तुम्हाला माहितीये का, तुमच्या रोजच्या टी बॅगमधुन तुमच्या चहा मध्ये मायक्रोप्लास्टिक्स मिसळू शकतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. पण आता काळजी करण्याची गरज नाही.आसाममधील ‘वूल्लाह टी’ (Woolah Tea) नावाच्या कंपनीने यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदाच ‘बॅगलेस चहा’ तयार करण्याचं पेटंट मिळवलं आहे.
‘वूल्लाह टी’
आसामच्या सिबसागर जिल्ह्यातील उपमन्यू बोर्कोटोकी आणि अन्शुमान भारली या दोन तरुण उद्योजकांनी ‘वूल्लाह टी’ हा स्वदेशी स्टार्टअप सुरू केला. त्यांनी Compressed True Whole Leaf Tea Dips and Method Thereof या नावाने पेटंट मिळवलं आहे. आणि हे पेटंट त्यांना तब्बल 20 वर्षांसाठी मिळालं आहे.
‘बॅगलेस चहा’ म्हणजे नेमकं काय?
हा चहा खास पद्धतीने तयार केला जातो. यामध्ये ‘एटी कोळी दुती पात’ म्हणजेच चहाची एक कळी आणि दोन ताजी पाने वापरली जातात. ही पाने नैसर्गिक धाग्याने अशाप्रकारे बांधली जातात की त्याचा एक छोटासा बंडल (Dips) तयार होतो. यामुळे आपल्याला नेहमीच्या चहाच्या पिशवीची गरजच पडत नाही. आणि महत्वाचं म्हणजे चहात प्लास्टिकचे कण मिसळण्याचा प्रश्नच येत नाही.
मायक्रोप्लास्टिक्सपासून कायमची सुटका
उपमन्यू सांगतात, “आमचं सगळ्यात मोठं लक्ष्य हेच होतं की, नेहमीच्या टी बॅग मधून चहात मिसळणारे हे मायक्रोप्लास्टिक्स कसे थांबवता येतील.” सुरुवातीला त्यांनी यासाठी खूप वेगवेगळे प्रयोग केले. चहाच्या पिशव्यांना पर्याय म्हणून त्यांनी केळी आणि बांबूच्या धाग्यांसारख्या वेगवेगळ्या वस्तू वापरून पाहिल्या. पण त्यामुळे चहाची पाने ही व्यवस्थित उघडत नव्हती. शेवटी त्यांनी पानांना योग्यप्रकारे दाबून बंडल बनवण्याची ही अनोखी पद्धत शोधून काढली.
167 प्रयोगानंतर मिळालं यश
कोणतीही नवीन गोष्ट तयार करायची म्हटलं तरी त्यासाठी खूप मेहनत लागतेच. उपमन्यू सांगतात की, “बॅगलेस चहाची ही कल्पना आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. ती परफेक्ट करण्यासाठी आम्हाला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला आणि तब्बल 167 वेळा वेगवेगळे प्रयोग करावे लागले”.
सुरुवातीला ते चहा हाताने दाबून बंडल तयार करत होते आणि नंतर चहा सुकवणाऱ्या मशीनवर ते बंडल सुकवायचे. आणि त्यांनी हे उत्पादन बाजारात आणण्यापूर्वीच पेटंटसाठी अर्ज केला होता.
उपमन्यू आणि अन्शुमान या दोघांनाही चहा उद्योगात याआधी कोणताही अनुभव नव्हता. त्यांना एकदा एका शेतकऱ्याकडून हाताने बनवलेला सेंद्रिय चहा मिळाला होता. तो चहा प्यायल्यावर त्यांना चहा बद्दल आवड निर्माण झाली, आणि त्यांनी चहा उद्योगात काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला.
उपमन्यू सांगतात की “मला नेहमी वाटायचं की ग्रीन टी कधीच चांगला लागत नाही, पण त्या शेतकऱ्याच्या चहाने माझं मतच बदललं,”
त्यांनी हे काम करण्यासाठी आपापल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या आणि थेट आसाममधील सेंद्रिय चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. विशेषतः सिबसागर, काक्षोपोठार आणि डिब्रुगड या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसोबत काम करत त्यांनी हा नवीन प्रयोग सुरू केला.
‘शार्क टँक इंडिया’ ते आंतरराष्ट्रीय बाजार
‘वूल्लाह टी’ला ‘शार्क टँक इंडिया’ च्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणखी विशेष म्हणजे, हा एकमेव चहा ब्रँड होता ज्याला सर्व ‘शार्क्स’कडून म्हणजेच गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीची ऑफर मिळाली. यामुळे त्यांच्या उत्पादनाला आणि कल्पनेला देशात खूप ओळख मिळाली.
आता ‘वूल्लाह टी’ फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही उतरण्याची तयारी करत आहे. ते अमेरिका, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये आपला चहा निर्यात करणार आहेत. सध्या, ‘वूल्लाह टी’ न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या ‘द समर फॅन्सी फूड शो’मध्ये आसामच्या चहाच्या 200 वर्षांच्या इतिहासाचं प्रतिनिधित्व करत आहे.