दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची सभा हे मुख्य आकर्षण असायचं. त्याचसोबत आरएसएसच्या व्यासपीठावरुन मांडले जाणारे विचारही एक चर्चेचा विषय असायचा.
मात्र अलिकडे, पक्षापक्षात झालेल्या फाटाफुटीमुळे सभेंची रेलचेल असते. आरएसएसचा मेळावा, शिवसेनाच्या दोन गटाच्या वेगवेगळ्या सभा, राज ठाकरे यांची सभा, गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडे यांची सभा आणि त्यात भर म्हणून मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील हेही आता दसऱ्यांच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात.
मुख्यमंत्री, पंतप्रधान, आरएसएसचे सरसंघचालक सगळ्यांवर आगपाखड
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली. मी आज बाळासाहेबांची शाल पांघरलेल्या गाढवाचे फोटो पाहिले अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टोला लगावला. तर देशाच्या उत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत मी माझ्या कामांमुळे पहिल्या क्रमांकावर होतो, तर आताचे मुख्यमंत्री हे थेट दहाव्या स्थानावर आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानचा संघर्ष सुरू आहे. एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतोय आणि दुसरीकडे पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, ही यांची घराणेशाही. अशा शब्दात ठाकरेंनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाहा आणि आयसीसीचे चेअरमन जय शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तीन वर्षांपासून मणिपूर जळत आहे. पण आता पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले. मणिपूरमध्ये जाऊन दंगलग्रस्त भागातील नागरिकांना धीर देतील असं वाटत होतं. पण हे त्या लोकांना भेटलेच नाहीत. मणिपूरच्या नावात मणी असल्याचा उल्लेख त्यांनी केला, पण तिथल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू यांना दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.
तर एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे.हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू असं म्हणत त्यांनी आपली सभा घेतली.
सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेचाच डंका वाजला पाहिजे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीला सत्ता मिळाली पाहिजे. कोणाचे कोणाबरोबर मनोमीलन होते त्याची तुम्ही चिंता बाळगू नका. विरोधकांचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. योग्य वेळी त्यांचा समाचार घेऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवर शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले.
गेल्या तीन वर्षांत मुंबईच्या विकासासाठी महायुती सरकारने विविध कामे हाती घेतली. रस्त्यांची दैना कोणाच्या काळात झाली होती. आता नव्याने काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. मुंबईची सत्ता अन्य कोणाच्या ताब्यात जाऊ देऊ नका, अन्यथा मुंबई 25 वर्षे मागे जाईल, असं म्हणत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत मतदानाचं आवाहन केलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार आहे. तुम्ही शिवसैनिकांनी ‘एकनाथ शिंदे’ समजून जोमाने काम करा. मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा. पुढचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आपल्याला धूमधडाक्यात साजरे करायचे आहे, अशा सूचना शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.
हिंसक उद्रेकांमध्ये बदल घडवण्याची क्षमता नसते – सरसंघचालक मोहन भागवत
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष होतं. दरवर्षीप्रमाणे संघाचा विजयादशमीचा उत्सव गुरुवारी नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर पार पडला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, भारत, आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय धोरण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर, नेपाळ व बांगलादेशमधील सध्याची स्थिती, सोनम वांगचुक यांना झालेली अटक, पहलगाममधील दहशतवादी हल्ला यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
ते म्हणाले की, अलिकडच्या काळात, आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत.
हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. याउलट, हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.