराचे शिर उचलून धरले आहे. देवीने आदिवासी शैलीतील मुकुट व हार परिधान केलेले आहेत. मूर्तीचा चेहरा गोलसर असून कान छोटे व त्यामध्ये लहान कुंडले धारण केलेली आहेत. मूर्तीवर अंगवस्त्र व अधोवस्त्र दिसतात. मूर्तीचा डावा पाय अंशतः तुटलेला आहे, तर उजवा पाय महिषासुराच्या खालच्या शरीरभागावर ठेवलेला दिसतो. डाव्या हाताने देवीशी लढण्याचा प्रयत्न करित असलेला महिषासुराचा वरील भाग मूर्तीच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात दिसतो. देवीचं वाहन वाघ, मूर्तीच्या खालच्या डाव्या बाजूस कोरलेले आहे.

कोणत्याही भौगोलिक स्थळाची धार्मिक मान्यता अनेक घटकांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असते. संगमाशी निगडित कथा आणि संगमावरी मंदिरे-मूर्त्या वैष्णव, शैव, आणि शाक्त परंपरेची संपृक्तता दर्शवित देवगावला एक लोकप्रिय स्थानिक तीर्थक्षेत्र बनविण्यात फार महत्वाचा वाटा उचलतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ