इराणमधून 110 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणारं पहिलं विमान गुरुवार, दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे भारतात पोहोचलं. इराणमधल्या युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून ‘ऑपरेशन सिंधू’ राबवण्यात येत आहे. या पहिल्या विमानातून इराणमधल्या उर्मिया विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातं आणलेलं आहे.
इराणची राजधानी तेहरानमधील मेडिकल विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथल्या भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इराणच्या शेजारील देश अर्मेनियामध्ये आणण्यात आलं होतं. अर्मेनियातून या विद्यार्थांना कतारमार्गे गुरुवारी पहाटे भारतात आणलं आहे.
मायदेशी सुखरुप परत आल्यानंतर ‘द जम्मू अँड काश्मीर स्टुडंट्स’ असोसिएशनने सरकारचे आभार मानले आहेत. तसंच इराण आणि अर्मेनियामध्ये पोहोचलेले अन्य विद्यार्थीही सुखरूप भारतात परत येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
गुरुवार, दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे दिल्ली विमानतळावर ‘ऑपरेशन सिंधू’चं पहिलं विमान दाखल झालं. त्यामुळे दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या पालकांची खूप गर्दी होती. आपल्या मुलांना भेटल्यावर पालकांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या मुलाला भारतात सुखरुप परत आणल्याबद्ल हैदर अली यांनी सरकारचे आणि संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले. हैदर अली यांचा 21 वर्षाचा मुलगा माझ हैदर हा तेहरानमध्ये एमबीबीएसचं शिक्षण होता. या 110 विद्यार्थ्यांप्रमाणे तेहरानमध्ये अनेक मुलं अडकलेली आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणावं, अशी विनंती हैदर अली यांनी सगळ्या पालकांच्यावतीने सरकारला केली आहे.
इराणमधली परिस्थिती चिघळत असताना वेळीच भारतीय दुतावासाने तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना लागलीच अर्मेनियामध्ये हलवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांना सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवलं. दुतावासाने तातडीने पाऊले उचलल्याबद्दल पालकांनी आभार मानले आहेत.
यावेळी मीर खलिफ या विद्यार्थ्याने तिथली परिस्थिती कथन केली. तो म्हणाला की, आमच्या डोक्यावरुन मिसाइल्स जाताना आम्ही पाहिल्या. एका क्षणात आमच्या आजूबाजूच्या इमारती आणि सगळं उद्धवस्त होताना आम्ही पाहिलं. ही परिस्थिती खूप भयानक होती. आमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांचीही लवकरात लवकर इराणमधून सुटका होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
इस्रायलकडून तेहरानवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. तेहरान हे पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे, अशी प्रतिक्रिया अली अकबर या विद्यार्थ्यांने दिली.
दरम्यान, हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत रस्ते मार्गाने इराणमधल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना शेजारील देशांमध्ये सर्वात आधी सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. तिथून त्यांना भारतात आणलं जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.