कीटकनाशके आणि कृषी रसायने

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेत आतापर्यंत आपण बियाणे उद्योग आणि खत उद्योगांची सविस्तर माहिती करून घेतली आहे. आता याच लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत. या भागामध्ये कृषी रसायने व कीटकनाशके यांची व्याप्ती आणि वापर यांचा आढावा घेतला आहे.
[gspeech type=button]

पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये किंवा पीक काढणीनंतर साठवणूक करताना पिकांवर येणाऱ्या कीड किंवा तण प्रजातीला प्रतिबंध करणे, कीड / तण आल्यास ती नष्ट करणे, किडीला पकडण्यासाठी आकृष्ट करणे, किंवा पिकापासून दूर पळवून लावणे किंवा तिचे नियंत्रण करणे यासाठी, तसेच दुभत्या किंवा शेतीसाठी उपयुक्त जनावरांच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना कीटकनाशके म्हटलं जाते.

कीटकनाशके हा कृषी रसायन उद्योगांचा एक मोठा भाग असून, कृषी रसायनांमध्ये कीटकनाशकांव्यतिरिक्त वनस्पतींची वाढ नियंत्रित करणाऱ्या विविध प्रकारच्या रासायनिक घटकांचाही समावेश होतो. यामध्ये वनस्पती वाढ नियंत्रक, पानगळ घडवून आणणारे घटक, सुकवणारे घटक, फळ गळ घडवून आणणारे घटक, बियांचा रुजवा रोखणारे घटक तसेच काढणीनंतर वाहतूक आणि साठवणूक करताना शेतमाल खराब होऊ नये यासाठी वापरावे लागणाऱ्या घटकांचा समावेश होतो. पण यामध्ये रासायनिक खते, पशुखाद्य आणि जनावरांची औषधे यांचा समावेश होत नाही. 

कृषी रसायनांचे मुख्य प्रकार (वापरानुसार) 

Insecticides: कीटकनाशके   

Fungicides : बुरशीनाशके 

Herbicides / Weedicides : तणनाशके

Rodenticides : उंदीर आणि तत्सम प्राण्यांना मारणारे, पळवून लावणारे किंवा त्यांची वाढ नियंत्रित करणारे घटक 

Nematicides : सूत्रकृमींना मारणारे, पळवून लावणारे किंवा नियंत्रित करणारे घटक 

Chemosterilants : किडींना नपुंसक करणारे घटक 

Molluscicides : शंख आणि गोगलगायवर्गीय प्राण्यांना मारणारे, पळवून लावणारे किंवा त्यांची वाढ नियंत्रित करणारे घटक 

Plant Growth Regulators (PGRs) : वनस्पतींची वाढ नियंत्रित करणारे घटक 

Defoliants : वनस्पतींची पाने सुकून गळायला लावणारे घटक 

Desiccants : वनस्पतींमधील ओलावा नाहीसा करून त्यांना सुकविणारे घटक  

Attractants : किडींना आकर्षित करणारे घटक 

Repellents : किडींना दूर पळवून लावणारे घटक

या विविध प्रकारच्या कृषी रसायनांपैकी कीटकनाशके ही आधुनिक आणि संघटित प्रकारे उत्पादित केली जाणारी आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी कृषी रसायने होत. त्यामुळे कृषी रसायन उद्योगांचा अभ्यास करताना त्यात मुख्यत: कीटकनाशकांचा समावेश केला जातो. 

हे ही वाचा : खतांची देशांतर्गत बाजारपेठ

कीटकनाशकांचे मुख्य प्रकार (रासायनिक गुणधर्मानुसार) 

रासायनिक गुणधर्मानुसार कीटकनाशकांचे काही मुख्य प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात अनेक कीटकनाशके असतात. त्यापैकी मोजकी उदाहरणे इथे दिली आहेत.

Organophosphates: उदा. Quinalphos

Organochlorine: उदा. Lindane

Carbamates: उदा. Methomyl, Carbofuran

Cyclodienes: उदा. Endosulfan

Oxadiazine: उदा. Indoxacarb

Pyrethroids: उदा. Fenvalerate, Cypermethrin

Naturalyte: उदा. Spinosad

Neonicotinoids: उदा. Imidacloprid

कीटकनाशक वापरातील ऐतिहासिक टप्पे   

1950 आणि 60 चे दशक : शेतीमध्ये कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर वापरली जाण्याची सुरुवात या काळात झाली. कीटक नष्ट होऊन पिकांचे संरक्षण व्हावे आणि अन्नधान्य उत्पादन वाढावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून सर्वात परिणामकारक आणि जास्तीतजास्त मारक शक्ती असणारी कीटकनाशके या काळात वापरण्यात आली.

1970 चे दशक : अधिक प्रभावी रासायनिक कीटकनाशके बनविण्यासाठी संशोधन होऊ लागले. कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे त्यांच्या विषारी परिणामांचा अभ्यास करून अधिक प्रभावी घटकांवर आधारित कीटकनाशके बनवण्याचे संशोधन करण्यात आले.

1980 चे दशक : संशोधनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावी कीटकनाशके बनविण्याकडून अधिक पर्यावरणस्नेही उत्पादने बनविण्याकडे वळवले गेले. तसेच पिकांना हानी न पोहोचविणाऱ्या कीटकांवर होणारे रासायनिक कीटकनाशकांचे परिणाम अभ्यासले गेले. तसेच कीटकनाशकांचा नियमित आणि दीर्घकाळ वापर केल्यामुळे कीटकांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिकारक्षमतेचे व्यवस्थापन (Pesticide Resistance Management) कसे करावे याबद्दल संशोधन केले गेले.

1990 चे दशक : कीटकनाशक संशोधनामध्ये स्वच्छ पर्यावरण राखणे हे उद्दिष्ट ठेवले गेले. एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management – IPM) पद्धती विकसित करण्यात आली. कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन करण्याकडे अधिक लक्ष पुरवले गेले.

2000 पासून पुढे : कीटकनाशकांमध्ये रासायनिक घटकांना पर्याय शोधण्याचे संशोधन केले गेले. पारंपरिक रासायनिक कीटकनाशकांपेक्षा अतिशय कमी प्रमाणात वापरावी लागतील आणि विशिष्ट किडींनाच मारतील अशा कीटकनाशकांचे उत्पादन केले गेले.

नवीन संशोधन : डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादीचा वापर आधुनिक कीटकनाशकांच्या सोबत करून कमी खर्चात, कमी वेळात अधिक क्षेत्रावर प्रभावी पीक संरक्षण करण्याच्या पद्धती विकसित केल्या जात आहेत. 

जागतिक पातळीवरील कीटकनाशक वापर

कृषीरसायन उद्योगाची बाजारपेठ जागतिक पातळीवर विकसित झालेली आहे. कीटकनाशकांचा वापर करण्यात युरोपियन युनियन आघाडीवर असून एकूण जागतिक वापराच्या सुमारे 31% कीटकनाशके तिथे वापरली जातात. त्या खालोखाल आशिया खंड (22%), उत्तर अमेरिका (16%), लॅटिन अमेरिका (13%), आफ्रिका खंड (8%) तर पूर्व युरोपमध्ये एकूण जागतिक वापराच्या 5% कीटकनाशके वापरली जातात. 

हे ही वाचा : खत उत्पादन आणि वापराच्या जागतिक नकाशावर भारत

कीटकनाशकांचा प्रति हेक्टरी वापर 

कृषी रसायन उद्योगांकडून मिळालेल्या माहितीनुसार कीटकनाशकांचा प्रति हेक्टरी वापर विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर आहे. सर्वाधिक वापर तैवानमध्ये (17 किलो प्रति हेक्टर) असून त्याखालोखाल वापर दक्षिण कोरिया (16.60 कि/हे), इटली (13.40 कि/हे), हंगेरी 12.60 (कि/हे) आणि जपान (10.80 कि/हे) या देशांमध्ये होतो. तर कीटकनाशकांच्या वापरात जर्मनी (3 कि/हे), चीन (2.25 कि/हे), अमेरिका (1.50 कि/हे) आणि भारत (0.48 कि/हे) यांचा प्रति हेक्टरी वापर वर उल्लेख केलेल्या देशांच्या तुलनेत कमी पातळीवर आहे. 

भारतातील कीटकनाशकांचा वापर

Food and Agricultural Organization (FAO) च्या अहवालानुसार रासायनिक खत वापरात जागतिक पातळीवर चीन व अमेरिकेखालोखाल भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तर भारतीय कृषी अर्थशास्त्रविषयक एका अभ्यासानुसार कीटकनाशक वापरात जागतिक पातळीवर भारताचा क्रमांक 48 वा आहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ज्या विविध कृषी निविष्ठा वापरल्या जातात त्यात रासायनिक खतांच्या तुलनेत रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढविण्यास वाव आहे.

राज्यांमधील विविधता 

भारतातील राज्यांच्या कीटकनाशक वापरातदेखील बरीच विविधता आढळते. भारतातील कीटकनाशकांच्या एकूण वापरापैकी सर्वाधिक म्हणजे 22.8 टक्के कीटकनाशके एकट्या आंध्रप्रदेशमध्ये वापरली जातात. त्या खालोखाल पंजाब (12.4%) आणि महाराष्ट्र (11.6%) यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर कर्नाटक व गोवा (7.4%), गुजरात (6.8%), हरयाणा (6.6%), पश्चिम बंगाल व सिक्कीम (6.4%), मध्य प्रदेश (5.7%) आणि तमिळनाडू (5.1%) अशी क्रमवारी लागते. 

भारतातील एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 43 टक्के  उत्पादन उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये होते. भारतातील एकूण तेलबिया उत्पादनापैकी 47 टक्के उत्पादन मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये होते. भारतातील एकूण कापूस उत्पादनापैकी 62 टक्के उत्पादन महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. ही 8 राज्ये मिळून देशाच्या एकूण कीटकनाशक वापरापैकी ७० टक्के कीटकनाशके वापरतात. 

विविध पिकांमधील कीटकनाशकांचा वापर 

भारतातील मुख्य पिकांपैकी सर्वाधिक कीटकनाशक वापर भात पिकामध्ये, देशाच्या एकूण कीटकनाशक वापराच्या तब्बल 25 टक्के इतका होतो. त्याखालोखाल कापूस पिकामध्ये 21 टक्के, भाजीपाला पिकांमध्ये 17 टक्के, तर त्याखालोखाल गहू आणि फळपिके यांच्यामध्ये एकूण कीटकनाशकांपैकी प्रत्येकी 6 टक्के कीटकनाशके वापरली जातात. सोयाबीन पिकात 5 टक्के, चहा पिकात 3 टक्के, तर चणा आणि ऊस पिकांमध्ये प्रत्येकी 2 टक्के कीटकनाशके वापरली जातात. म्हणजेच भात, कापूस व भाजीपाला पिके मिळून एकूण कीटकनाशक वापरापैकी 63  टक्के कीटकनाशके वापरली जातात.

यावरून असे लक्षात येईल की, भारतात कीटकनाशकांचा वापर हा सर्व राज्यांमध्ये व सर्व पिकांमध्ये होत असला तरी विशिष्ट राज्ये आणि विशिष्ट पिकांमध्ये हा वापर जास्त आहे, आणि भारताचा सरासरी प्रति हेक्टरी कीटकनाशक वापर इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. याचा अर्थ असा की भारतात ज्या ठिकाणी पिकांची उत्पादकता कमी असेल, कीड आणि रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असेल त्या ठिकाणी कृषी रसायने आणि कीटकनाशके वापरुन उत्पादकता वाढविण्यास आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास वाव आहे.   

लेखाच्या पुढील भागात आपण भारतातील कीटकनाशक बाजारपेठ तिची व्याप्ती आणि भारतीय कीटकनाशक उत्पादन उद्योग यांची माहिती घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Grampanchayat : गावात विकास हवा असतो मात्र त्यासाठी जीव ओतून जे परिश्रम घ्यायचे असतात ते घेण्याची तयारी कुणाचीच नसते. आपणास
High Blood Pressure : उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन. हा आजार हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा सुरुवातीला
Tumor : आज आपण एका महत्त्वाच्या आणि काहीशा भीतीदायक वाटणाऱ्या पण समजून घेतल्यास सामोरे जाणे सोपे असलेल्या विषयाबाबत माहिती घेणार

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ